16 January, 2024

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

                हिंगोली (जिमाका), दि. 16 :  जिल्ह्यात मराठा आरक्षण  मागणी संदर्भाने सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यात उपोषणे, साखळी उपोषणे व विविध प्रकारचे आंदोलने चालू असून मराठा आरक्षण संदर्भाने इतर आंदोलने होण्याचे शक्यता आहे. तसेच दि. 22 जानेवारी, 2024 रोजी आयोध्या येथे श्रीराम मुर्तीची स्थापणा होणार असून हिंगोली जिल्ह्यातही विविध मंदिरात व घरोघरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 25 जानेवारी, 2024 रोजी गणराज्य दिन व जिल्ह्यात विविध देवस्थानचे/ग्रामदेवतांच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात येवून कब्बडी, कुस्त्या, किर्तन संदल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. व्ही.व्हीआयपी व स्वरंक्षीत व्यक्तीचे जिल्ह्याच्या दौ-यावर येत असतात. तसेच सध्या घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घडामोडी, सकल मराठा समाज, ओबीसी समाज, धनगर समाज, आदिवासी व बंजारा समाजाच्या वतीने आरक्षण संबंधाने मोठ्या प्रमाणात बैठका, सभा, मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे, आमरण उपोषणे करण्यात येत आहेत. शेतकरी, नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्यात त्यांच्या मागणी संदर्भात मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 17 जानेवारी, 2024 रोजीचे 23.59 वाजल्यापासून ते दिनांक 01 फेब्रुवारी, 2024 रोजीचे 23.59 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास  सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिकत जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.     

****

No comments: