24 April, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुधारीत आदेश निर्गमीत

 


·         जिल्हाप्रशासनामार्फत रविवार पासून जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

    हिंगोली,(जिमाका) दि.24: राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2021 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात (कोव्हीड-19) नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.

महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन विभागाचे मुख्य सचिवांच्या दि. 13 एप्रिल, 2021 रोजीच्या आदेशान्वये, राज्यातील कोविड-19 च्याअनुषंगाने दि.30 एप्रिल, 2021 रोजीपर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध सूचना नुसार सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने दि. 14 एप्रिल, 2021 रोजी रात्री 8.00 पासून ते दि. 01 मे, 2021 रोजी सकाळी 7.00 पर्यंत निर्बंध घालण्यात आले होते. परंतु शासनाने त्यात सुधारणा करून दिलेल्या सूचना प्रमाणे बदल करून आदेश निर्गमित करण्यात आले होते, परंतु  सदर आदेशातही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हिंगोली यांना प्राप्त अधिकारानुसार खालील सेवेच्या बाबतीत सुधारित आदेश निर्गमित केले आहेत.

यामध्ये हिंगोली जिल्ह्यात किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई विक्रेते, सर्व प्रकारचे अन्न विक्रेते (चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी आणि मासे), कृषी औजारे व शेतमाल, पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगाम पूर्व साहित्य (वैयक्तिक/संस्थेसाठी) विक्रेते, ही दुकाने / आस्थापना  दि. 25 एप्रिल, 2021 रोजी दुपारी 01.00 वाजेपासून ते 01 मे, 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपर्यंत या कालावधीत पूर्ण बंद राहतील. सदर कालावधीत फक्त दुध विक्री केंद्र/विक्रेते यांना या कालावधीत सकाळी 07.00 ते सकाळी 10.00 वाजता व सायंकाळी 06.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल. इतर सर्व वस्तू, साहित्य, पदार्थ यांच्या घरपोच सेवा देण्यास बंदी असेल.

सर्व शासकीय कार्यालयातील (केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था) उपस्थिती 15% राहील. परंतु फक्त कोव्हिड-19 च्या संबंधित अत्यावश्यक सेवेची कार्यालये वगळून. ज्या शासकीय कार्यालयांना 15% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवणे आवश्यक आहे. त्या कार्यालय प्रमुखांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक राहील. शासन आदेश दि. 13 एप्रिल, 2021 मधील मुद्दा क्र.5 नुसार या कार्यालयाचे आदेश दि.13 एप्रिल, 2021 मध्ये नमूद कार्यालयातील उपस्थिती एकूण कर्मचाऱ्याच्या 15% किंवा 5 कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तेवढे कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतील. शासन आदेश दि.13 एप्रिल, 2021 मधील मुद्दा क्र.2 नुसार या कार्यालयाचे आदेश दि.13 एप्रिल, 2021 मध्ये नमूद अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालयीन कामासाठी उपस्थिती कमीत कमी 15% असावी. परंतु कोणत्याही परीस्थितीत 50% च्या वर नसावी. तसेच अत्यावश्यक सेवे संबंधित प्रत्यक्षात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमीत कमी ठेवावी परंतु 100% पर्यंत आवश्यकतेनुसार ठेवता येईल.

           लग्न समारंभ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले लग्न सोहळे केवळ नोंदणी पद्धतीने (Court Marriage) पार पडता येईल. इतर अन्य कोणत्याही ठिकाणी लग्न सोहळा पार पाडता येणार नाही.

            खाजगी प्रवासी वाहतूक फक्त निकडीचे किंवा अत्यावश्यक सेवेसाठी किंवा वैध कारणासाठी वाहन चालक व वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या 50% च्या मर्यादेपर्यंत प्रवास करता येईल. जिल्हा अंतर्गत किंवा शहरात प्रवास करता येणार नाही परंतु अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारणासाठी किंवा न टाळण्यासारख्या कार्यक्रमासाठी जसे अंत्यविधी किंवा कुटुंबातील गंभीर आजारी व्यक्तीसाठी परवानगी घेवून प्रवास करता येईल. जर यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास रु.10,000/- दंड लावण्यात येईल. खाजगी प्रवासी बसेसना (Travels) वाहतूक करण्यास या कालावधीत पूर्णत: बंदी राहील.

             राज्य शासकीय किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीची वाहने 50% च्या प्रवासी क्षमतेच्या मर्यादेत वाहतूक करण्यास परवानगी राहील. हिंगोली जिल्ह्यातील आगारातून सुटणाऱ्या सर्व बसेस या कालावधीमध्ये बंद राहतील. तसेच  बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसच्या व्यवस्थापनासाठी बस स्थानक कार्यरत राहतील. परंतु  बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस शासकीय बस स्थानका शिवाय इतर कुठेही थांबणार नाहीत.

            जिल्ह्यातील सर्व बँका या कालावधीत त्यांच्या नियमित वेळा पत्रकानुसार केवळ त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी सुरु राहतील. तसेच सदर कालावधीत बँका केवळ शासकीय कामकाजासाठी व व्यापाऱ्यांच्या व्यवहारासाठी सुरु ठेवता येतील. परंतु सर्व सामान्य नागरिकांचे व्यवहार करण्यास बंदी असेल. जिल्ह्यातील जे नोंदणीकृत उद्योग आहेत त्यांना त्यांचे उद्योग सुरु ठेवण्यासाठी त्यांच्या कर्मचारी / कामगारांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांचे कडून ओळखपत्र घेणे बंधनकारक राहील. दुय्यम निबंधक कार्यालयांबाबत या कालावधीत जिह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 हिंगोली व सर्व दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये हे दस्तनोंदणी व इतर अनुषंगिक व्यवहार करण्याकरिता सर्व नागरिकांसाठी बंद राहतील. केवळ कार्यालयीन कामकाज करण्याकरिता चालू राहतील.

           सदर आदेश हे हिंगोली जिल्ह्यात दिनांक 22 एप्रिल, 2021 रोजी पासून रात्री 08.00 ते दिनांक 01 मे, 2021 चे सकाळी 7.00 वाजेपर्यत लागू राहणार आहेत. या आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी तसेच संबंधितांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची असणार आहे.

                     या आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी / कर्मचारी यांनी करावी.

****

No comments: