25 September, 2024

प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान हिंगोली जिल्ह्यातील 81 आदिवासी गावांचा होणार कायापालट

हिंगोली, दि.25 (जिमाका) : दुर्गम व अति दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवाच्या सर्वागीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे देशातील 63 हजार तर महाराष्ट्रातील 4 हजार 976 आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. त्या माध्यमातून राज्यातील 32 जिल्ह्यातील 12 लाख 87 हजार 702 आदिवासी बांधवाचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये हिंगोलीतील 81 गावांचा या अभियानात समावेश आहे. या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सन 2024-25 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानात पीएम-जनमन अभियानात 17 मंत्रालयांव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध 25 उपक्रमांचा समावेश आहे. तसेच आदिवासी क्षेत्र, समुदायांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकासावर भर दिला जाणार आहे. या अभियानांतर्गत पक्की घरे, ग्रामीण रस्ते, प्रत्येक घरात शुद्ध पेयजलाची सोय, सर्व घरामध्ये वीज जोडणी, फिरत्या वैद्यकीय पथकाची स्थापना, आयुष्मान कार्ड, घरगुती गॅस जोडणी, आदिवासी बहुद्देशीय विपणन केंद्र, आश्रमशाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, सिकलसेल अॅनिमियाशी लढण्यासाठी केंद्राची निर्मिती, अंगणवाडी केंद्र बांधणे, कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, कृषी विभागाच्या योजनाचा लाभ देणे, मत्स्य व्यवसाय करण्यास चालना देणे, पर्यटनाचा विकास करणे इत्यादी विविध प्रकारचे लाभ देण्याबाबतची कार्यवाही ही नियोजनबद्धरित्या पुढील 5 वर्षामध्ये करण्यात येणार असून एकूण 17 विभागामार्फत हे लाभ देण्यात येणार आहेत. यामुळे आदिवासी बहुल गावांचा सर्वांगीण विकास होणार आहे. आदिवासी समाजाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती उंचावण्यास मदत होणार आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील आदिवासी समाजाच्या सर्वच लाभार्थ्यांनी या योजनेचा वेळोवेळी लाभ घेण्याचे आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. तसेच प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाच्या अनुषंगाने आदिवासी सामाजिक संस्था, संघटना, आदिवासी स्वयंसेवक यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयाशी समन्वय साधून या अभियानाचा एक भाग होण्याचे आवाहन कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे यांनी केले आहे. ******

No comments: