18 October, 2019

प्रमाणित केल्याशिवाय २०, २१ ऑक्टोबरला जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करू नये जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन


प्रमाणित केल्याशिवाय २०, २१ ऑक्टोबरला
जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करू नये
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन

हिंगोली, दि 17 :- प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर शेवटच्या ४८ तासात; म्हणजेच २०;२१ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रचारासंबंधी कोणतीही जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित करण्यासाठी  माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. तशा आशयाच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
राजकीय पक्ष, उमेदवार, सामाजिक संस्था किंवा इतर कुणीही व्यक्ती यांना जर शेवटच्या ४८ तासात उमेदवाराच्या किंवा पक्षाच्या प्रचारासंबंधी जाहिरात प्रसिद्ध करायची असेल तर त्या जाहिरातीमधील मजकूर प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही; असे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे, असे श्री. जयवंशी यांनी सांगितले.
मागील काही निवडणुकीमध्ये अपमान करणाऱ्या, अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या  जाहिराती  मतदानाच्या अगोदरच्या दिवशी काही प्रमुख वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. अशा जाहिरातीचा  विपरीत परिणाम निवडणूक प्रक्रियेवर  होतो. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नाही. त्यामुळे त्याच्यावर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या प्रक्षोभक, द्वेषपूर्ण आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमुळे मतदानाच्या दिवशी काही अनुचित  घटना घडू नये म्हणून भारत निवडणूक आयोगाने घटनेच्या कलम 324 नुसार अधिकार वापरून आदेश काढले आहेत. या आदेशानुसार कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रातून  प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही, असे श्री. जयवंशी यांनी स्पष्ट केले.
राज्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत असून त्याअनुषंगाने दिनांक २०  आणि २१ ऑक्टोबर रोजीच्या दैनिकात प्रसिद्धीस दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. जाहिरात प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी किमान 48 तास अगोदर एमसीएमसी समितीकडे अर्ज करावा, असेही श्री. जयवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
*****

No comments: