26 May, 2023

 

शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी

प्रभावी अमंलबजावणी करावी

                                                                                                - खासदार हेमंत पाटील

 


        हिंगोली (जिमाका), दि. 26 : केंद्र व राज्य शासन पुरस्कृत  विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी  प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी दिले.

            जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, हिंगोली यांच्यावतीने आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज संपन्न झाली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी  नामदेव केंद्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांची उपस्थिती होती.

            यावेळी श्री. पाटील म्हणाले की, जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावात हर घर नल से जल अभियान मा. पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. त्यामुळे जलजीवन मिशनची कामे दर्जेदार व चांगले झाले पाहिजेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील घरामध्ये नळाने पाणी येईपर्यंत जलजीवन मिशनची देयके अदा करु नयेत. तसेच जलजीवन मिशनची कामे बनावट प्रमाणपत्राआधारे होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जल जीवन मिशनच्या कामाची पाहणी करावी. तसेच भूजलचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्यावर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

            गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीने त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दुप्पट जमीन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीकडे निधी नसल्यामुळे शासनाने जमीन उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन पाठवावा. बचतगटाला निधी देताना स्थानिक लोकप्रतिनिधीशी समन्वय ठेवून निधीचे वितरण करावे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक घरात शौचालय बांधण्यात येत आहेत. या अभियांनातर्गत शौचालयाचे अनुदानाचा गैरवापर करण्याऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करावी. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रांमपंचायतीमध्ये डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आपले सरकार केंद्र सुरु करण्यात आले आहेत. परंतु काही ठिकाणी सदर केंद्र सुरु नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधित विभागाने चौकशी करुन प्रत्येक गावात आपले सरकार सेवा केंद्र सुरु होतील याची दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक गावात भारत नेटचे कनेक्शन देण्यात आले आहेत. परंतु हे कनेक्शन अद्याप सुरु झाले नाहीत. हे कनेक्शन तात्काळ सुरु करुन तसा अहवाल 8 दिवसात  सादर करावा. संसद आदर्श ग्राम येहळेगाव तुकाराम व कडोळी येथील विविध विकास कामे तातडीने पूर्ण करावेत, असे सांगून कडोळी गावासाठी तयार करण्यात आलेल्या डीपीआरला या बैठकीत मान्यता दिली. दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतून विविध विषयाचे प्रशिक्षण देण्याबरोबरच हळदीवर प्रक्रिया करणाऱ्या विविध उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात यावेत, अशा सूचना खासदार हेमंत पाटील यांनी दिल्या.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करुन पिक विम्याचे वितरण करावे. केंद्राच्या ग्रामीण व शहरी भागासाठी अनेक योजना आहेत. परंतू या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर केंद्र पुरस्कृत योजनासाठी उपलब्ध  निधीचा योग्य विनियोग करावा. नरेगा अंतर्गत वैयक्तिक विहिरींची योजना राबविण्यात याव्यात. तसेच नरेगा अंतर्गत मातोश्री पाणंद रस्ता अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पाणंद रत्याची कामे तातडीने पूर्ण करावीत. जिल्ह्यात पाणंद रस्त्याचे काम चांगल्या प्रमाणात होत असल्याचे महसूल प्रशासनाचे अभिनंदन केले. महावितरण विभागाने दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योतीचे योजनेची कामे तातडीने पूर्ण करावेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांना गती देवून कामे पूर्ण करावेत, अशा सूचना खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी दिल्या.

            आमदार तान्हाजी मुटकुळे  व आमदार संतोष बांगर यांनी आपणास दिलेली कामे सर्व यंत्रणांनी नियोजन करुन वेळेत पूर्ण करावीत. म्हणजे प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च होईल. तसेच विकास कामे प्रलंबित न ठेवता पाठपुरावा करुन सदर कामे पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या.

            जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की, दिशा समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील व विविध लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या प्रत्येक सुचनांचे तंतोतत पालन करुन एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आणि केंद्र पुरस्कृत योजना जिल्ह्यात राबवितांना सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून विकास कामे वेळेत पूर्ण करावीत व त्याचा अनुपालन अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या.

            यावेळी खासदार पाटील यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, भूमि अभिलेख कार्यालयाचे संगणकीकरण योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजिटल इंडिया, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, गौण खनिज, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री उद्योग योजना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना यासह अन्य केंद्रशासन पुरस्कृत योजनांचा प्रगतीचा आढावा घेतला.

            जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी  नामदेव केंद्रे यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी  दिशा समिती काम करत असल्याची माहिती प्रास्ताविकात दिली.

            यावेळी समितीचे अशासकीय सदस्य, विविध विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते.

****

No comments: