06 October, 2020

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

 

हिंगोली,दि.6:  पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2020-21 मध्ये द्राक्ष, डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा, काजू व स्ट्रॉबेरी (प्रायोगिक तत्वावर) या आठ फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये 5 जून व 12 जूनच्या शासन निर्णयातील अटी, शर्ती व अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोके निकषानुसार राबविण्यात येत आहे. पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे.

कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणेबाबतचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेला देणे अपेक्षित आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना आंबिया बहार सन 2020-21 या हंगामासाठी योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने, भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. आंबिया बहारातील गारपीट या हवामान धोक्यासाठी अतिरिक्त विमा संरक्षण देण्यात येते. त्यासाठी अतिरिक्त विमा हप्ता शेतकऱ्यांना देय आहे. जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित  फळपिकासाठी चार हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोदंणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागानाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल, त्यासाठी अधिसूचित फळपिकांचे उत्पादनक्षम वय खालीलप्रमाणे आहे.

संत्रा व मोसंबी या फळपिकासाठी उत्पादनक्षम वय तीन वर्षे, डाळींब या फळपिकासाठी उत्पादनक्षम वय दोन वर्षे असा आहे. ही योजना 2020-21 या वर्षासाठी आंबिया बहार  मध्ये पाच जिल्हा समुहांसाठी असून भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्चेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रिट, फोर्ट मुंबई-400023, टोल फ्री क्रमांक: 1800116515, दूरध्वनी क्रमांक 022-61710912, ई-मेल mhwbcis@aicofindia.com या विमा कंपनीमार्फत हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

आंबिया बहार 2020-21 या वर्षामध्ये फळपीक निहाय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे, शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे यासाठी मोसंबी व केळी या फळपिकांसाठी अंतिम मुदत दि. 31 ऑक्टोबर, 2020 पर्यंत आहे. संत्रा या फळपिकासाठी  दि. 30 नोव्हेंबर, 2020 आणि डाळींब या पिकांसाठी 31 डिसेंबर, 2020 याप्रमाणे अंतिम मुदत आहे.

आंबिया बहार 2020-21 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निर्धारित करण्यात आला असून निर्धारत केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होईल.

आंबिया बहारातील अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या सविस्तर माहितीसाठी कृषि विभागाचे संकेतस्थळ  www.krishi.maharashtra.gov.in पहावे. तसेच ई-सेवा केंद्र व बँक स्तरावरही ही माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबंधित सहभागी विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांनी अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन व्ही.डी. लोखंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

0000

No comments: