30 November, 2019

दिनांक 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2019 या कालावधीत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताह साजरा होणार · अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या हस्ते आज सप्ताहाचे उद्घाटन





दिनांक 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2019 या कालावधीत
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताह साजरा होणार
·         अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या हस्ते आज सप्ताहाचे उद्घाटन

हिंगोली, दि.30: केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताह दिनांक 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2019 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात अप्प्र जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भुसंपादन उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, सहायक गट विकास अधिकरी बोथीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी (एस.व्ही.एस.टी) पुरुषोत्तम कुटे आणि या योजनेचे  जिल्हास्तरीय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
या सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी असंघटीत कामगार गजानन पवार यांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले.
00000

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील लाभार्थ्यांनी त्यांचा डाटा 30 नोव्हेंबर पर्यंत आधार लिंक करण्याचे आवाहन


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील
 लाभार्थ्यांनी त्यांचा डाटा 30 नोव्हेंबर पर्यंत आधार लिंक करण्याचे आवाहन

हिंगोली, दि.30: केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची माहिती आधार संलग्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील 4 हजार 116 शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. त्यापैकी 104 लाभार्थ्यांना मान्यता देऊन 4 हजार सात शेतकऱ्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेमधील लाभार्थी यांचा डाटा आधार लिंक नसल्यामुळे बरेच लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकत असल्याने केंद्र शासनाने सदरची बंधनकारक असलेली अट लाभार्थ्यांचा डाटा आधार लिंक करण्यासाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2019 अखेर पर्यंतच शिथील केली आहे. त्यानंतर याबाबत कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही . तसेच या योनजेअंतर्गत पी.एम. किसान पोर्टलवर फार्मर्स कॉर्नर मध्ये फार्मर रजिस्ट्रेशन ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, सर्व लाभार्थ्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत डाटा आधार लिंक करुन घ्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी  केले आहे.
0000

29 November, 2019

एड्सची माहिती जाणा आणि एड्स टाळा


विशेष लेख                                           दिनांक : 29 नोव्हेंबर, 2019
                                                      
एड्सची माहिती जाणा आणि एड्स टाळा

हिंगोली, दि.29: 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून पाळला जातो. या आजाराबाबत जनजागृतीचे प्रतिक म्हणून लाल रंगाची फित हे प्रतिनिधिक चिन्ह आहे. एचआयव्हीचा संसर्ग ही  जागतिक पातळीवरची समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणातून, असे लक्षात आले या आजारामुळे 3.5 कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे योग्य वेळी एड्सची माहिती घेऊन हा आजार टाळू शकतो.
हा आजार 1980 च्या दशकात प्रथम माकडामध्ये आढळला. पुढे त्याची लागण पसरायला सुरूवात झाली. एच.आय.व्ही.ची लागण कशी होते, या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींबरोबर राहिल्याने काही धोका उदभवतो का? या सगळया प्रश्नांवर अनेक माध्यमांव्दारे प्रचार झाल्याने  नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. तरी सुध्दा आजही अंधश्रध्दा आणि गैरसमजुतींना समाजातून काही लोक खतपाणी घालत आहे. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे.
डब्ल्यु.एच.ओ यांनी केलेल्या सर्वेक्षणात लक्षात येते की,भारतात या आजाराचा प्रसार 2005 सालापासून होताना दिसतो. तेव्हा आजाराचे प्रमाण 55 लाख होते. त्या तुलनेत 2007 साली 25 लाख होती म्हणजे 50 टक्के घट झाल्याचे आढळून आले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सर्वेक्षणानुसार गेल्या 10 वर्षात भारतात जनजागृती झाल्यामुळे हे प्रमाण घटण्यास सुरूवात झाली. 2011 साली झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतात या रोगाबाबत योग्य जागरूकता निर्माण झाल्यामुळे 50 टक्के प्रमाण घटल्याचे दिसते.  2017 साली झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतात महाराष्टात प्रमाण अधिक आहे. यात 3.30 लाख इतके रूग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ आंध्रप्रदेश 2.70 लाख, कर्नाटक 2.47 लाख, तेलंगाना 2.04 लाख, वेस्ट बंगाल 1.44 लाख, तमिळनाडू 1.42 लाख, उत्तरप्रदेश 1.34 लाख रूग्ण आहेत. येणा-या काळात एड्समुक्त भारत करण्याचे प्रयत्न केले जात आहे.  त्यासाठी आपण सर्वांनी जागरूक असणे आवश्यक आहे.
एड्स आजाराचे टप्पे 
मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे निर्माण होणा-या आजार लक्षणांचा समूह म्हणजे एड्स होय. एड्स म्हणजे अॅक्वायर्ड- संपादित केलेला, इम्यूनो- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, डेफिशियन्सी – कमतरता, सिंड्रोम – लक्षण समूह होय. एच. आय. व्ही. विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यावर आजाराची लक्षणे दिसायला सुरूवात होते.  त्याचा परिणाम काही आठवडे राहतो. एच.आय.व्ही संक्रमित व्यक्ती पूर्णपणे निरोगी दिसते. हा कालावधी 3 महिने ते १५ वर्षेपर्यंत असू शकतो. ते व्यक्तीच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर अवलंबून असतो.

एड्स झाल्याचे केव्हा समजते?
एच.आय.व्ही.चा विषाणू शरीरात रोगप्रतिकारक संस्थेच्या पेशीवर हल्ला करून त्या नष्ट करण्यास सुरूवात करतो. नष्ट झालेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी वेगाने निर्माण होत नाही. या पेशींच्या कमतरतेमुळे बाधित व्यक्ती क्षयरोग, कँडिडियासीस, नागीण आदी विविध संक्रमणांमुळे होणा-या  आजाराचे बळी पडू शकतात. एच.आय.व्ही. संक्रमणाची अंतिम टप्प्याची म्हणजेच एड्सची सुरुवात येथून होते. तोपर्यंत बाधित व्यक्ती तिस-या अवस्थेपर्यंत पोहोचतो. 

ही आहेत लक्षणे
बाधित व्यक्तीचे वजन कमी होण्यास सुरूवात होते. एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ सतत जुलाब होतात. एक महिन्यापेक्षा जास्त काळ खोकला येतो. अंगावरील त्वचेवर वारंवार खाज येते. बाधित व्यक्तीच्या तोंडात व घशात फोड येतात. लसिका ग्रंथींची सूज जास्त काळ राहते  ही प्रमुख लक्षणे ज्या व्यक्तीत दिसतात ती एड्सग्रस्त व्यक्ती समजावी.

असा टाळता येतो धोका
एड्स सहज टाळता येऊ शकतो. यासाठी आवश्यक काळजी घेतल्याने एड्स टाळणे प्रत्येकाला शक्य आहे. रक्त घेण्याची वेळ आली तर एच.आय.व्ही. मुक्त रक्त व रक्तघटकांचा वापर करावा. इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरीज आणि सुईचा वापर करावा. गुप्तरोग झाला असल्यास डॉक्टरकडे जाऊन त्वरित उपचार करावा. पालकांकडून बाळाकडे प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व प्रकारची उपाययोजना करावी. दाढी- कटिंग करताना न्हाव्यालासुद्धा नवीन ब्लेड वापरण्याचा आग्रह करावा. एड्सग्रस्ताचे नेलकटर व ब्लेड वापरू नये, कारण यामुळे एड्स होण्याची शक्यता असते.
योग्य उपचाराला प्राधान्य दयावे
बरेच रुग्ण एड्स झाल्याचे निदान होताच तो लपवून ठेवतात हे योग्य नाही. त्याने घरातील सदस्यांना याबाबत माहिती देऊन योग्य त्या उपाययोजना व उपचार करण्यासाठी त्यांचे सहकार्य घ्यावे. एड्स लपवणे म्हणजे या आजाराची दुस-याला बाधा करणे.
सरकारी दवाखाने, उपजिल्हा रुग्णालये या ठिकाणी एड्सबाबत समुपदेशन केंद्रे आहेत. तिथे जाऊन आजाराची माहिती घ्यावी. कारण एड्सची माहितीच एड्सपासून बचाव करू शकते. औषध म्हणजे एड्सची पूर्ण माहिती जाणून घेणे. ए.आर.टी. उपचार केंद्रात रुग्णांनी जाऊन जीवनमान सुधारावे. एच.आय.व्ही. एड्ससंबंधी गैरसमजुती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी लोकांना अचूक व संपूर्ण माहिती व प्रबोधनावर अधिक भर द्यावा.

                                                       -अरुण सुर्यवंशी
                                                                  जिल्हा माहिती अधिकारी
                                                हिंगोली

28 November, 2019

विविध शासकीय क्रीडा स्पर्धा योजना



विविध शासकीय क्रीडा स्पर्धा योजना
शारीरिक शिक्षण व खेळ हा शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. शालेय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे असलेले क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी लाभत असते. खेळविषयक प्रशिक्षणात सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता वाढते. ही शारीरिक सुदृढता त्यांना भावी जीवनात क्रियाशील राहून रचनात्मक कार्य करण्यास लाभदायी ठरते. खेळामुळे त्यांच्या सांघिक भावना, खेळाडूवृत्ती, आव्हानास सामोरे जाण्याची शक्ती वाढते. याहीपेक्षा खेळाद्वारे विद्यार्थी धर्मभेद, वंशभेद व जातीभेद विसरुन संघटित होवून राहण्यास शिकतात. विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण होते. खेळाद्वारे राष्ट्रीय एकात्मता कायम ठेवण्यास महत्वपूर्ण योगदान लाभते. जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, युवती, खेळाडू, क्रीडासंस्था व शैक्षणिक संस्था यांना विविध क्रीडाविषयक माहिती, योजना या विषयीची माहिती मिळावी, यादृष्टीने माहितीचा ऊहापोह करणारा लेख…
शासनाच्या नवीन क्रीडा व युवा धोरणामुळे क्रीडा क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यामुळे खेळाडू व युवकांमध्ये आमुलाग्र बदल होणे अपेक्षित आहे. विभागाच्या ठिकाणी विभागीय क्रीडा संकुल, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल, तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल, खुल्या जीमची सुविधा उभारण्यात येत आहे. तसेच क्रीडांगण विकास अनुदान योजना, व्यायामशाळा विकास अनुदान योजना, क्रीडा सुविधा अनुदान योजना, युवक कल्याण अनुदान योजनेच्या माध्यमाने स्वयंसेवी संस्था, युवा मंडळे, क्रीडा मंडळे, महिला मंडळे यांना क्रीडा विकासासाठी व युवा विकासासाठी आर्थिक सहाय्यक दिले जाते. त्यामुळे खेळाडूंना खेळांच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्या सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थी, खेळाडूंनी व युवकांनी घ्यावा.
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान तीन खेळात सहभाग घ्यावा. शासनाच्या वतीने खेळाडूंसाठी व युवक-युवतींसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण, 11 वी प्रवेशासाठी 3 टक्के आरक्षण, शासन सेवेत नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण, शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात येतात. युवकांकरिता युवक युवती प्रशिक्षण शिबीर, स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबीर, युवा महोत्सव, युवा दिन, युवा सप्ताह, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, सायकल शर्यत, मॅरेथॉन अशा विविध स्पर्धांचे आयोजन शासनातर्फे करण्यात येते.
शालेय, महानगरपालिका स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क खालीलप्रमाणे असते.
  • शाळेची एकूण पटसंख्या 500 पेक्षा कमी- 250 रूपये
  • शाळेची एकूण पटसंख्या 500 पेक्षा जास्त- 350 रूपये
प्रवेश फी खालीलप्रमाणे असते.
सांघिक खेळ प्रति खेळ (वयोगटनिहाय वेगवेगळे)- 50 रूपये (मुले व मुली स्वतंत्र)

वैयक्तिक खेळ (प्रति खेळ बाब)- 25 रूपये (मुले व मुली स्वतंत्र)

खेळनिहाय क्रीडा प्रकार
मैदानी खेळ

रोप स्किपिंग, फुटबॉल, टेनिस, पिकलबॉल, फील्ड आर्चरी, रस्सीखेच, जम्परोप, कयाकिंग व केनोइंग, वुशू, कराटे, किक बॉक्सिंग, कबड्डी, धनुर्विद्या,गोळा फेक, थाळी फेक, हातोडा फेक, भाला फेक, 100 मी., 200 मी. 400 मी. 600 मी. धावणे, 80 मी. हर्डल, उंच उडी, लांब उडी, 800, 1500, 3000, 5000 मीटर धावणे, 100 मी.हर्डल, तिहेरी उडी, बांबू उडी, 3000, 5000 मी. चालणे, 110 मी.हर्डल, 400 मी. हर्डल, 4X100 मी. रिले, 4X400 मी.रिले, 5 कि.मी. क्रॉसकंट्री, 3 कि.मी. क्रॉसकंट्री.

जलतरण

50, 100, 200, 400 मी. फ्रीस्टाईल, 50, 100, 200 मी. बॅकस्ट्रोक, 50, 100 200 मी. ब्रेस्टस्ट्रोक, 50,100, 200 मी. बटरफ्लाय, 200 मी. इंडि.मिडले, हायबोर्ड, हायबोर्ड 1 मी., स्प्रींगबोर्ड 3 मी., 4X100 मी.फ्री रिले, 4X100 मी. मिडले रिले, 800 मी. फ्री स्टाईल, 400 मी.इंडी.मिडले, स्पिंगबोर्ड 1 मी., 1500 मी. फ्रीस्टाईल.

इतर
सिकई मार्शल आर्ट, जिम्नॅस्टिक्स, ज्युदो, कुस्ती, स्केटींग, वेटलिफ्टिंग, तायक्वांदो, रायफल शुटींग, पॉवर लिफ्टिंग, चायक्वांदो (फक्त डिफेन्स ड्रील), तलवारबाजी, जित कुने डो, थांग ता मार्शल आर्ट, योगासन, सीलम्बन, बॉक्सिंग, सायकलिंग.

युवा महोत्सव
केंद्र शासनाच्या वतीने 1994 पासून 15 ते 35 वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी युवा महोत्सवाचे जिल्हा, राज्य व राष्ट्रीयस्तरावर आयोजन केले जाते. जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात करण्यात येते. या युवा महोत्सवात माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, युवक मंडळे, महिला, सांस्कृतिक मंडळ तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या 15 ते 35 वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येते. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका (हिंदी-इंग्रजी), शास्त्रीय गायन हिंदुस्थानी शैली, कर्नाटकी शैली, शास्त्रीय वाद्यवादन सोलो तबला, सितार, बासरी, वीणा, मृदंग, गिटार, हार्मोनियम लाईट, शास्त्रीय नृत्य, (मणिपुरी, ओडीसी, भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी), स्वयंस्फूर्त वक्तृत्व (हिंदी-इंग्रजी) या कार्यक्रमांची निवड करण्यात येते.

या कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका, जन्मतारीख, पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक असते. प्रवेशिकेसोबत वास्तव्याचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. सर्व कला प्रकारातील कलाकारांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
0000000
                                                        -अरुण सुर्यवंशी
                                                                  जिल्हा माहिती अधिकारी
                                                हिंगोली

27 November, 2019

क्रिडा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी










क्रिडा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
-जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी

आदिवासी विभागाच्या विभागीय क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन

हिंगोली,दि.27: विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकरीता  विविध क्रिडा प्रकार अत्यंत महत्वाचे आहेत. खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होतोच पण बौद्धीक विकास होण्यास देखील मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळमनुरी यांच्या विद्यमाने अमरावती विभागाअंतर्गत  येणाऱ्या शासकीय व अनुदानीत आश्रमशाळांच्या तीन दिवसीय विभागीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, अमरावती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त विनोद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, राज्य राखीव बलाचे समादेशक मंचक इप्पर, अकोला जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक (प्रशिक्षण) प्रशांत वाघुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी कलीम फारुकी, माजी सहायक प्रकल्प अधिकारी शंकर राठोड आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प संचालक विशाल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता चांगली असते. यामुळे खिलाडूवृत्तीने उत्कृष्ट प्रदर्शन करण्याची त्यांची क्षमता वाखाणण्यासारखी आहे. खेळांचा निरंतर सराव व अथक परिश्रमाची जोड देऊन या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये यशस्वी होण्याचे स्वप्न बाळगावे.
अमरावती विभागाच्या आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त विनोद पाटील म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासाकरिता त्यांच्यातील क्रीडा कुशलतेचा उपयोग करुन घ्यावा. क्रीडा स्पर्धामुळे विद्यार्थी जीवनातील यशापयशाला तोंड देण्यास सक्षम होतात. खेळाडूंना आपली क्षमता दाखविण्याचे तसेच खिलाडूवृत्ती निर्माण करुन पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत चांगली कामगिरी  करण्याचे आवाहन केले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची भोजन, वैद्यकीय, सुरक्षा इत्यादी सर्वप्रकारच्या सुविधांची चोख व्यवस्था ठेवण्याची सूचना आयोजकांना दिल्या.
प्रांरभी क्रीडाज्योत प्रज्वलित करून तसेच हवेत फुगे सोडून तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धांचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी सर्व स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करण्याची शपथ घेतली. तसेच प्रमुख अतिथींना सहभागी खेळाडूंनी मानवंदना दिली. यावेळी कळमनुरी आणि पुसद यांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेने या विभागीय क्रिडा स्पर्धेची सुरुवात झाली.
आदिवासी विभाग अमरावती अंतर्गत येणाऱ्या कळमनुरी, किनवट, पांढरकवडा, अकोला, औरंगाबाद, पुसद आणि धारणी अंतर्गत शासकीय व अनुदानीत आश्रमशाळांच्या शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

****


26 November, 2019

26 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय हुंडाबंदी दिन साजरा करण्याचे आवाहन


26 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय हुंडाबंदी दिन साजरा करण्याचे आवाहन

        हिंगोली, दि. 26:  26 नोव्हेंबर हा जिल्हास्तरीय  हुंडाबंदी  दिन म्हणून दरवर्षी  साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने  दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस  हुंडाबंदी  दिन म्हणून  दरवर्षी  जिल्हास्तरावर साजरा करण्यात येतो.
या दिवसापासून  पुढचे सात  दिवस हुंडाबंदी  सप्ताह म्हणून  घोषित करण्यात यावा, या दिवशी राज्यातील शाळा  आणि महाविद्यालयामध्ये हुंडा या विषयावरील चित्रकला,वक्तृत्व स्पर्धा इ.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, यादिवशी जिल्ह्यात ठिकठिकाणी महिला मेळावे आयोजित करण्यात यावेत, या मेळाव्यामध्ये महिला विषयक पुस्तके छापून त्याचे वितरण करावे, तसेच महिलांच्या कल्याणाकरिता शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात, त्या योजनांची माहिती महिलांना देण्यात यावी, मेळाव्यामध्ये हुंडा निर्मुलन,देवदासी  निर्मुलन  यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, महिला मेळाव्यामध्ये विविध वक्त्यांची भाषणे तसेच वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात, समाजामध्ये महिलांबाबतच्या अनिष्ठ रुढी आहेत त्यांचे उच्चाटन करण्याकरिता तसेच महिलांमध्ये हक्काची जाणीव निर्माण  होण्याकरिता महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने इतरही अनके कार्यक्रम या दिवशी आयोजित करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांनी केले आहे.
000000






जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

            हिंगोली, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमत्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
            यावेळी   अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोवींद रणविरकर, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सुधीर जाधवर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल कळसकर,  तहसिलदार जिवककुमार कांबळे, यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची  उपस्थिती होती.
*****




25 November, 2019

पाणी बचतीचे तंत्र वापरल्याखेरीज लाभधाराकांना जलाशयातील पाणी उपलब्ध होणार नाही


पाणी बचतीचे तंत्र वापरल्याखेरीज लाभधाराकांना जलाशयातील पाणी उपलब्ध होणार नाही

हिंगोली, दि.25: महाराष्‌ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम 2005 मधील कलम 14(4) नुसार बारमाही पिकांना निर्धारीत केलेल्या दिनांकापासून ठिबक सिंचन, तुषार सिंचन अथवा प्राधिकरणाने मान्यता दिलेले अन्य पाण्याची बचत करणारे तंत्र वापरल्या खेरीज कालव्यामधून पाणी दिले जाणार नाही. या बचतीमधून भविष्यातील वाढीव पिण्याच्या पाण्याची मागणी भागवून शिल्लक राहिलेले पाणी लाभक्षेत्रातील तसेच लगतच्या भागात समन्यायी तत्वावर वाटप करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिनांक 20 मे, 2019 च्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार क जुलै 12, 2019 नुसार जलसंपदा प्रकल्पातील जलाशयातील उपसा सिंचन योजनांना ऊस, केळी व फळबागा इत्यादी बारमाही पिकांसाठी, शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अथवा प्राधिकरणाने मान्यता दिलेले अन्य पाण्याची बचत करणारे तंत्र वापरल्याखेरीज 31 ऑक्टोबर 2020 नंतर जलाशयातून पाणी उपलब्ध करुन दिले जाणार नाही. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांची जलाशयातील पाणी उपसा परवानगी कालवा अधिकारीमार्फत रद्द केली जाईल. सर्व बागायतदारांनी, लाभधारकांनी ठिबक व तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावे असे आवाहन अधिक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड यांनी केले आहे.

***

21 November, 2019

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांसाठी 7 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांसाठी
7 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
 हिंगोली, दि.21: राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानांच्या योजनांबाबत इच्छूकांनी अधिक माहितीस्त्व आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानांचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणारे अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करुन इंग्रजी, हिंदी भाषेत  भरावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता  यांच्या असमान निधी योजनेतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. सन 2019-20 पासून असमान निधी योजनांसाठीचे विविध प्रस्ताव www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाव्दारे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याबाबत प्रतिष्ठानकडून निर्देश देण्यात आले आहेत.
 असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज कसा करावा याबाबत www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावरील असमान निधी योजना या खिडकीखाली देण्यात आलेल्या User guide for applying online assistance यावर सविस्त्र माहिती व मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या अर्जाची प्रिंट काढून अपलोड केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव चार प्रतीत संबंधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 11 डिसेंबर 2019 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत सादर करावेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
असमान निधी योजना सन 2019-20 साठी  ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य. "राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा" विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे 50, 60, 75, 100, 125, 150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग जागरुकता कार्यक्रम आयोजनांसाठी अर्थसहाय्य. बाल ग्रंथालय राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.
00000



19 November, 2019

जात वैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करुन घेण्याचे आवाहन


जात वैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करुन घेण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 19 : मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्र. 2723/2015 मध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तत्कालीन जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी दिनांक 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत  निर्गमित करण्यात आलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्र तपासणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने उक्त कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांनी त्यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली येथे जातीच्या दाव्यापुष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती जी.डी. गुठ्ठे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली यांनी केले आहे.
00000

जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ







 जिल्हाधिकारी कार्यालयात
इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ
हिंगोली, दि. 19 : - इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोविंद रणवीरकर यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्तची शपथही सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना देण्यात आली.  
तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त एकात्मतेची शपथही घेण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार राजेंद्र गळगे आदिंसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

कंत्राटी कर्मचारी भरती करीता 1 डिसेंबर रोजी लेखी परीक्षा


कंत्राटी कर्मचारी भरती करीता 1 डिसेंबर रोजी लेखी परीक्षा

हिंगोली, दि.19 : येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांचे अधिनिस्त असलेल्या पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत रसायणी, अणुजैविक तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस या कंत्राटी पदा करीता रिक्त असलेल्या जागेवर पदभरती करण्यासाठी जुलै-2018 मध्ये आवेदन पत्र मागविण्यात आले होते. त्यानुसार पात्र उमेदवारांची दि.1 डिसेंबर 2019 रोजी सकाळी  ठिक : 11:00 ते 12:00 या वेळेत आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे लेखी परीक्षा होणार आहे.
पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेणे करीता प्रवेशपत्र जिल्ह्याच्या www.hingoli.nic.in  या संकेतस्थळावर व प्रस्तुत कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच उमेदवारांच्या स्थानिक पत्यावर प्रवेशपत्र पोस्टाद्वारे पाठविण्यात आले आहेत, कोणास प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास दि.28 व 29 नोव्हेंबर 2019 रोजी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, हिंगोली या कार्यालयातून कार्यालयीन वेळेत (सकाळी 10:00 ते सांयकाळी 5:45) प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, हिंगोली यांनी केले आहे.
00000


बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहात निमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहात निमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

हिंगोली, दि. 19: बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर 2019 या कालावधीत राबविला जात आहे.संयुक्त राष्ट्रसंघाचे बालकांचे हक्क यावरील अधिवेशन यास 20 नोव्हेंबर 2019 रोजी 30 वर्षे पूर्ण होत आहेत.  याचे औचित्य साधून दिनांक 16 नोव्हेंबर रोजी गणेशवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालकांचे हक्क, बालकांवरील लैंगिक अत्याचार तसेच आरोग्याविषयी जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर सप्ताह महाराष्ट्र पोलीस महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, चाईल्ड लाईन व युनिसेफ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या विद्यमाने राबविण्यात येणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी , हिंगोली यांनी कळविले आहे.
0000000