03 September, 2024

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अडीच लाख हेक्टरवर क्षेत्र बाधित

• दहा वर्षीय मुलीसह एकाचा मृत्यू, तर 101 जनावरे मयत हिंगोली (जिमाका), दि. 03 : गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात सततधार पाऊस सुरु असून, रविवारी एकाच दिवशी 141.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीविषयक नुकसानीबाबत जिल्ह्याचे एकूण पेरणी क्षेत्र 3 लाख 49 हजार 859 हेक्टरपैकी अंदाजे 2 लाख 58 हजार 898 हेक्टर शेती पिक नुकसान झालेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याबाबत सर्व तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे करुन 2 दिवसात माहिती प्राप्त होईल. जिरायत बाधित क्षेत्रासाठी मदत रक्कम प्रति हेक्टर 13 हजार 600 रुपये असून तीन हेक्टरच्या मर्यादेत देय आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर तर फळपिके पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 36 हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत देय असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. दहा वर्षीय मुलीसह एकाचा मृत्यू हिंगोली जिल्ह्यामध्ये रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून यामध्ये वसमत तालुक्यातील टेंभूर्णी येथील 38 वर्षीय सुभाष बाबुराव सवंडकर या व्यक्तीचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या नियमाप्रमाणे 4 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच वसमत तालुक्यातील पारवा येथील महेश संतोष कदम (22 वर्षे) यांच्या पायावर वीज पडून जखमी झाला आहे. तसेच संजय भिमराव ठोंबरे (33 वर्षे) व कु.चैतन्या शेषराव ठोंबरे (10 वर्षे) रा.सारंगवाडी ता.औंढा नागनाथ हे नाल्याच्या पाण्यात वाहुन गेले होते. त्यापैकी संजय ठोंबरे हे झाडावर सुरक्षितरित्या होते. तर कु. चैतन्या मयत आढळून आली आहे. जिल्ह्यात लहान मोठ्या 101 पाळीव जनावरांचा मृत्यू झालेले असून पीएम अहवाल प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यामध्ये अंशत: पडझड झालेल्या घराची संख्या 632 आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच 218 नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले असून त्यांच्या त्यांच्या भोजन, निवास, इ. व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पुरात अडकलेल्या 79 नागरिकांना रेस्कू करुन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पंचनाम्याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा हिंगोली जिल्ह्यात रविवारी दि. 1 सप्टेंबर रोजी सर्वत्र मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे तसेच पशुधनांचे नुकसान झालेले आहे. पावसामुळे शेतीपिकांचे तसेच पशुधनाचे पंचनामे सुरु करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेस देण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हा व्यवस्थापन कक्ष सुसज्ज ठेवण्यात आलेला आहे. काही अडचण आल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. *****

No comments: