24 January, 2024

 

राष्ट्रीय मतदार दिवस : मतदार जागृती

 

                भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी, 1950 रोजी झाली असून स्थापनेचा25 जानेवारी’ हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा आणि त्यातून बळकट लोकशाहीतील मोठा सहभाग  नोंदवता यावा हा आहे.

                भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्वत्रिक तथा पोट निवडणुकीत मतदानाचा मुलभूत हक्क बहाल करण्यात आलेला आहे. त्यामुळे मतदार यादीत नांव नोंदवून मतदान करण्याचे कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करण्याचा वाटा उचलण्याची संधी प्रत्येक भरतीय नागरिकाला आहे.

                भारतातील युवा मतदाराना सक्रीय राजनीती मध्ये भाग घेण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता सन 2011 पासून भारत निवडणूक आयोगाने25 जानेवारी’ हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून दरवर्षी साजरा करण्यात यावा, असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार यावर्षी 14 वा राष्ट्रीय मतदान दिवस साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाची  यंदाची  थीम ‘मतदानाइतकं अमूल्य नसे काही बजावू हमखास मताधिकार आम्ही’ त्यांना भविष्यात निवडणुकांच्या वेळी  सक्रीय आणि सहभागी करुन घेणे.

देशातील प्रत्येक नागरिकास आपण या देशाचे सुजाण नागरिक असून मतदान करणे हा आपला मुलभूत हक्क असल्याची  जाणीव  होण्याकरीता या राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व आहे. या 'राष्ट्रीय मतदार दिवस' निमित्त 18 वर्ष पूर्ण होत असलेल्या आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवयुवक युवतींना मतदारांना तसेच ज्या नागरिकांनी अद्यापही यादीत आपले नांव नोंदविले नाही अशा नागरिकांना मतदार यादीत आपले नांव नोंदवून ओळख पत्र भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येते. मतदार म्हणुन नाव नोंदवण्यासाठी जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला याप्रमाणे वर्षभरात 4 संधी असणार आहेत. जर तुम्ही 2024 च्या एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्याच्या आधी  18 वर्षाचे होणार असाल तर निरंतर अद्यतन प्रक्रियेत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अर्ज क्र. 6 भरुन आगाऊ मतदार नोंदणी करु शकता.

                दिनांक 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर अधारीत दि. 23 जानेवारी, 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार हिंगोली जिल्ह्यात तीन मतदार संघामध्ये एकूण 9 लाख 46 हजार 167 मतदार आहेत. त्यापैकी स्त्री मतदार 4 लाख 51 हजार 308 तर पुरुष मतदार 4 लाख 94 हजार 852 आणि तृतीयपंथी 07 मतदार आहेत. या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त स्त्री मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न आहे. कारण जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या कमी असून ज्या महिलांनी मतदार यादीत नांव नोंदविले नाही त्यांनी आता या कार्यक्रमानिमित्त महिला मतदारांनी नावे नोंदविली पाहिजेत.

या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर, 2023 च्या प्रारूप मतदार यादीत 21 हजार 867 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच 13 हजार 758 मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 8 हजार 109  मतदारांची निव्वळ वाढ (Net Addition) होऊन एकूण मतदारांची संख्या 9 लाख 46 हजार 167 इतकी झालेली आहे. त्यानुसार 3 हजार 386 पुरुष मतदारांची, 4 हजार 722 स्त्री मतदारांची आणि 5 तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झालेली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका इत्यादींच्या सहकार्यामुळे यावर्षी महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर 908 वरुन 912 इतके झाले आहे.

                या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये 18 ते 19 या वयोगटामध्ये 8 हजार 433 मतदारांची नव्याने भर पडली आहे, तसेच 20 ते 29 या वयोगटात 8 हजार 438 मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारुप यादीत 18 ते 19 या वयोगटाची मतदार संख्या 5 हजार 357 (0.57%) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत 13 हजार 790  (1.46%) इतकी झालेली आहे. तर 20 ते 29 वयोगटाची प्रारुप यादीतील मतदार संख्या 1 लाख 94 हजार 878 (20.77%) होती, ती अंतिम यादीत 2 लाख 03 हजार 320 (21.49%) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

 मतदार यादी जितकी सर्वसमावेशक तितकी वंचित समाजघटक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये मतदार नोंदणीबरोबरच आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला यांचेही या जमातीतील लोकांना वाटप करण्यात आले आहे. औंढा नागनाथ तालुक्यात मुर्तीजापुर सावंगी, अंजनवाडा तांडा, वसमत तालुक्यात आडगांव, हिंगोली तालुक्यात कोथळज ईत्यादी ठिकाणी ही शिबिरे घेण्यात आली होती. त्यामध्ये भटक्या व विमुक्त जमातीच्या एकूण 410  लोकांची मतदार नोंदणी करण्यात आली.

                यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी  1 जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या बहु अर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑक्टोबर 2024 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवांनाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्वनोंदणी (Advance Registration) करता आली. पूर्वनोंदणीचे एकूण 5 हजार 933 अर्ज (1 एप्रिल- 1189, 1 जुलै- 2518 , 1 ऑक्टोबर- 2226 ) प्राप्त झालेले आहेत. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वनोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन (Continuous Updataion) प्रक्रिया सुरु असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे.

                वयाची 18 वर्ष पुर्ण झालेल्या अधिकाधिक तरुणांनी छायाचित्र मतदार याद्यांचा सततचा पुनरिक्षण कार्यक्रम- 2024 च्या कालावधीत आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी, तसेच मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी, मतदार यादीत दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी संबधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)/ संबंधीत तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी/ संबंधीत उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावेत किंवा http://www.nvsp.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन सादर करावेत. अधिक माहितीसाठी https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. या मतदार दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त नवीन मतदारांना निमंत्रित करण्यात येईल. त्यांना या कार्यक्रमात मतदार ओळखपत्र, बिल्ले, प्रदान करुन प्रतिज्ञा दिली जाणार आहे. निबंध स्पर्धा, सायकल रॅली, पथनाट्य जागृती अभियान, लोककला लोकनृत्य, प्रदर्शन, फलक, घोषवाक्य, सामान्यज्ञान स्पर्धा छायाचित्र स्पर्धा, सांस्कृतिक मंडळे, भजन मंडळे, महिला युवा मंडळे, महिला क्रीडा मंडळे, बचत गट, या संस्थांच्या मदतीने, जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिवसाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

                येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण आपल्या लोक प्रतिनीधीस मतदान करण्याची संधी गमावणे म्हणजे आपण आपला भारतीय नागरिक असल्याचा  हक्क गमावल्यासारखे आहे ! तर चला ! आपण सर्व भारतीय नागरिक या राष्ट्रीय  मतदार  दिवसानिमत्त आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुन आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सज्ज होऊ या…!

 

अरुण सूर्यवंशी

जिल्हा माहिती अधिकारी,

हिंगोली

****

No comments: