18 December, 2016

विदर्भ आणि मराठवाड्यातील पाच हजार गावांचा शाश्वत शेतीच्या माध्यमातून कायापालट करणार

* जागतिक बँकेकडून 4 हजार कोटी मंजूर *

---मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिंगोली, दि.18:- शेतकरी आणि शेतमजूरांच्या जीवनात समग्र परिवर्तन करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील पाच हजार गावांचा शाश्वत शेतीच्या माध्यमातून कायापालट करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे दिली.
            हिंगोली येथील सेनगाव तालूक्यातील कडोळी येथे राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुरेश जोशी, पालकमंत्री दिलीप कांबळे, आमदार तान्हाजी मुटकूळे, हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, कडोळी ग्रामच्या सरपंच उषाताई माहोरकर, पंचायत समिती सदस्य अंजीलताई शांडील्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा आणि विदर्भातील शाश्वत शेती, शेतीमध्ये गंतवणूक आणि शेतीमध्ये परिवर्तन व्हावे यासाठी जागतिक बँकेकडे सादर केलेल्या अशा प्रकारच्या प्रस्तावास पहिल्यांदाच 4 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे असे सांगुन मुख्यमंत्री म्हणाले की, या योजनेमुळे शेत जमीनीतील मृदा सुधारणा, सुक्ष्म जलसंधारणाची व्यवस्था, ठिबक सिंचन, ज्या पीकांवर वातावरणांचा परिणाम होणार नाही असे नवीन बीज तयार करणे, त्या पीकांसाठी यांत्रीकी व्यवस्था आणि मार्केट पर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करणे असा एकात्मिक विकासाचा कार्यक्रम शासनाने तयार केला असून, या प्रकल्पाचे नांव ‘नानाजी देशमुख ग्राम उदय योजना’ असे देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागातील 12 बलुतेदार तथा कारागिरांच्या कौशल्यास चालना दिल्यास गाव समृध्द होऊ शकते. पंतप्रधानानी सुरु केलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमासाठी कारागिरांच्या कारीगिरीमध्ये खुप कौशल्य असून त्यांना योग्य अशी संधी मिळावी यासाठी केंद्र सुरु करण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र उभारणीसाठी 5 कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी सतराशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्यामुळे जिल्ह्यातील 14 ते 15 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. सदर कामे येणाऱ्या 3 ते 4 वर्षात पुर्ण करण्यात येणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची व्यवस्था निर्माण होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
स्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यातील 8 हजार गावे हागणदारी मुक्त झाली असून देशात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच राज्यातील 25 हजार शाळा डिजीटल केल्याने शिक्षण व्यवस्था बदलण्यास मदत झाली असून यामध्ये देशात राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. याबरोबरच प्रत्येक ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्रास इंटनरनेट कनेक्टीव्हिटी देवून डिजीटीलायझेशन करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
नानाजी देशमुख यांनी देशातील शेतकरी, मजूर, दलित, शोषित, पिडीत समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे. तसेच शेती आणि ग्राम विकासाच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. गाव समृध्द होत नाही तोपर्यंत विकास होणार नाही आणि देश विकासाकडे वाटचाल करणार नाही, असे नानाजीचे मत होते. समाजकरणांसाठी नानाजीनी मंत्रीपदाचा त्याग करत राजकारणातून संन्यास घेवून चित्रकूट मध्ये ग्राम विकासाचे काम सूरू केले होते असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यावेळी म्हणाले.
पालकमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, राज्य शासन शेतकरी आणि शेत मजूर यांच्यासाठी काम करीत आहे. जिल्ह्याचा अनुशेष दुरुस्ती केल्याने सिंचन क्षमता वाढणार असून पाण्याच प्रश्न सुटणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दैनिक तरुण भारत सोलापूर यांनी यानिमित्ताने काढलेल्या विशेषंकाचे आणि दैनिक दिलासा वृत्तपत्राचे विमोचन करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्यने नागरिकांची उपस्थिती होती.
****



























































No comments: