30 December, 2016

सिंचन विहिरींकरिता पात्र लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीमार्फत अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 30 :- समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्याकरिता 10 हजार सिंचन विहिरीचे उद्दिष्ट महात्मा गांधी नरेगा अंतर्गत शासनाकडून दि. 28 ऑक्टोबर, 2016 च्या पत्रकान्वये प्राप्त झाले आहे. यानुसार यापुर्वी दि. 07 नोव्हेंबर, 2016 रोजी सर्व शेतकऱ्यांचे माहितीसाठी वृत्तपत्रात बातमी प्रसिध्द केली आहे. सदर वैयक्तिक लाभाच्या कामाच्या लाभार्थी निवडीसाठी ग्रामस्तरावर विशेष ग्रामसभांचे आयोजन करून त्यामध्ये ग्रामसभेने निवडलेल्या पात्र लाभार्थ्यांचे विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायतीने भरून द्यावयाचे आहेत. ग्रामपंचायतीने सदर प्राप्त प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पंचायत समिती कडे सादर करावयाचे आहेत. तांत्रिक मान्यता प्राप्त प्रस्तावाना गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी प्रशासकीय मान्यता द्यावयाची आहे. प्रशासकीय मान्यता प्राप्त सिंचन विहिरीच्या कामांची संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय आखणी करुन व प्रत्यक्ष कामास सुरूवात करून दि. 15 मार्च, 2017 पर्यंत कामे पुर्ण करून काम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र ऑनलाईन करावयाचे आहेत.
सिंचन विहिरींच्या लाभार्थी निवडीची प्रक्रिया शासन नियमाप्रमाणे पारदर्शकरित्या करण्यात येणार असून यासाठी लाभार्थ्यांनी दलालामार्फत, एजंटामार्फत देण्यात येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या आमिषांना, भुलथापांना बळी पडु नये, सर्व इच्छूक शेतकरी यांनी सिंचन विहिरीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत काही अडचणी असल्यास किंवा काही तक्रारी असल्यास तसे जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो शाखा) हिंगोलीशी संपर्क साधावा व लेखी तक्रारी दाखल केल्यास सदर तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी केली जाईल व दोषी अधिकारी/कर्मचारी यांच्या विरुध्द शिस्त भंगाची कार्यवाही केली जाईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.  


*****
सोलापूर येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

हिंगोली, दि. 30 :- सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सोलापूर येथे हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारासाठी दि. 05 फेब्रुवारी, 2017 ते 18 फेब्रुवारी, 2017 रोजी सोल्जर नर्सिंग असिस्टेंट (ए.एम.सी.) व सोल्जर टेकनिकल ड्रेंसर (आर.व्ही.सी.) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष हिंगोली यांचेशी संपर्क साधावा व जास्तीत-जास्त उमेदवारांनी भरतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****
रयत शिक्षण संस्थेतर्फे वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

हिंगोली, दि. 30 :- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दिनांक 23 ते 25 जानेवारी, 2017 या कालावधीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे तसेच दि. 19 ते 21 जानेवारी, 2017 या कालावधीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धांचे यशवंतराव चव्हाण इस्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे आयोजन केलेले आहे. या स्पर्धांची माहितीपत्रके सर्वत्र पाठविली असून ती रयत शिक्षण संस्थेच्या www.rayatshikshan.eduwww.erayat.org या वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहेत. या माहितीपत्रकात स्पर्धेविषयीचे नियम, अटी व तपशील दिलेला आहे.
या स्पर्धांच्या प्रवेशिका (रजिस्ट्रेशन) स्वीकारण्याची अंतिम तारीख वक्तृत्व स्पर्धेसाठी दि. 16 जानेवारी, 2017 असून प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी दि. 15 जानेवारी, 2017 अशी आहे. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी कर्मवीर विद्याप्रबोधिनी, सातारा फोन नं. 02162-231074 वर संपर्क साधावा. स्पर्धांचे विषय खालीलप्रमाणे आहे.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे विषय. (वर्ष 30 वे) :- 1) डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रेरणास्थाने, 2) आजच्या तरुणांपुढील आव्हाने, 3) स्वातंत्र्याची सत्तर वर्षे आणि माझ्या स्वप्नातील भारत, 4) सामान्य जनतेची हरवली शांती.. म्हणे देशात आली अर्थक्रांती !, 5) जीवनगाणे गातच रहावे…
पारितोषिके : प्रथम रु. 7 हजार व स्मृतीचिन्ह, व्दितीय रु. 6 हजार व स्मृतीचिन्ह, तृतीय रु. 5 हजार व स्मृतीचिन्ह उत्तेजनार्थ ( एकूण 10 ) प्रत्येकी रु. 2 हजार रु. व स्मृतीचिन्ह, सांघिक चषक – 1 ( टीमसाठी ).
            पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा अभ्यासक्रम. (वर्ष 12 वे) :- अभ्यासक्रम :-  इतिहास, महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक, भारताचा भूगोल, महाराष्ट्र व भारत - राज्‍यव्यवस्था आणि शासन, अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र, मूलभूत विज्ञान, कृषी, पर्यावरण, मानवसंसाधन विकास, मानवी हक्क, तंत्रज्ञान, क्रीडा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार व त्यांचे स्वरूप, चालू घडामोडी, साहित्य व संस्कृती कला, ऑडियो व व्हिडीओ प्रश्न.
            पारितोषिके : प्रथम रु. 7 हजार व स्मृतीचिन्ह, व्दितीय रु. 6 हजार व स्मृतीचिन्ह, 3) तृतीय रु. 5 हजार व स्मृतीचिन्ह उत्तेजनार्थ रु. 3 हजार रु. व स्मृतीचिन्ह, उत्तेजनार्थ रु. 2 हजार रु. व स्मृतीचिन्ह.

***** 

29 December, 2016

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत

हिंगोली, दि. 29 :- जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतजी पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने काढण्याकरिता सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या समाप्ती नंतरच्या लगत अडीच वर्षाच्या कालावधीसाठी पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण पंचायत समितीनिहाय सोडत पध्दतीने दिनांक 03 जानेवारी, 2017 रोजी रोजी सकाळी 12-00 वाजता जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यालयात काढण्यात येणार आहे.
मा. खासदार / मा. आमदार , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व इतर सदस्य तसेच पंचायत समितीचे सर्व सदस्य व सर्व पक्ष अध्ययक्ष व इतर प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

*****
घरकुल लाभार्थ्यांची यादी एनआयसीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द

हिंगोली, दि. 29 :- सन 2016-17 या वर्षात मंजुर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, शबरी आवास, पारधी आवास, रमाई आवास योजनेतील मंजुर झालेले प्रपत्र ब ची यादी एनआयसी च्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदरील मंजुर विविध योजनेतील मंजुर लाभधारकांची यादी सर्व ग्रामपंचायत / सर्व पंचायत समिती / जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली येथील नोटीस बोर्डवर डकविण्यात आली आहे. या योजनेतील मंजुर लाभधारकांनी आपली नावे सदर ठिकाणी पहावे. व तसेच मंजुर झालेल्या लाभधारकांचे घरकुल मंजुर झाल्याबाबतचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र.
तालुका
योजना
लाभार्थी संख्या
प्र.मं.आ.यो-ग्रा.
शबरी आवास
पारधी आवास
रमाई आवास
1
औंढा ना.
560
60
03
158
781
2
वसमत
571
18
00
237
826
3
हिंगोली
525
30
09
199
763
4
कळमनुरी
862
109
01
229
1201
5
सेनगांव
648
10
00
246
904
एकूण
3166
227
13
1069
4475


***** 
जिल्हा शासकीय रुग्णालयात
पीसीपीएनडीटीची जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न
हिंगोली, दि. 29 :-  येथील जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात जिल्हा शल्य चिकित्सक आकाश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. रोडगे, जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रतिनिधी विवेक डावरे, सामाजिक कार्यकर्ता धरमचंद्र बडेरा, श्रीमती आरती मार्डीकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. डी.एन. मोरे आदिंची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक आकाश कुलकर्णी यांनी पीसीपीएनडीटी विभागाच्या कामकाजाचा आढावा व नवीन प्रस्तावित सोनोग्राफी केंद्रास मान्यतेसंदर्भात आणि इतर विषयांवर चर्चा करण्यात आली . तसेच जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ व हिंगोली येथे पशुवैद्यकीय सोनोग्राफी केंद्र मिळण्याबाबत प्रस्तावाबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.
तसेच नवीन सोनोग्राफी मशिन खरेदी करण्याकरिता वरिष्ठ कार्यालयाकडून योग्य ते मार्गदर्शनही मागविण्यात यावे , याबाबतही यावेळी सुचना देण्यात आल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता श्रीमती आरती मार्डीकर व धरमचंद्र बडेरा यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ कार्यक्रम आयोजनाबाबतही यावेळी सुचविण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक यांनी शैक्षणिक पात्रता व प्राप्त झालेले सोनोग्राफी केंद्राचे प्रस्तावाबाबत योग्य तो विचार करण्याबाबतही यावेळी या बैठकीत चर्चा करण्यात करण्यात आली .
तसेच सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड. श्रीमती सुकेशिनी ढवळे यांनी मानले.

*****

28 December, 2016

व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ
याचेमार्फत प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 28 :- महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांचेमार्फत राबविण्यात येत असलेले प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यांकरिता इच्छूक संस्थांकडून / व्यवस्थापनांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी दि. 15 डिसेंबर, 2016 ते दि. 16 जानेवारी, 2017 पर्यंत नियमित शुल्कासह व दि. 17 जानेवारी, 2017 पर्यंत विलंब शुल्कासह आहे.
उपरोक्त बाबतीत संबंधित अर्ज व माहितीपुस्तिका मंडळाचे संकेतस्थळावर www.msbve.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इच्छूक संस्थांनी संकेतस्थळावर सन 2017-18 साठी प्रसिध्द केलेल्या माहिती पुस्तिकेमधून आवश्यक परिपुर्ण माहिती भरलेला अर्ज व त्यासोबत आवश्यक ते कागदपत्रे, चलन (अर्ज रक्कम व प्रक्रिया शुल्क रक्कमेचे), इत्यादी संबंधीत जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, यांचेकडे वरील कालावधीत जमा करावयाचे आहे.
अधिक माहितीसाठी संबंधीत जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****
सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर
सघन कुक्कुट विकास योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 28 :- राज्यातील 10 जिल्ह्यामध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास योजने अंतर्गत हिंगोली जिल्हयाचा समावेश आहे तरी या योजने अंतर्गत जिल्ह्यामध्ये दोन सघन कुक्कुट गटाची स्थापना करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेमये ज्या पशुपालकांकडे स्वत:चे लघु अंडी उबवणी यंत्र (सेंटर व हेंचर) तसेच स्वत:च्या मालकीची 2 हजार 500 चौरस फुट जागा असावी अशा पशुपालकांना प्राधान्य आहे.
सदरील योजनेसाठी सर्व पशुपालकांनी दि. 02 जानेवारी, 2017 ते 01 फेब्रुवारी, 2017 या कालावधीत विहित नमुन्यामध्ये तालुकास्तरावर पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन हिंगोलीचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

***** 
जिल्हा वार्षिक योजनेतून 163 कोटींच्या प्रारूप आराखडयास मान्यता

हिंगोली, दि.28: जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेतंर्गत सन 2017-18 या वर्षासाठी अंमलबजावणीकरीता विभागांनी विविध योजनासांठी 330 कोटी 45 लाख 45 हजार एवढी मागणी केली असता जिल्हा नियोजन समितीने प्रत्यक्ष 163 कोटी 85 लाख 89 हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीस यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती लक्ष्मीबाई यशवंते, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, डॉ. जयप्रकाश मुंदडा, डॉ. संतोष टारफे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी नियोजन समिती सदस्य यांची उपस्थिती होती.
     यावेळी  पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्वच्छ भारत अभियान, सिंचन, जलसंधारण, ग्रामीण रस्त्यांच्या कामांना सन 2017-18 च्या आराखड्यात प्राधान्य देण्यात आले. उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी वेळेत खर्च करावा. तसेच सन 2016-17 आराखड्यातील विविध कामांवर झालेल्या खर्चाचा तसेच नियोजित प्रस्तावित खर्चाचा देखील आढावा घेतला. तसेच सर्वसाधारण वार्षिक योजना, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत नाविन्यपूर्ण योजना, केंद्र पुरस्कृत योजनांसाठी झालेल्या खर्चाचा व नियोजित खर्चाचा आढावा घेतला. वन, पर्यटन विकास, शिक्षण, व्यवसाय शिक्षण, जलसंधारण, आरोग्य, ग्रामीण नळ पाणीपुरवठा, स्वच्छ भारत अभियान आदीबाबतही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. जिल्हा परिषद निवडणुक आचारसंहितेचा विचार करुन सर्व विभागप्रमुखांनी योग्य नियोजन करुन कामांना गती द्यावी अशा सूचना हि पालकमंत्री कांबळे यांनी यावेळी दिल्या.
तसेच आमदारांनी देखील आमदार निधीचा उपयोग आपल्या कार्यक्षेत्रातील विकासकामाकरीता करावा. सन 2017-18 साठी सर्वसाधारण वार्षिक योजनाकरीता 85 कोटी 73 लाख तर अनुसूचित जाती उपयोजनाकरीता 48 कोटी 95 लाख 59 हजार आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत 29 कोटी 17 लाख 30 हजार अशा एकुण 163 कोटी 85 लाख 89 हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, यांच्यासह विविध विभागातील विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
*****



24 December, 2016

जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्याने डिजिटल पेमेंट
 कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 24 :- डिजिटल पेमेंट कॅशलेस इकॉनामी व प्रदाने या विषयावर स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा हिंगोली यांचे प्रतिनिधी मार्फत दि. 27 डिसेंबर, 2016 रोजी दुपारी 3.00 वाजता Digital Payment या विषयावर Cashless Economy व प्रदाने या विषयावर स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा हिंगोली यांचे प्रतिनिधी मार्फत जुन्या पोलीस अधिक्षक कार्यालयातील रेल्वे स्टेशन रोड सभागृहामध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून सदर कार्यशाळेस जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी तु. ल. भिसे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

23 December, 2016

विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 23 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या इ. 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती , इ. 5 वी ते 10 वी च्या अनुसूचित जाती / विजाभज / विमाप्र इ. प्रवर्गांतील विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती तसेच सर्व प्रवर्गातील अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती इत्यादी शिष्यवृत्ती दिल्या जातात. सदरील शिष्यवृत्तींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे व आधार क्रमांक हा विद्यार्थ्यांच्या स्वत:च्या बँक खात्याशी संलग्न करुन त्याची पोचपावती जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, हिंगोली येथे सादर करणे अनिवार्य आहे. आधारक्रमांक बँक खात्याशी संलग्न न केल्यास अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार नाही.
तसेच शाळांनी मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांचे ऑॅनलाईन अर्ज भरावेत. भरलेले अर्ज या कार्यालयाकडे ऑनलाईन सादर करून अर्जाची यादी (हार्ड कॉपी), आधार संलग्नीकरण पोचपावती, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व उपरोक्त त्या-त्या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे मुख्याध्यापकांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, हिंगोली येथे तात्काळ दाखल करावेत. अन्यथा मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आ. ब. कुंभारगावे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

*****

22 December, 2016

मुद्रा बँक योजनेतंर्गत विद्यार्थी-विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज तात्काळ मंजूर करावे

*जिल्ह्यातील  1265 लाभार्थ्यांना 19 कोटी 68 लाख कर्ज वितरण*
                                                                                        ---जिल्हाधिकारी अनिल भंडारी
            हिंगोली, दि.22: केंद्र शासनाने सुरु केलेल्या मुद्रा बँक योजनेतंर्गत जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या भविष्याचा विचार संवेदनशीलरित्या करुन सर्व बँक व्यवस्थापकांनी तात्काळ शैक्षणिक कर्ज मंजूर करण्याच्या सूचना मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिल्या.
             येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.  यावेळी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, आमदार रामराव वडकुते, जिल्हा परिषदेचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईमोद्दील कुरेशी, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक महेश मदान आणि जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांची उपस्थिती होती.    
            यावेळी जिल्हाधिकारी भंडारी पुढे म्हणाले की, जिल्हास्तरीय समितीने जिल्ह्यातील सर्व बँकांना शिशु-30,                                           किशोर -20 व तरुण-10 याप्रमाणे गटनिहाय मुद्रा बँक योजनातंर्गत कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून दिले असून, काही बँकानी यामध्ये चांगले काम केल आहे. इतर बँकांनी देखील त्यांना ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा देखील मुद्रा बँक योजनेतंर्गत समावेश करण्यात आला असून त्यांनी देखील कर्ज वितरणांचे उद्दिष्ट वेळेत पुर्ण करावे.
            तसेच मुद्रा बँक अंतर्गत बँकांनी लाभार्थ्यांचे नामंजूर केलेल्या अर्जाबाबतची माहिती जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक यांच्यामार्फत समितीकडे सादर करावीत. बँकांनी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त तरुणांना या योजनेचा लाभ देवून नवीन उद्योग-व्यवसाय उभे करण्यासाठी प्रयन्त करावा अशा सूचना ही श्री. भंडारी यांनी यावेळी दिल्या.
         जिल्ह्यातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुद्रा बँक योजनेतंर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील  शिशु , किशोर आणि तरुण या गटातील एकूण 1 हजार 265 लाभार्थ्यांना 19 कोटी 68 लाख रुपय कर्जाचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक महेश मदान यांनी यावेळी दिली.
            अलाहाबाद बँक -24 लाभार्थ्यांना 34 लाख  , बँक ऑफ बडोदा -37 लाभार्थ्यांना 35 लाख , बँक ऑफ इंडिया -93 लाभार्थ्यांना 48 लाख , बँक ऑफ महाराष्ट्र - 76 लाभार्थ्यांना 83 लाख,  कॅनडा बँक 24 लाभार्थ्यांना 48 लाख,   सेंट्रल बँक ऑफ इंडिया -10 लाभार्थ्यांना 5 लाख, देना बँक -02 लाभार्थ्यांना 1 लाख, आयडीबीआय बँक - 18 लाभार्थ्यांना 60 लाख, ओरियटंल बँक ऑफ कॉमर्स-03 लाभार्थ्यांना 2 लाख, पंजाब नॅशनल बँक-01 लाभार्थ्यांना 05 लाख,   स्टेट बँक ऑफ हैद्राबाद-481 लाभार्थ्यांना 966 लाख,  स्टेट बँक ऑफ इंडिया-162 लाभार्थ्यांना 246 लाख,   सिंडिकेट बँक -57 लाभार्थ्यांना 72 लाख, युको बँक - 09 लाभार्थ्यांना 10 लाख,  युनियन बँक ऑफ इंडिया -70 लाभार्थ्यांना 56 लाख, ॲक्सिस बँक -09 लाभार्थ्यांना 2 लाख,  महाराष्ट्र ग्रामीण बँक- 188 लाभार्थ्यांना 296 लाख, असे एकूण 1265 लाभार्थ्यांना 19 कोटी 68 लाख 29 हजार रुपये मुद्रा बँक योजनेतंर्गत या बँकांना कर्ज वितरण केले आहे.    
            यावेळी बैठकीस समितीचे शासकीय अशासकीय सदस्यांसह बँक व्यवस्थापकांची उपस्थिती होती .
***
सामाजिक न्याय विभगातील बाह्यस्त्रोत कर्मचारी यांची कार्यशाळा संपन्न
हिंगोली, दि. 22 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,हिंगोली यांनी नवोउपक्रम म्हणुन बाहयस्त्रोत कर्मचारी यांची कार्यशाळा 21 डिसेंबर, 2016 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथील सभागृहामध्ये संपन्न झाली.
सदर कार्यशाळेस सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण डॉ. सी. के. कुलाल, विशेष अधिकारी, (शा.नि.शा.) श्रीमती जी. डी. गुठ्ठे, समाज कल्याण निरीक्षक टी. डी. भराड व विभागीय व्यवस्थापक श्री. कदम, बोराडे व चंदनशिवे तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृह व शासकीय निवासीशाळेतील येथील बाह्यस्त्रोतद्वारे नियुक्त बी. व्हि. जी. आणि क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी  उपस्थित होते.  
या कार्यशाळेत कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच वस्तीगृहात निर्माण होणाऱ्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांचेकडून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच सदर कर्मचाऱ्यांना व्यक्तीमत्व विकास व कौशल्य विकास या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

*****
राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 22 :- राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार - 2016 करिता, 30 वर्षाखालील ज्या उद्योजकांनी आपला उद्योग उत्कृष्टपणे चालविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची नोंद घेण्यासाठी, उद्योजकांनी पुरस्कार मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज www.neas.in पोर्टलवर दि. 25डिसेंबर, 2016 पूर्वी करण्यात यावे, याकरिता पात्र व इच्छूक उद्योजकांकडून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

                                                                    *****  

21 December, 2016

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी व्हावे
                                                                                           --- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
        हिंगोली,दि.21:- मुंबई येथे अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपुजन व भूमिपुजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, दि. 24 डिसेंबर 2016 रोजी होणार आहे. या जलपुजन आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले.  
            जिल्हाधिकारी श्री. भंडारी पुढे म्हणाले की, राज्य शासनाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय 2002 मध्ये घेतला होता. त्याअनुषंगाने मुंबई येथील राजभवना लगतच्या अरबी समुद्रातील सुमारे 15.96 हेक्टर बेटावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या जलपुजन आणि भूमिपुजन सोहळ्यासाठी राज्यातील  सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरील पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे.
            या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2300 कोटी रुपयांची कामे होणार आहे. या कामात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा, महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकाचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी व जनतेसाठी जेट्टी, सुरक्षा विषयक व्यवस्था, आदीचा याबत समावेश असणार आहे. येत्या तीन वर्षात स्मारक पुर्ण करण्याचे शासनाचे नियोजन असून ते येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांचे जीवनमुल्य प्रदर्शित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्र, पर्यटकांसाठी पर्यटनस्थळचा देखील समावेश स्मारकात असणार आहे.  
            महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असणार आहे. या स्मारकमुळे महाराष्ट्राची तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब नागरिकांना अनुभवता येणार आहे.


****
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेत
 प्रतिनियुक्तीवर अर्ज करण्याचे आवाहन
            हिंगोली,दि.21: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत दि. 17 ऑक्टोबर, 2016 च्या शासन निर्णयान्वये जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, हिंगोली (DIECPD)  पुर्वीचे DIET येथे निवड समितीव्दारे प्रतिनियुक्तीने जागा  भरल्या जाणार आहेत.
            तरी इच्छूक शिक्षक (प्राथमिक व माध्यमिक) , केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी (गट-क) यांच्याकडून www.tinyurl.com/applydiecpd या लिंक वर अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छूक उमेदवारांनी दि. 30 डिसेंबर, 2016 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, हिंगोलीचे प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****
भारत सरकार शिष्यवृत्ती संदर्भात जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक
            हिंगोली,दि.21: भारत सरकार शिष्यवृत्ती संदर्भात दि. 29 डिसेंबर, 2016 रोजी दु. 12.00 वाजता जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक आयोजित केलेली असून सदर बैठकीमध्ये सन 2016-17 च्या भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क योजनेचा महाविद्यालयनिहाय भरलेल्या अर्जांचा तसेच सन 2014-15 व 2015-16 च्या प्रलंबित प्रकरणाबाबत आढावा घेण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन प्रक्रियेसंदर्भात आवश्यक असलेली संपुर्ण माहिती देण्यात येऊन महाविद्यालयनिहाय असलेल्या अडचणी लेखी स्वरूपात स्विकारण्यात येणार आहेत. आणि सन 2015-16 पर्यंत मंजूर झालेल्या शिष्यवृत्ती व शिक्षण फी व परीक्षा फी या योजनांच्या या कार्यालयामध्ये असलेल्या अर्जांच्या मुळ प्रती महाविद्यालयास हस्तांतरीत करण्यात येणार आहेत.
            तरी दि. 29 डिसेंबर, 2016 रोजी दु. 12.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे बैठकीसाठी ज्या महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा शिष्यवृत्ती संदर्भात काम पहाणारे कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, अशा महाविद्यालयाचे विद्यार्थी समाज कल्याण विभागामार्फत कोणत्याही शैक्षणिक योजनेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य व संबंधित विद्यार्थी यांची राहिल, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

20 December, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात कॅशलेस पेमेंट विषयक कार्यशाळा संपन्न
            हिंगोली,दि.20: जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात व्यापारी आणि महाऑनलाईन केंद्र संचालक ‘कॅशलेस पेमेंट’ विषयक आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत बँक कार्ड, युएसएसडी, एईपीएस, युपीआई आणि पीओएसच्या माध्यमातून कशाप्रकारे आर्थिक व्यवहार करता येईल याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणात नागरिक, व्यापारी आणि इतर सेवा देणाऱ्यांच्या मोबाईल मधील एप्लीकेशन द्वारे कशाप्रकारे आर्थिक देवाण-घेवाण करता येईल याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना कॅशलेस पेमेंट विषयक सक्षम करून दोन यशस्वीरित्या आर्थिक व्यवहार केल्यास दहा रुपये आणि व्यापाऱ्यांना कॅशलेस पेमेंट बाबतीत सक्षम केल्यास महाऑनलाईन केंद्र संचालकांना शंभर रुपये प्रोत्साहन पर भत्ता देण्यात येणार आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी मागर्दर्शन करताना म्हणाले की ‘कॅशलेस पेमेंट’ चा वापर करणे ही काळाची गरज झाली आहे. दैनंदिन व्यवहारात कॅशलेस पेमेंटचा वापरासाठी बँकांनी मोबाईल ॲप तयार केले असून, या ॲपच्या साह्याने कॅशलेस व्यवहार करण्यास मदत होणार आहे. सर्व महाऑनलाईन धारकांनी आपल्या क्षेत्रातील नागरिक आणि व्यापारी यांचे बँक खाते हे आधारशी आणि मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून घ्यावे. तसेच बँक कार्ड , युएसएसडी, एईपीएस, युपीआई आणि पीओएस या सुविधांद्वारे कॅशलेस पेमेंटद्वारे दैनंदिन व्यवहार करता येईल याची माहिती दिली.
            कार्यशाळेत महाऑनलाईनचे जिल्हा समन्वयक सागर भूतडा यांनी कॅशलेस पेमेंट विषयक सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महाऑनलाईन केंद्र संचालकांना 121 पीओएस मशीनचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश मदान तसेच जिल्ह्यातील व्यापारी आणि महाऑनलाईन केंद्र संचालक यांची उपस्थिती  होती.

*****