22 August, 2017

वंचित लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा
                                                                                                  -- किशोर तिवारी
हिंगोली, दि.22: जिल्ह्यातील शेवटच्या वंचित लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचविण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी प्रयत्न करण्याचे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डि.पी.सी. सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्श तडवी, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांची उपस्थिती होती.
पुढे श्री. तिवारी म्हणाले की, शेतमालास योग्य भाव मिळावा या दृष्टीकोनातून शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास योग्य दर मिळावा यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे कृषी व पणन मंडळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किंमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येते. सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जाते. सहा महिन्यांचे आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते. सदर योजने अंतर्गत जिल्ह्यातील बाजार समित्यांनी आतापर्यंत 33 लाख रुपयांचे तारण कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेती शिवाय शेती पूरक उद्योगासाठी प्रोत्साहित करण्याची आवश्यकता असून, याकरीता आत्मा सह इतर माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी मुद्रा बँक योजनेचा लाभ देण्यात यावा. अन्न सुरक्षा योजने अंतर्गत शेतकरी कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत असून, जिल्ह्यातील कोणतेही पात्र कुटुंब अन्न सुरक्षा योजने पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळण्यासाठी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांतील सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ नागरिकांना मिळावा याकरीता सदर योजने अंतर्गत रुग्णालयाची संख्या वाढवून जास्तीत-जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याच्या सूचनाही श्री. तिवारी यांनी यावेळी दिल्या.
यावेळी श्री. तिवारी यांनी बैठकीत खरीप हंगाम 2017-2018 करिता पीककर्ज, पीकपध्दती, पीक पेरणी, मागील वर्षी वाटप झालेले पीककर्ज व वसुली, लागवडी खर्च नियंत्रण, शासकीय धान्य, आदिवासी, आरोग्य विभाग, अन्न व नागरी पुरवठा  विभाग, मुद्रा, पीककर्ज माफी, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंचन प्रकल्प, पशु संवर्धन, महात्मा फुले जन आरोग्य योजना, मस्त्य निर्मिती, शिक्षण, ग्रामीण, रोजगार, कृषी रोजगार योजनांचा दिलेला लाभ, शेतकरी आत्महत्या, इतर शेतीसोबतच जोडधंद्यांसाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती व फायदा, वन विभागामार्फत निर्माण करण्यात आलेले रोजगार व ग्रामीण भागातील समस्या, पेसा कायद्यातंर्गत गावातील वनउपज व्यवस्थापन आदी विषयांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी आढावा बैठकीस तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, तहसीलदार वैशाली पाटील, तहसीलदार विजय अवधाने, तहसिलदार उमाकांत पारधी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी आदी विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.
*****


No comments: