21 May, 2026

क्रीडा संकुलांच्या कामांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा तसेच तालुका क्रीडा संकुलांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, तालुका क्रीडा अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत हिंगोली तालुका क्रीडा संकुलातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला.

कळमनुरी तालुका क्रीडा संकुलामध्ये प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, संरक्षक भिंतीचे काम तसेच क्रीडांगण समपातळीत करण्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला. संबंधित कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

औंढा नागनाथ तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच वसमत तालुका क्रीडा संकुलामध्ये फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल मैदानांसह जॉगिंग ट्रॅक आदी सुविधा नव्याने निर्माण करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सेनगाव तालुका क्रीडा संकुलासाठी अद्याप जागा उपलब्ध नसल्याने संबंधित विभागांनी तातडीने जागा उपलब्ध करून पुढील कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

यावेळी जिल्हा क्रीडा संकुलासाठी नव्याने जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी 400 मीटर धावपट्टी, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल मैदान, स्केटिंग रिंग तसेच इतर अत्याधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व कामे गतीने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

*******

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा रद्द

 


हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्या वतीने जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्या, शुक्रवार, दि. 22 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तथा प्लेसमेंट ड्राईव्ह रद्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी दिली आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, दि. 22 मे रोजी होणारा मेळावा पूर्णतः रद्द करण्यात येत आहे.

या संदर्भात इच्छूक व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच पुढील आयोजनाबाबतची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचेही सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी आवाहनाद्वारे स्पष्ट केले आहे.

*******

प्रकल्पबाधितांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा पुनर्वसन समिती स्थापन

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम  1976, 1986 व 1999 नुसार पात्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसनविषयक प्रश्न हाताळण्यासाठी तसेच पर्यायी जमीन व पुनर्वसित गावठाणामधील रहिवासी भूखंड संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुनर्वसन समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये सदस्य म्हणून लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, हिंगोली, वसमत-कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी तसेच आखाडा बाळापूर येथील उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 4 चे कार्यकारी अभियंता यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय संबंधित प्रकल्पग्रस्तांपैकी दोन प्रतिनिधींची मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या मार्फत नामनिर्देशन करण्यात येणार आहे. तर समितीचे सदस्य सचिव म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कार्य पाहणार आहेत.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार समितीची बैठक दरमहा घेण्यात येणार असून, संबंधित प्रकरणांची नोंदवही व अभिलेख तयार करून तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या समितीमुळे प्रकल्पबाधित व्यक्तींच्या पुनर्वसनासंदर्भातील प्रश्न सोडविण्यास गती मिळणार असून, त्यांच्या तक्रारींचे प्रभावी व वेळेत निराकरण होण्यास मदत होणार आहे.

 

*******

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ

 



             हिंगोली (जिमाका), दि. 21 : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत शपथ घेण्यात आली.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*******

20 May, 2026

बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश

 


हिंगोली (जिमाका), दि. 20 : राज्यातील गाई-म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी व प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, 2023” लागू केला असून, या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी अधिनस्त अधिकारी वर्गाला दिले आहेत.

राज्यात या कायद्याची अंमलबजावणी दि. 5 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. कृत्रिम रेतन प्रक्रियेद्वारे उत्तम दर्जाच्या व उच्च वंशावळीच्या वळूंचा वापर करून दुधाळ जनावरांची पैदास वाढविणे तसेच प्रजनन प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.

या अधिनियमांतर्गत राज्यातील सर्व रेत केंद्रे, भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था व सेवा पुरवठादारांना महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित संस्थांना केवळ प्रमाणित व उच्च वंशावळीच्या वळूंचेच रेत प्रजननासाठी वापरण्याची परवानगी राहणार आहे.

या सर्व प्रक्रियांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले असून, प्राधिकरणाला संबंधित केंद्रांची तपासणी, झडती तसेच नियमबाह्य साहित्य जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. क्षेत्रीय स्तरावर अनेक खाजगी कृत्रिम रेतन सेवा पुरवठादार व संस्था यांनी अद्याप प्राधिकरणाकडे नोंदणी केलेली नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांवर अधिनियमांतर्गत नियमोचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर प्राधिकरणाकडे नोंदणी करावी, असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन यांनी केले आहे.


दंड व शिक्षेच्या तरतुदी :

कलम 4 व 5 अन्वये नोंदणी प्रमाणपत्रधारक व्यक्तीने विहित मानकांचे पालन न केल्यास दोष सिद्ध झाल्यावर रु. 50 हजारांपर्यंत दंड आकारण्यात येईल. नोंदणी प्रमाणपत्राविना गोजातीय प्रजनन क्रिया करणे अथवा प्रमाणित वळूव्यतिरिक्त इतर वळूंपासून गोठवलेले रेत उत्पादन करणे किंवा अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास दोष सिद्ध झाल्यावर रु. 1 लाखांपर्यंत दंड आकारण्यात येईल. नोंदणी प्रमाणपत्रानुसार मंजूर सेवांबाबत चुकीची किंवा दिशाभूल करणारी जाहिरात अथवा प्रसिद्धी केल्यास दोष सिद्ध झाल्यावर सहा महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा रु. २ लाखांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.


शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना :

फक्त प्रमाणित व अधिकृत विर्यामात्रांचाच वापर करावा. सेवा घेण्यापूर्वी तंत्रज्ञाचा नोंदणी क्रमांक तपासून नोंदणीकृत तंत्रज्ञांकडूनच सेवा घ्यावी. कोणतीही अनियमितता आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवून पशुधनाचे संरक्षण करावे.


शेतकऱ्यांना होणारे फायदे :

सुधारित व उच्च उत्पादनक्षम वंशामुळे अधिक दूध उत्पादन मिळणार आहे. उत्तम प्रजनन कार्यक्षमतेमुळे जनावरांची संख्या व गुणवत्ता वाढणार आहे. वैज्ञानिक व नियंत्रित प्रजननामुळे दीर्घकालीन पशुधन विकास साध्य होणार आहे. दुग्ध व्यवसायात स्थैर्य निर्माण होऊन आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.

*******

19 May, 2026

हप्ता रखडलेल्या 'लाडक्या बहिणीं’ना टप्प्याटप्प्याने मिळणार लाभ

 


हिंगोली (जिमाका), दि. १९ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च व एप्रिल २०२६ या महिन्यांचे हप्ते इ-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. मात्र, शासन स्तरावर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू असून पात्र महिलांच्या खात्यात येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, हिंगोली यांनी दिली आहे.

दरम्यान, मागील सहा महिन्यांपासून लाभ प्राप्त न झालेल्या लाडक्या बहिणींनी सोशल मीडियावरील अथवा इतर अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणत्याही प्रकारची अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

*******

18 May, 2026

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी


• आदर्श आचारसंहिता लागू 




हिंगोली (जिमाका), दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवार, २५ मे २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, १ जून २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवार, २ जून २०२६ रोजी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख गुरुवार, ४ जून २०२६ अशी आहे.

निवडणुकीसाठी गुरुवार, १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सोमवार, २२ जून २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गुरुवार, २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

*******