28 November, 2024
'बाल विवाहमुक्त भारत' अभियानाअंतर्गत मसोड व खानापूर येथे जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 28 : बाल विवाह मुक्त भारत मोहिमेचा प्रारंभ केंद्रीय महिला व बालविकास मंत्री यांच्या हस्ते नुकताच विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे करण्यात आला आहे. या मोहिमेनिमित्त भारत सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या संबंधित राज्य, केंद्रशासित प्रदेशात ही मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याविषयी निर्देशित केले होते.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व विभाग व प्रत्येक गावात शपथ/प्रतिज्ञा घेण्याचे निर्देश शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील ग्रामपंचायत कार्यालय व हिंगोली तालुक्यातील खानापूर (चित्ता) येथील विद्यासागर विद्यालयात बाल विवाहमुक्त भारत या अभियानाअंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे यांनी बाल विवाहमुक्त भारत करण्यासाठी जबाबदार यंत्रणा आणि त्यांचे योगदान या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील दामिनी पथकातील श्री. सरनाईक व आरती साळवे यांनी डायल 112 व पोलिसांची भूमिका याबाबत उपस्थितांना मागदर्शन केले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी सविस्तर मार्गदर्शन केले व उपस्थित गावातील नागरिक व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत बाल विवाह प्रतिबंधासाठी प्रतिज्ञा घेतली,
यावेळी गावातील ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका, आरोग्य क्षेत्रातील डॉ. पठाण उपस्थित होते. त्यानंतर विद्यासागर विद्यालय, खानापुर (चित्ता) येथे बाल विवाह मुक्त भारत अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीब खान पठाण यांनी आंतरराष्ट्रीय दत्तक महिना नोव्हेंबर 2024 निमित्त उपस्थित गावकऱ्यांना कायदेशीर दत्तक प्रक्रिया, प्रतिपालकत्व, नको असलेल्या नवजात बाळाचे सुखरुप समर्पण कसे करता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अनाथ, सोडून दिलेले परित्याग केलेले बाळ इत्यादी बालकांसंदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली यांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पोस्टर्स, जाहीर आवाहन संर्पक क्रमांकासह भिती पत्रके लावण्यात आले.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, चाईल्ड हेल्प लाईन (1098) चे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे, इसार संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, गावातील नागरिक व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment