02 December, 2019

ओल्या दुष्काळातही रेशीम शेतीने तारले






ओल्या दुष्काळातही रेशीम शेतीने तारले

हिंगोली, दि.2: संपूर्ण राज्यात ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले. परंतू रेशीम शेती याला अपवाद ठरली हिंगोली जिल्ह्यातील रेशीम शेतकऱ्यांनी या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
वसमत तालूक्यातील पांगरा शिंदे या गावातील रेशीम शेतकरी श्री. सुशील रावसाहेब शिंदे यांनी जुलै 2019 ते नोव्हेंबर 2019 या पाच महिन्याच्या कालावधीत चार वेळा एकूण 750 रेशीम आणि त्याचे संगोपन करून 708 कि.ग्रॅ. रेशीम कोषाचे उत्पादन घेऊन या चार पिकाद्वारे 2 लाख 48 हजार 306 रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
याप्रकारे जिल्ह्यातील सुमारे 50 रेशीम शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत अवघ्या 5 महिन्याच्या कालावधीत 1 लाखाहून अधिक रुपयाचे उत्पन्न घेतले आहे. तसेच 140 शेतकऱ्यांनी 50 हजार रुपयापेक्षा जास्त उत्पन्न घेऊन रेशीम शेतीने प्रतिकूल परिस्थितीत देखील शेतकऱ्यांना संजीवनी देणारी उत्तम जोड व्यवसाय असल्याचे सिद्ध केले आहे.
ओल्या दुष्काळात पारंपारिक पिकांप्रमाणे रेशीम शेतीचे कुठलेही नुकसान होत नसून वाढलेल्या आर्दतेचा चांगला परिणाम कोष उत्पादनावर होवून चांगले उत्पन्न्‍ मिळते. त्यामुळे जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा मार्ग अवलंबून स्वतःची आर्थिक स्थिती बळकट करावी, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी  स्वप्नील तायडे व प्रगतीशील रेशीम शेतकरी सुशील शिंदे यांनी केले आहे.
श्री. सुशील शिंदे यांनी रेशीम शेतीत विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक श्री वडवळे, प्रवीण चव्हाण यांनी सत्कार करून गौरव केला. तसेच इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.

****




No comments: