12 May, 2023

 

हिंगोली जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी

अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

  • सर्वोत्कृष्ट संकल्पनेस, सादरीकरणास सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल

 

हिंगोली (जिमाका), दि. 12 : भारत सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सन 2047 पर्यंत ‘‘विकसित भारत-भारत@2047 (India@2047)’’ करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. यामध्ये सन 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. तसेच सन 2030 पर्यंत ‘शाश्वत विकास’ उद्दिष्ट साध्य करण्याचा भारत सरकारचा मानस आहे. विकसित भारताची ही उद्दिष्टे साध्य करीत असताना भारतातील राज्यांना सुध्दा सन 2047 पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. या दृष्टीने महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 01 ट्रिलियन डॉलर, सन 2037 पर्यंत 2.5 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलर इतकी पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. यासाठी विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केल्याने आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टिकोन विकसित करणे शक्य होइल व असा विकास सर्वसमावेशक असेल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यास मदतही करेल.

हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती, नैसर्गिक संसाधनामधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबी विचारात घेऊन हिंगोली जिल्ह्यासाठी ‘जिल्हा विकास आराखडा’ तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यासाठी पुढील बाबींकरिता आपल्या अभिप्रायाची आवश्यकता आहे.

1) हिंगोली जिल्ह्यातील विकासाच्या संभाव्य संधी ओळखून संभाव्य गुंतवणुकीला व विकासाला चालना देऊ शकणाऱ्या बाबी, 2) हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी कृषी व संलग्न सेवा, उद्योग (वस्तुनिर्माणसह), जलसंधारण, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यटन इत्यादी क्षेत्रांच्या वृध्दीबाबत अभिप्राय आवश्यक आहे.

यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक, संस्था, महाविद्यालय व आस्थापना यांनी आपले अभिप्राय जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडे लेखी किंवा dpohingoli@rediffmail.com या ई-मेल पत्यावर किंवा 9922326509 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे दि. 31 मे, 2023 पर्यंत कळवावेत, असे आवाहन जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांनी केले आहे. सर्वोत्कृष्ट संकल्पनेस, सादरीकरणास सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही कळविले आहे.   

*****

No comments: