29 January, 2024

 

चाचा नेहरु बाल महोत्सव उत्साहात संपन्न


 

हिंगोली (जिमाका), दि.29 :  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने दि. 27 जानेवारी ते दि. 29 जानेवारी, 2024 या कालावधीत चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील बालगृहात दाखल असलेल्या बालकांच्या कलागुणांना वाव देणे हा बाल महोत्सव घेण्यामागचा उद्देश होता. या बाल महोत्सवाचे उद्घाटन गृह विभागाचे पोलीस उप अधीक्षक सोनाजी आम्ले यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मानसोपचार तज्ञ डॉ. निशांत माणका, आदर्श महाविद्यालयाचे मुख्याध्यापक माधव जाधव उपस्थित होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले, बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे उपस्थित होते.

या आयोजित तीन दिवशीय बाल महोत्सवात लहान गट व मोठा गट असे विभागून धावणे, कबड्डी, लांब उडी, गोळा फेक, पोत्याची रेस, दोरीवरील उड्या, कॅरम, बुध्दीबळ, रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन यांच्यामार्फत बालविवाह पथनाट्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमात बालगृहातील बालके तसेच विद्यासागर विद्यालय खानापूर चित्ता व आदर्श विद्यालय येथील मुलांनी उत्साहाने कार्यक्रमात भाग घेऊन आपले कलागुण सादर केले. या स्पर्धामध्ये विजयी झालेल्या बालकांचे पारितोषिक  वितरण अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बाल रोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, परिविक्षा अधिकारी तथा सरस्तवती मुलींचे निरीक्षणगृह व बाल गृहाच्या अधीक्षक रेखा भुरके, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले, बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे, बाली भोसले, संगीता दुबे, किरण करडेकर, बाल न्याय मंडळ सदस्य सत्वशीला तांगडे, उज्वल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाईकराव उपस्थित होते.

******

27 January, 2024

 

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यांच्या पुढाकारातून

कळमनुरी व सेनगाव येथील सर्वेक्षणाच्या अडचणी दूर, सर्वेक्षणाला सुरुवात

 

खुल्या व मराठा समाज प्रवर्गातील सर्वेक्षणाचे काम

31 जानेवारीपर्यंत शंभर टक्के पूर्ण करावेत

                                                            -- राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे

 





हिंगोली (जिमाका), दि.27 :  जिल्ह्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण 31 जानेवारी पर्यंत शंभर टक्के पूर्ण करावेत, अशा सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यावेळी दिल्या.  

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण व विविध शासकीय योजना, धरण, प्रकल्प, सिलिंग कायद्याअंतर्गत झालेले जमीन अधिग्रहण याबाबतची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी  खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी  स्वप्नील मोरे, भूसंपादन अधिकारी मंजूषा मुथा, प्रा. एस. एन. कदम, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यातील कळमनुरी नगर परिषद व सेनगाव नगर पंचायत तसेच सेनगाव तालुक्यातील मौजे बन व मौजे बोरखडी पिंगळे या गावाची  नावे ॲपमध्ये  दिसत नव्हती,  त्यामुळे या ठिकाणचा सर्वे थांबला होता. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यांच्या पुढाकारातून तो प्रश्न तात्काळ सोडवण्यात आला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. खुल्या प्रवर्गाच्या तुलनेत मराठा आरक्षणाबाबत अचूक माहिती  सर्वेच्या माध्यमातून यावी,  यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने ग्रामपातळी पासून  केले जाणारे सर्वेक्षण हे अचूक व प्रत्यक्ष घरोघरी जाऊन केले जात आहे. यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि प्रगणक चांगले काम  करीत असल्याचा गौरव राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी यावेळी केला.

            जिल्हा प्रशासनामार्फत हिंगोली जिल्ह्यात नगरपरिषदा, ग्रामीण भागात सर्वेक्षणाचे काम सुरु असून यासाठी  199  पर्यवेक्षक, 3 हजार 140 प्रगणक व इतर मनुष्यबळ कार्यरत आहेत. काही तांत्रिक अडचणी जशा समोर येत आहेत त्या तात्काळ दूरही केल्या जात आहेत. ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्याचा एकत्रित विचार करुन सर्व  प्रश्न व सॉफ्टवेअरमधील त्रुटी दूर केल्या जात असल्याचे प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी यावेळी सांगितले.

            भूसंपादनाचे सर्व रेकॉर्ड तसेच एमआरईजीएसमध्ये श्रमाची कामे करणाऱ्यांची माहिती तपासून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांची माहिती संकलीत करुन राज्य मागासवर्ग आयोगाला तात्काळ सादर करावी. तसेच नुकत्याच निघालेल्या अधिसूचनेनुसार ज्या कुटुंबाकडे वंशावंळी आहे. त्या वंशावळीच्या अनुषंगाने विशेष शिबीरे घेऊन जास्तीत जास्त जात प्रमाणपत्राचे वितरण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

            यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सवेक्षण करताना येणाऱ्या अडचणी व झालेल्या कामाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

******

26 January, 2024

 

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हिंगोली येथील

ऐतिहासिक शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण



 

 

 

हिंगोली (जिमाका), दि.26 : येथील ऐतिहासिक शासकीय विश्रामगृहाचे नुतनीकरण करण्यात आले असून या विश्रामगृहाचे लोकार्पण पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आज करण्यात आले.

या ऐतिहासिक शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण प्रसंगी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे उपस्थित होते.

हिंगोली येथील ऐतिहासिक वारसा असलेले शासकीय विश्रामगृह इमारत यप 1874 पासून अस्तित्वात आहे. या इमारतीचे जतन व संवर्धन करणे गरजेचे असल्यामुळे या वास्तूचे नुतनीकरण व सुशोभिकरण करण्यात आले आहे. नुतनीकरण करताना अस्तित्वातील इमारतीमधील सागवान दरवाजे व दरवाज्याची चौकट इत्यादी गोष्टीचा पुनर्वापर करुन नवीन फर्निचर तयार करण्यात आला आहे. या इमारतीमध्ये सर्व कामे दर्जेदार करण्यात आली आहेत. या इमारतीमध्ये एकूण चार अतिमहत्वाचे कक्ष तयार करण्यात आले असून हे कक्ष मंत्री महोदय व आमदारांना राखीव असणार आहेत. आजपासून हे ऐतिहासिक शासकीय विश्रामगृह हेरिटेज 1874  नावाने ओळखला जाणार आहे.

*****

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

संविधानातील मुल्यांमुळेच भारतीय लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ

-- पालकमंत्री अब्दुल सत्तार





 

* हिंगोली येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध होणार

* जिल्हा वार्षिक योजनेच्या 4 कोटी 32 लाख रुपये निधीतून देण्यात आलेल्या 250 नवीन रोहित्राचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

* पोलीस विभागाला पुरविण्यात आलेल्या नवीन स्कार्पिओ वाहनाचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

 

 

हिंगोली (जिमाका), दि.26 : राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आज भारतीय संविधानातील मुल्यांमुळेच भारतीय लोकशाही  जगात सर्वश्रेष्ठ मानली जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले .

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली येथील संत नामदेव कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज झाले. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, राज्य राखीव पोलीस बलाच्या महानिदेशक पोर्णिमा गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान लाभलेल्या लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेल्या भारतीय राज्यघटनेची 26 जानेवारी, 1950 रोजी देशात अंमलबजावणी सुरु झाली. आणि जगात भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला. आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मला सांगण्यास आनंद वाटत असल्याचेही यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

हिंगोली येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच या महाविद्यालयासाठी अधिष्ठाताचीही नेमणूक केली आहे. या महाविद्यालयासाठी वळू माता प्रक्षेत्राची 15 हेक्टर 29 आर जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय व अद्यावत रुग्णालय उभारण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरु आहे. लवकरच मान्यता मिळाल्यानंतर या वैद्यकीय महाविद्यालयातून दरवर्षी 100 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

 हिंगोली जिल्हा रुग्णालयाने भारत सरकारच्या महत्वकांक्षी उपक्रमातील ई-संजीवनी ऑनलाईन ओपीडीद्वारे आतापर्यंत 70 हजाराच्या वर रुग्णांना आरोग्य सेवा देऊन देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली असून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी विविध विज ग्राहकांचे नादुरुस्त रोहित्र त्वरीत बदलण्यासाठी जिल्हा वार्षीक योजनेच्या 4 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीतून 100 केव्हीए क्षमतेचे 250 विद्युत रोहित्र पुरविण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात जून व जुलै, 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 15 हजार 924 शेतकऱ्यांच्या 16 हजार 599 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 14 कोटी 54 लाख 28 हजार 200 रुपयाचा निधी मंजूर केला आहे. हा निधी शासनाकडून डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच नोव्हेंबर, 2023 मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे 2 लाख 57 हजार 197 शेतकऱ्यांच्या  1 लाख 23 हजार 164 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या सर्व बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन 167 कोटी 86 लाख 64 हजार रुपयांची मागणी शासनाकडे पाठविली आहे. लवकरच त्यांनाही मदत देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

          जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झालेल्या 17 महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करुन त्या गावातील नागरिकांना विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन 1 हजार 368 गावासाठी नळ योजना दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे, कुपनलिका घेणे, खाजगी विहिर अधिग्रहीत करणे, विहिरीचे खोलीकरण, टँकरने पाणी पुरवठा करणे यासह विविध उपाययोजना करण्यासाठी 16 कोटी 58 लाख 62 हजार रुपयाचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम  24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 476 गावांमध्ये ही संकल्प यात्रा पोहचली असून यामध्ये 2 लाख 1 हजार 67 नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे.  हिंगोली जिल्हा पोलीस विभागाने वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, रोजगार मेळावे, क्रीडा स्पर्धा, पोलीस दरबार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान, विशेष कामगिरी करणाऱ्या तीन पोलीस स्टेशनला बक्षीस यासह विविध उपक्रम राबवून सामाजिक व कायदेशीर कामगिरी करत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

राज्य शासनाने राज्यातील न जोडलेल्या वाड्यावस्त्या जोडण्यासाठी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन 2015 पासून सुरु केली आहे. या योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 845 किमी लांबीचे 249 रस्ते मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी 210 कामे पूर्ण झाली असून 37 कामे प्रगतीपथावर असल्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाला न्याय देण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्गीय आयोगाच्या निर्देशानुसार मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने हिंगोली  जिल्हा प्रशासन सज्ज असून दि. 23 जानेवारी, 2024 पासून प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी 182 पर्यवेक्षक व 3 हजार 575 प्रगणकाची नेमणूक करण्यात आली असल्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.   

            संविधानामुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाला, हे आपणांस माहितच आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व असून आपण जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून देशाच्या सर्वा‍गिंण विकासासाठी काम करत आहोत. राज्य तसेच आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

यावेळी नादुरुस्त रोहित्र तात्काळ बदलण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 4 कोटी 32 लाख रुपये निधीतून देण्यात आलेल्या 250 नवीन रोहित्राचे लोकार्पण पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज करण्यात आले. तसेच पोलीस विभागासाठी देण्यासाठी आलेल्या नवीन स्कार्पिओ वाहनाचे लोकार्पणही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.  

याप्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी राज्य राखीव दल, पोलीस, गृहरक्षक दलाच्या पथकांनी शानदार संचलन केले. तसेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर यांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच शहीद गणपत भिकाजी रणवीर यांचे विर पिता भिकाजी रणवीर व वीरमाता लक्ष्मीबाइ रणवीर यांचा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सशस्त्र सेना ध्वज निधीचे उत्कृष्ट संकल्न केल्यामुळे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांचा प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. या ध्वजारोहण कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

*****

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण



 

 

            हिंगोली (जिमाका), दि.26 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.   

            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी  खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी  दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिद्दीकी तसेच सर्व अधिकारी- कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*****

25 January, 2024

 

हिंगोली जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या पशुधनास

टॅगींग व ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : दुध उत्पादक शेतकऱ्यांना दि. 5 जानेवारी, 2024 च्या शासन निर्णयानुसार गाय दुधासाठी प्रती लिटर पाच रुपये अनुदान देय आहे. पात्र पशुधनास कानात टॅगींग करुन भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी करणे अत्यावशक आहे.  त्यानुषंगाने सर्व पशुवैद्यकीय संस्थामार्फत पशुधनास टॅगींग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरु आहे.

पशुधनास टॅगींग व नोंदणीस शेतकरी, पशुपालकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज अखेर पशुधन नोंदणी (Animal Registration)-3175, पशुपालक नोंदणी (Owner Registration)- 923, पशुपालक हस्तांतरण नोंदणी (Owner Transfer)-300, पशुधनाच्या नोंदीत बदल (Search and modify animal) – 328, कानातील टॅग बदल नोंदी (Tag change)-73, पशुपालकांच्या नावातील बदल (Search and Modity Owner)-14 याप्रमाणे अतिरिक्त नोंदणी करण्यात आल्या आहेत. तसेच अतिरिक्त 87 हजार 200 टॅग नव्याने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

मा. पशुसंवर्धन मंत्री यांनी दि. 24 जानेवारी, 2024 रोजी व्हिसीद्वारे घेतलेल्या बैठकीत सर्व जिल्हास्तरीय अधिकारी यांना पशुधनास टॅगींगg व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करण्याचे कामकाज अभियान स्वरुपात राबविणे बाबत सूचित केले आहे.

त्यामुळे सर्व पशुपालक, शेतकऱ्यांनी आपल्या सर्व पशुधनास टॅगींग व ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करुन आपल्या पशुधनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, हिंगोली यांनी केले आहे.

******

 

जवळाबाजार येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

मतदान हाच बळकट लोकशाहीचा पाया

                                        -डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी

 



हिंगोली (जिमाका), दि. 25 : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालयात आज राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर अण्णा  मुळे तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले, माजी सभापती डॉ. नवले उपस्थित होते.

            मतदार दिनाचे औचित्य प्रसंगी डॉ.सचिन खल्लाळ यांनी "मतदान हाच बळकट लोकशाहीचा पाया" असून त्यासाठी आपण सजग, नीतिमान, समाजकार्याची तळमळ असणारा तसेच विकास करण्याची आवड असणारा उमेदवार मतदानाच्या माध्यमातून निवडून दिला पाहिजे, असे प्रतिपादन केले. तसेच शाळेतील एक हजार  विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थी हेच प्रगल्भ लोकशाहीचे भावी आधारस्तंभ आहेत, हे सांगत विद्यार्थ्यांना यशाचा व बळकट  लोकशाहीचा मूलमंत्र सांगताना साध्य-साधन-साधक यांची एकाग्रता किती महत्वाची असते हे स्व अनुभव व महाभारतातील अर्जुन - कर्ण यांची कथा सांगत पटवून दिले.

गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले यांनी लोकशाही टिकवायची असेल तर मतदान करणे किती महत्त्वाचे आहे हे सांगताना आपल्या एका मताचे मूल्य प्रतिपादित केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर अण्णा मुळे यांनी संस्था आणि संस्थेचे वैभव म्हणजे विद्यार्थी असल्याचे सांगितले.

            याप्रसंगी सर्व उपस्थित शिक्षक , विद्यार्थी , बीएलओ यांच्या समवेत राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शाळेत आयोजित विविध स्पर्धांचे निरीक्षण , परीक्षण करुन सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

            कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी के. के. गोरे , केंद्रप्रमुख पठाडे, केशव सारंग, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बांगर व शाळेचे सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व बीएलओ आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

******

 

वसमत तालुक्यातील टाकळगाव येथे जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत

बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती

 


हिंगोली (जिमाका), दि. 25 : वसमत तालुक्यातील मौजे टाकळगाव येथे वसमत येथील हुतात्मा बहिजी स्मारक महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीरामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार शिवीरामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी बाल संरक्षण अधिकारी श्री. मोरे यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा, 2006 नुसार मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे असे निर्देशित करण्यात आलेले आहे. जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात य अशा गुन्ह्यास एक लाख रुपय दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. तसेच सर्व यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाहीत व या बाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सांगितले. जिल्हा बाल संरक्षणा कक्षातील बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे यांनी सर्व उपस्थितांकडून बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचे वाचन करुन शपथ देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी जिल्ह्यातील बाल संरक्षण यंत्रणा आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेलो बालके या बद्दल माहिती दिली व त्यानंतर चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदिप कोल्हे यांनी बालकांसाठी तात्काळ मदत करणारा चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 या टोलफ्री क्रमांकावर माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता याची गोपनीयता राखली असल्याचे सांगून जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बाल विवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा पोलीस हेल्प लाईन क्रमांक 112 यावर माहिती द्यावी, असे आवाहन उपस्थित गावकऱ्यांना केले,

या कार्यक्रमासाठी वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ करुणा देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकांत गावंडे, महिला सह. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम. पाटील, महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, बाल संगोपन योजना संस्था वसमत येथील संतोष चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रतिनिधी अनिकेत सोनटक्के, विद्यार्थिंनी प्रतिनिधी कोमल भुसावळे व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, शाळेतील विद्याथी उपस्थित होते.

*******

 

 राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त

जिल्हा माहिती कार्यालयात घेतली शपथ

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येतो. 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवतरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत  सहभाग वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून आज 25 जानेवारी रोजी सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली जाते.

 येथील जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी उपसंपादक चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक श्रीमती आशा बंडगर, सर्वसाधारण सहायक कैलास लांडगे, शिपाई परमेश्वर सुडे आदी उपस्थित होते.

*******

 

सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा व ग्रामीण होमस्टे स्पर्धेसाठी

31 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे सामाजिक आणि पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सर्वोत्कृष्ट गाव स्पर्धा-2024 व ग्रामीण होमस्टे स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

            सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेसाठी हेरिटेज, कृषि पर्यटन, क्राफ्ट, जबाबदार पर्यटन, हरित गावे, दोलायमान गावे, प्रवेशयोय पर्यटन, साहसी पर्यटन, समुदाय आधारित पर्यटन, सर्वात स्वच्छ गाव, अध्यात्मिक आणि निरोगीपणा या श्रेणीतील गावांना नामांकन पत्रे सादर करता येणार आहे. सवोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा जिल्हास्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तर अशा तीन टप्प्यात होणार आहे.

            तसेच ग्रामीण होमस्टेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने ग्रामीण होमस्टे स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सर्वोत्कृष्ट ग्रामीण होमस्टे स्पर्धेसाठी व्हायब्रंट व्हिलेज, ग्रीन, समुदाय संचालित, महिला नेतृत्व युनिट, वारसा आणि संस्कृती, फार्म स्टे, कॉटेज, आयुवेर्दिक आणि वेलनेस, व्हर्नाक्यूलर आर्किटेक्चर, सर्व समावेशक पध्दती, क्लस्टर, जबाबदार पध्दती, ट्री हाऊस , व्हिला या श्रेणीतील होमस्टेंना नामांकन सादर करता येणार आहे. अधिक माहितीसाठी पर्यटन मंत्रालयाच्या www.rural.tourism.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

            इच्छूक गावांनी व होमस्टे स्पर्धकांनी पर्यटन मंत्रालयाने तयार केलेल्या www.rural.tourism.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 जानेवारी, 2024 पर्यंत अर्ज सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी, हिंगोली केले आहे.

******

 

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंती अब्दुल सत्तार  हे  दि. 26 जानेवारी, 2024 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 26 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 9.05 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून पोलीस परेड मैदानाकडे प्रयाण. सकाळी 9.15 वाजता पोलीस परेड मैदान हिंगोली येथे आगमन व येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन संचलन समारंभास उपस्थिती. सकाळी 10.00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.

*****


24 January, 2024

 

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 01 फेब्रुवारी रोजी

पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल कॅरिअर सेंटर (NCS) हिंगोली,  शिवाजी महाविद्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार, दिनांक 01 फेब्रुवारी, 2024 रोजी करण्यात आलेले आहे. हिंगोली जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा शिवाजी महाविद्यालय, कोथळज रोड, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यात धुत ट्रान्समिशन प्रा. लि. छत्रपती संभाजी नगर, पिपल्स ट्री ऑनलाईन प्रा.लि अमरावती, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक वाशिम, एक्साईड इंडस्ट्रीज लि, अहमदनगर, BSS मायक्रोफायनांस लि. सोलापूर, टॅलेनसेतू सव्हिस प्रा.लि पुणे, क्रिडेट एक्सेस ग्रामीण लि. हिंगोली, भारत फायनांन्स लि. हिंगोली, मनसा मोटर्स (महिंद्रा) हिंगोली, नवकिसान बायो प्लॉनटेक नांदेड, मनसा मोटर्स प्रा.लि (टाटा मोटर्स) हिंगोली, रोहन सिक्युरिटी फोर्स हिंगाली, MR टेक्नो सर्व्हे गुजरात, क्रिष्णा मारोती लिमिटेड गुजरात, एक्सेल प्लेसमेंटस प्रा. छत्रपती संभाजी नगर, एसबीआय लाईफ इंन्सुरंन्स हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली अशा महाराष्ट्रातील नामांकीत कंपनी व हिंगाली जिल्ह्यातील शासनाची विविध महामंडळामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, संत राहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था हिंगोली, जिल्ह्यातील सर्व महामंडळेही रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर या शैक्षणिक आर्हतेनुसार एक हजार पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in / www.ncs.gov.in  या संकेतस्थळावर अधिसुचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करुन स्वतः मुळ कागदपत्रासह शिवाजी महाविद्यालय, कोथळज रोड, हिंगोली येथे गुरुवार, दिनांक 01 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दुरध्वनीवर किंवा  7972888970, 7385924589 या भ्रमणध्वणीवर संपर्क साधावा, असे अवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

*******

 

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य

डॉ. गोविंद काळे शनिवारी हिंगोली दौऱ्यावर

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 :  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद हरिबा काळे हे शनिवार, दि. 27 जानेवारी, 2024 रोजी हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

प्रा. डॉ. काळे यांच्या उपस्थितीत दि. 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्यासमवेत मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महसूल विभागातील जमीन अधिग्रहणाविषयी बैठक व सर्वेक्षणाचा आढावा बैठक होणार आहे.

******

 

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत इसापूर रमना येथे

बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती

 



हिंगोली (जिमाका), दि. 24 :  हिंगोली तालुक्यातील मौजे इसापुर रमना येथे श्री शिवाजी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीर जि. प. मा. शाळेमध्ये संपन्न होत आहे. या अनुषंगाने शिबीरामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे या व्याख्याते म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बाल विवाह प्रतिबंध या विषयावर पथ नाट्य सादर केले. त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बाल विवाह निर्मूलन या विषयावर बाल विवाह म्हणजे काय, बालविवाहाची कारणे, दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार मुलीच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची 21 वर्ष पुर्ण होण्याच्या आगोदर लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे विवाह बेकायदा ठरतात आणि अशा गुन्ह्याम रु एक लाख दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असुन या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वानी आपापल्या कार्यक्षेत्रात वालविवाह होणार नाहीत व याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सांगितले. जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी सर्व उपस्थितांकडून बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचे वाचन करुन शपथ घेण्यात आली. चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदिप कोल्हे यांनी बालकांसाठी तात्काळ मदत करणारा चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 या टोलफ्री क्रमांकावर माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता याची गोपनीयता राखली जाते. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बाल विवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा पोलीस हेल्प लाइन क्रमांक 112 यावर माहिती द्यावी, असे उपस्थित गावकऱ्यांना सांगितले.

शेवटी या कार्यक्रमासाठी चाईल्ड हेल्पलाईन समुपदेशक अंकुर पाटोडे, तसेच श्री शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. संगीता मुंढे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सुनिल कांबळे, कनिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बळीराम शिंदे, प्रा. संजय चव्हाण व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, शाळेतील विद्याथों, किशोरवयीन मुले-मुली व गावातील ग्रामस्थ इ. उपस्थित होते.

******

 

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 :  राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम-2024 च्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आज दि. 24 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या अध्यक्षतेखाली प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

ही प्रभातफेरी तहसील कार्यालय हिंगोली येथून सकाळी 8.00 वाजता प्रारंभ होऊन पोस्ट ऑफिस-जवाहर रोड-इंदिरा गांधी चौक ते रामलीला मैदानावर समारोप करण्यात आला. या प्रभातफेरीमध्ये जिल्हा परिषद कन्या प्रशाला, विद्यानिकेतन शाळा, खाकीबाबा इंग्लीश स्कूल, तुळसाबाई माध्यमिक विद्यालय, बहुविध प्रशाला या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, तालुका क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, नायब तहसीलदार एम. एस. खंदारे, सी.आर. गोळेगावकर, टी.उी. कुबडे, के.एन. पोटे, वाबळे, संतोष जाधव, शेषराव असोले, शिवाजी इंगोले, रामप्रसाद व्यवहारे, श्रीमती वारे, सोनवणे, बेले, दिपक शिंदे, रहिम, सानप उपस्थित होते.

*****

 

खेर्डा व जांभरुण आंध येथील पात्र वनहक्क धारकांना प्रमाणपत्राचे वाटप

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 24 :  प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय  महाअभियान (PM_JANMAN) अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 15 जानेवारी, 2024 रोजी  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  

यावेळी  वन हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यातील हिंगोली उपविभागातील  मौजे खेर्डा येथील 04 व जांभरुण आंध येथील 03 पात्र वनहक्क धारकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास सदस्य सचिव तथा उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, सदस्य तथा कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास  प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे, वन हक्काचे काम पाहणारे जिल्हा सहायक व वनहक्क धारक शिवप्रसाद आवचार उपस्थित होते.

*****  

 

राष्ट्रीय मतदार दिवस : मतदार जागृती

 

                भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी, 1950 रोजी झाली असून स्थापनेचा25 जानेवारी’ हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा आणि त्यातून बळकट लोकशाहीतील मोठा सहभाग  नोंदवता यावा हा आहे.

                भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्वत्रिक तथा पोट निवडणुकीत मतदानाचा मुलभूत हक्क बहाल करण्यात आलेला आहे. त्यामुळे मतदार यादीत नांव नोंदवून मतदान करण्याचे कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करण्याचा वाटा उचलण्याची संधी प्रत्येक भरतीय नागरिकाला आहे.

                भारतातील युवा मतदाराना सक्रीय राजनीती मध्ये भाग घेण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता सन 2011 पासून भारत निवडणूक आयोगाने25 जानेवारी’ हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून दरवर्षी साजरा करण्यात यावा, असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार यावर्षी 14 वा राष्ट्रीय मतदान दिवस साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाची  यंदाची  थीम ‘मतदानाइतकं अमूल्य नसे काही बजावू हमखास मताधिकार आम्ही’ त्यांना भविष्यात निवडणुकांच्या वेळी  सक्रीय आणि सहभागी करुन घेणे.

देशातील प्रत्येक नागरिकास आपण या देशाचे सुजाण नागरिक असून मतदान करणे हा आपला मुलभूत हक्क असल्याची  जाणीव  होण्याकरीता या राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व आहे. या 'राष्ट्रीय मतदार दिवस' निमित्त 18 वर्ष पूर्ण होत असलेल्या आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवयुवक युवतींना मतदारांना तसेच ज्या नागरिकांनी अद्यापही यादीत आपले नांव नोंदविले नाही अशा नागरिकांना मतदार यादीत आपले नांव नोंदवून ओळख पत्र भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येते. मतदार म्हणुन नाव नोंदवण्यासाठी जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला याप्रमाणे वर्षभरात 4 संधी असणार आहेत. जर तुम्ही 2024 च्या एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्याच्या आधी  18 वर्षाचे होणार असाल तर निरंतर अद्यतन प्रक्रियेत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अर्ज क्र. 6 भरुन आगाऊ मतदार नोंदणी करु शकता.

                दिनांक 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर अधारीत दि. 23 जानेवारी, 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार हिंगोली जिल्ह्यात तीन मतदार संघामध्ये एकूण 9 लाख 46 हजार 167 मतदार आहेत. त्यापैकी स्त्री मतदार 4 लाख 51 हजार 308 तर पुरुष मतदार 4 लाख 94 हजार 852 आणि तृतीयपंथी 07 मतदार आहेत. या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त स्त्री मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न आहे. कारण जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या कमी असून ज्या महिलांनी मतदार यादीत नांव नोंदविले नाही त्यांनी आता या कार्यक्रमानिमित्त महिला मतदारांनी नावे नोंदविली पाहिजेत.

या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर, 2023 च्या प्रारूप मतदार यादीत 21 हजार 867 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच 13 हजार 758 मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 8 हजार 109  मतदारांची निव्वळ वाढ (Net Addition) होऊन एकूण मतदारांची संख्या 9 लाख 46 हजार 167 इतकी झालेली आहे. त्यानुसार 3 हजार 386 पुरुष मतदारांची, 4 हजार 722 स्त्री मतदारांची आणि 5 तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झालेली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका इत्यादींच्या सहकार्यामुळे यावर्षी महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर 908 वरुन 912 इतके झाले आहे.

                या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये 18 ते 19 या वयोगटामध्ये 8 हजार 433 मतदारांची नव्याने भर पडली आहे, तसेच 20 ते 29 या वयोगटात 8 हजार 438 मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारुप यादीत 18 ते 19 या वयोगटाची मतदार संख्या 5 हजार 357 (0.57%) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत 13 हजार 790  (1.46%) इतकी झालेली आहे. तर 20 ते 29 वयोगटाची प्रारुप यादीतील मतदार संख्या 1 लाख 94 हजार 878 (20.77%) होती, ती अंतिम यादीत 2 लाख 03 हजार 320 (21.49%) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

 मतदार यादी जितकी सर्वसमावेशक तितकी वंचित समाजघटक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये मतदार नोंदणीबरोबरच आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला यांचेही या जमातीतील लोकांना वाटप करण्यात आले आहे. औंढा नागनाथ तालुक्यात मुर्तीजापुर सावंगी, अंजनवाडा तांडा, वसमत तालुक्यात आडगांव, हिंगोली तालुक्यात कोथळज ईत्यादी ठिकाणी ही शिबिरे घेण्यात आली होती. त्यामध्ये भटक्या व विमुक्त जमातीच्या एकूण 410  लोकांची मतदार नोंदणी करण्यात आली.

                यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी  1 जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या बहु अर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑक्टोबर 2024 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवांनाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्वनोंदणी (Advance Registration) करता आली. पूर्वनोंदणीचे एकूण 5 हजार 933 अर्ज (1 एप्रिल- 1189, 1 जुलै- 2518 , 1 ऑक्टोबर- 2226 ) प्राप्त झालेले आहेत. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वनोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन (Continuous Updataion) प्रक्रिया सुरु असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे.

                वयाची 18 वर्ष पुर्ण झालेल्या अधिकाधिक तरुणांनी छायाचित्र मतदार याद्यांचा सततचा पुनरिक्षण कार्यक्रम- 2024 च्या कालावधीत आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी, तसेच मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी, मतदार यादीत दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी संबधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)/ संबंधीत तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी/ संबंधीत उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावेत किंवा http://www.nvsp.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन सादर करावेत. अधिक माहितीसाठी https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. या मतदार दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त नवीन मतदारांना निमंत्रित करण्यात येईल. त्यांना या कार्यक्रमात मतदार ओळखपत्र, बिल्ले, प्रदान करुन प्रतिज्ञा दिली जाणार आहे. निबंध स्पर्धा, सायकल रॅली, पथनाट्य जागृती अभियान, लोककला लोकनृत्य, प्रदर्शन, फलक, घोषवाक्य, सामान्यज्ञान स्पर्धा छायाचित्र स्पर्धा, सांस्कृतिक मंडळे, भजन मंडळे, महिला युवा मंडळे, महिला क्रीडा मंडळे, बचत गट, या संस्थांच्या मदतीने, जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिवसाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

                येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण आपल्या लोक प्रतिनीधीस मतदान करण्याची संधी गमावणे म्हणजे आपण आपला भारतीय नागरिक असल्याचा  हक्क गमावल्यासारखे आहे ! तर चला ! आपण सर्व भारतीय नागरिक या राष्ट्रीय  मतदार  दिवसानिमत्त आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुन आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सज्ज होऊ या…!

 

अरुण सूर्यवंशी

जिल्हा माहिती अधिकारी,

हिंगोली

****