06 September, 2024

कापूस पिकावरील आकस्मिक मर व्यवस्थापन

हिंगोली (जिमाका), दि. 06: जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तथा मुसळधार पावसामुळे कापसावर आकस्मिक गर (पॅरा वील्ट) हा रोग दिसून येत आहे. साधारणतः आकस्मिक मर ही विकृती पीक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व झालेले असताना अधिक प्रमाणात दिसून येते. पावसाच्या मोठ्या खंडामुळे, कपाशी पिकास पावसाचा ताण बसल्यास व त्यानंतर लगेच मोठ्या पावसामुळे निर्माण झालेले जमिनीतील आर्द्रता व साचलेले पाणी यामुळे आकस्मिक मर या विकृतीचा कापूस पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी खालील बाबींची अंमलबजावणी करण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे. आकस्मिक मर या विकृतीमुळे कापसाच्या झाडातील तेजपणा नाहीसा होऊन झाड एकदम मलूल तथा सुकल्यासारखे दिसते. तसेच त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त कापसाची सर्व पाने फुले खालच्या दिशेने वाकतात किंवा पिवळे पडतात. तसेच पाती, फुले व अपरिपक्व बोंडे सुकून गळतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगट झाडाची मुळे कुजत नाहीत. रोगग्रस्त झाडास हमखास नविन फूट येते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आकस्मिक मर रोगावर खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. कापूस पिकाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास पाणी द्यावे. पिकास प्रदीर्घ पाण्याचा ताण पडू देऊ नये. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी व साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे. शेतातील पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आकस्मिक मर या विकृतीचे लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी आळवणी करावी. यासाठी खालील पैकी एका बुरशीनाशकाचा वापर करावा. यामध्ये कॉपर ऑक्सीक्लोराइड (२५ ग्रॅम) किंवा कार्बेन्डाझीम (१० ग्रॅम) युरिया (२०० ग्रॅम)/ १० लीटर पाणी या प्रमाणात द्रावण करून प्रती झाडास २५०-५०० मिली द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी करावी. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी २ टक्के डीएपी (२०० ग्रॅम/१० लि. पाणी) याची आळवणी करून लगेच हलके पाणी द्यावे. (तांत्रिक माहिती व सहकार्य : कापूस सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)

No comments: