06 June, 2025

हिंगोली जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

हिंगोली, (जिमाका) दि. 06: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज हिंगोली जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. शिवस्वराज्य दिन हे नव्या पिढीला प्रेरणा व नवचैतन्य देणारे स्मरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक करून स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने 2021 पासून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या हस्ते भगवा स्वराज्यध्वज शिवशक राजदंडासह गुढीची पूजा करुन व गुढी उभारुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे सादरीकरण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) संजय कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुणे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके, बाधंकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी पद्यमणे, लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, शिक्षणाधिकारी (योजना) संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर, उप अभियंता एस. बी. गिते तसेच जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. *****

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यासाठी 10 जून अंतिम मुदत

हिंगोली (जिमाका), दि. 06 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ऑनलाईन पध्दतीने विभागाच्या संकेतस्थळावर दि. 15 मार्च, 2025 पर्यंत स्वीकारण्यात आले होते. विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या अर्जाची तपासणी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहेत. त्यांनी ऑनलाईन पध्दतीने त्रुटीची पूर्तता करुन अर्ज फेरसादर करण्यासाठी 10 जून, 2025 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. विहित मुदतीत त्रुटीची पूर्तता करुन अर्ज ऑनलाईन फेर सादर न केल्यास अर्ज अपात्र, बाद ठरतील. तसेच विद्यार्थ्यांसाठी बँक खाते भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते तपशील भरुन घेण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जातील त्रुटी पूर्ण करण्यात तसेच बँक खाते भरण्यास अडचण येत असल्यास सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. ******

विकसित कृषी संकल्प अभियान औंढा नागनाथ तालुक्यात उत्साहात संपन्न विकसित कृषी संकल्प अभियान औंढा नागनाथ तालुक्यात उत्साहात संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 06 : भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व कृषी विज्ञान केंद्र तोंडापुर, जि. हिंगोली अंतर्गत विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रम औंढा नागनाथ तालुक्यातील असोला, कोंडशी व वडद या गावांमध्ये उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सनियंत्रक कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी विकसित कृषि संकल्प अभियान भेटीचा मुख्य उद्देश खरीप हंगामाच्या पूर्व तयारीमध्ये मदत करणे, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे आणि शासनाच्या योजनांची माहिती देत शेतकऱ्यांच्या शंकेचे निरासन केले. तसेच त्यांनी नैसर्गिक शेतीचे महत्व, हवामान आधारित पिक सल्ला घेउन शेतकऱ्यांनी शेती करावी, असे सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी विविध योजनांची माहिती देताना नैसर्गिक शेतीचे महत्व सांगितले. तसेच त्यांनी वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी व कृषि विज्ञान केंद्राच्या सल्ल्याने शेतकऱ्यांनी शेती करावी, असे आवाहन केले. या विकसित कृषि संकल्प अभियान कार्यक्रमामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषद,नवी दिल्ली केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. तिरुग्नानवेल यांनी प्रमुख मार्गदर्शन करतांना लिंबूवर्गीय पिकांचे लागवड तंत्रज्ञान, योग्य वेळेवर खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकेचे निरसन केले. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुरजित मंडल यांनी माती नमुना कसा घ्यावा, त्याचे महत्त्व, माती परीक्षण नुसार खत व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. परभणी येथील पशुवैद्यक आणि पशु विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सईद अली यांनी पावसाळ्यात जनावराची घ्यावयाची काळजी, एकात्मिक पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता व स्वच्छ दुध उत्पादन विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. गोळेगाव कृषी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. एस.एच. सारंग यांनी विद्यापीठाचे नवीन विकसित केलेले सोयाबीन व तूर पिकाच्या वाणाची माहिती व या पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, बीज प्रक्रियाचे महत्व सर्वांना अवगत करून दिले. इफकोचे वरिष्ठ मार्केटींग व्यवस्थापक डॉ. शिवाजी पोवार यांनी इफकोचे उद्देश, शेती मध्ये नॅनो युरिया, डी.ए.पी. वापरण्याची पद्धत व प्रमाण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. अतुल मुराई यांनी तर आभार प्रदर्शन अनिल ओळंबे यांनी केले. या अभियानांतर्गत किसान रथाद्वारे अनेक गावामध्ये जाऊन विविध तंत्रज्ञान विषय माहिती देण्यात येत आहे. तसेच विविध विषयाच्या घडीपत्रिका सुद्धा शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांमध्ये इफकोचे प्रतिनिधी आणि आय.पी.एल.चे प्रतिनिधी यांनी देखील कृषि फवारणीसाठी ड्रोन प्रात्यक्षिकासह सहभाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांकडून अभिप्राय देखील नोंदवण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोला, कोंडसी व वडद गावचे सरपंच, बी. टी. राठोड, गुलाबराव सूर्यवंशी, संतोष हाणवते, बबनराव ढोबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. *******

05 June, 2025

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण

हिंगोली (जिमाका), दि. 05 : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणामुळे परिसरातील नागरिकांना ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचे सुशोभिकरण व्हावे. यासाठी जिल्हा प्रशासन 5 स्टार हिंगोलीकर हा उपक्रम हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत कार्यक्षेत्रामध्ये हाती घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिंगोली नगर परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी नगर पालिका प्रशासनचे सहायक आयुक्त प्रदीप जगताप, नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी प्रकाश साबळे, शाम माळवटकर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवडीची चळवळ ही संपूर्ण जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. या वृक्ष लागवड कार्यक्रमास प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच येथील नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. *****

आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी - अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर

पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने जनसंपर्क अधिकारी यांची बैठक मुंबई, दि. ५ : आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व खरी माहिती पोहचणे अधिक गरजेचे असते. यासाठी आपत्ती काळात घडणाऱ्या सर्व घटना, आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याची वस्तुनिष्ठ माहिती संबंधित यंत्रणांकडून घेऊन प्रसारमाध्यमांद्वारे माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जनसंपर्क अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. आपत्तीच्या काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून प्रसार माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले. यंदाच्या पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मुंबईतील सर्व यंत्रणा व विभागांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांच्यासह विविध विभागाचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर म्हणाले, नैसर्गिक आपत्ती संदर्भात कोणतीही अचूक पूर्वसूचना मिळत नसते. अशा वेळी यंत्रणांमध्ये, विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. आपत्तीपूर्व तयारी, तातडीचा प्रतिसाद आणि समन्वय महत्त्वाच्या असून या काळात माहितीचा अचूक प्रसार आणि जनतेपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचविणे गरजेचे असते. जनसंपर्क अधिकाऱ्यांनी आपत्ती संदर्भातील माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची खातरजमा करूनच प्रसारित केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी समन्वय, संवाद आणि संवेदनशीलतेवर भर द्यावा - हेमराज बागुल आपत्कालीन परिस्थितीत समन्वय, संवाद आणि संवेदनशीलता यावर भर द्यावा असे सांगून संचालक (प्रशासन) हेमराज बागुल म्हणाले, आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ माहिती देण्याबरोबरच जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा. चुकीची माहिती आणि विसंवाद शासनाची प्रतिमा मलीन करू शकते. त्यामुळे संस्थांची प्रतिमा जपण्यास प्राधान्य द्यावे, असेही श्री. बागुल म्हणाले. अफवांचे खंडन करण्यास प्राधान्य द्यावे – डॉ. गणेश मुळे आपत्तीच्या वेळी प्रशासनाच्या प्रत्यक्ष कृती आणि मदतकार्याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाबरोबरच आपत्ती काळात पसरवल्या जाणाऱ्या अफवांचे खंडन करण्यास जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे, असे संचालक ( वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले. श्री.मुळे म्हणाले, आपत्ती परिस्थितीत स्थानिक, राज्य व केंद्रीय यंत्रणा तत्काळ मदत कार्यात सहभागी होतात. या यंत्रणांकडून वस्तुनिष्ठ माहिती घेवून ती समाजमाध्यमे, वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी व रेडिओ यांसारख्या माध्यमांच्या सहाय्याने जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पार पाडावी. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांना मदतीच्या उपाययोजनांची माहिती देणे, आणि आवश्यक सूचना पोहचवणे हे जनसंपर्क अधिकाऱ्यांचे महत्वाचे काम असल्याचे सांगून डॉ. मुळे म्हणाले जनसंपर्क अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्यासाठी आणि माहितीच्या आदान- प्रदानासाठी प्रत्येक विभागाने स्वतःचा व्हॉटसॲप ग्रुप तयार करावा, ज्यामध्ये समन्वय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असावा. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमांना तत्काळ माहिती देण्यात यावी. आपल्या कार्यक्षेत्रात अचानक धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास त्याची माहिती तत्काळ समाजमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवावी, आपत्ती व्यवस्थापन पुस्तिका दरवर्षी अद्ययावत माहितीसह असावी, विशेषतः महत्त्वाचे हेल्पलाइन नंबर आणि यंत्रणांचे संपर्क तपशील याचा त्यामध्ये समावेश असावा असेही श्री.मुळे म्हणाले. यावेळी उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त अजय साबळे, मुंबई दूरदर्शनच्या उपसंचालक संगीता गोडबोले, ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, आकाशवाणीचे सहायक संचालक डॉ.संतोष जाधव, सहायक संचालक (माहिती) इर्शाद बागवान यांनीही विविध सूचना मांडल्या. ००००

सामाजिक वनीकरण विभागामार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

हिंगोली, दि.05 (जिमाका): जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभाग हिंगोलीच्या वतीने हिंगोली, कळमनुरी, वसमत या तीनही सामाजिक वन परिक्षेत्रामध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरण निमित्त बळसोंड ग्रामपंचायत परिसरात आयोजित कार्यक्रमात आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, छत्रपती संभाजीनगरचे वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा तसेच सामाजिक वनीकरण विभागीय वनाधिकारी पुष्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी, हिंगोली, वसमत या सामाजिक वनीकरण परिक्षेत्रात हिंगोली, सेनगाव, औंढा, वसमत, कळमनुरी या सर्व तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते, वृक्ष प्रेमी संघटना, जवळपास 15 शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झाले होते. 'चला जाऊया वनाला' या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांना वनांचे, पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. जंगलांचे महत्त्व, वन्य प्राणी, तापमानात होणारी वाढ, वृक्ष लागवडीचे महत्त्व इत्यादी बाबत जनजागृती करून त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. प्रभात फेरी, वन्यप्राण्यांसाठीचे पानवठे, अटल आनंदवन वृक्ष लागवड, झाडांची ओळख, वनांचे आगीपासून संरक्षणाबाबत माहिती देण्यात आली. तसेच विविध परिक्षेत्रात मानवी जीवनातील वनांचे महत्त्व या विषयावर इको क्लब शाळेत वृक्षारोपण, वृक्षदिंडी, वकृत्व स्पर्धा, वृक्षांची ओळख स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वने व वन्य जीवाबद्दल आपुलकी निर्माण करून जनजागृती करण्यात आली. पर्यावरणविषयक जनजागृती कार्यशाळा, पर्यावरण संवर्धन व जतन करण्यासाठीचे लोगो स्पर्धा, वृक्षदिंडी, प्रभातफेरीसारख्या कार्यक्रमाचे आयोजन ‘रोपे आपल्या दारी’अंतर्गत निसर्गप्रेमी यांना आनंदवृक्ष भेट देण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागाचे पुष्पा पवार व अंगद खटाणे, जयश्री बर्गे, वनपाल कीर्तनकार, मठवाले, बिरसोने, गायकवाड, खंदारे, पारस्कर, डोईफोडे व वनरक्षक घुगे, कोटकर, यादव रसाळ, पंडित व इतर सर्व वनरक्षक यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले. तसेच जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी यांनी उपक्रमासाठी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या समवेत हिरीरीने सहभाग घेतला. ******

समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इगतपुरी येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण संपन्न नाशिक, दि. ५ : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले आहे. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत, आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. समृद्धी महामार्गाचा ७६ किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले. यातील इगतपुरी जवळील बोगदा हा ८ किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे. समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे एक हजार शेततळी तयार झाली आहेत. याबरोबरच दर ५०० मीटर अंतरावर जलपुनर्भरण व्यवस्था करण्यात आली आहे. या महामार्गालगत सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी ३५ मेगावॉट प्रकल्पाचे काम सुरू आहे. महामार्गालगत गेल कंपनीतर्फे गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे. या माध्यमातून नव्याने विकसित होणाऱ्या स्टीलसिटी गडचिरोली पर्यंत गॅस पोहोचविता येईल. तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळे या मार्गामुळे जोडली आहेत. वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. महामार्ग अपघात मुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारत अडथळे येऊ नयेत म्हणून १०० प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा संचार विना व्यत्यय सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आगामी काळात शक्तिपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे वेळ, प्रदूषण आणि इंधनाची बचत होणार आहे. या महामार्गामुळे कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. पर्यावरण पूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल. तसेच नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागासाठी लाभदायक ठरेल, त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग उपयुक्त ठरेल. या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. वाहन चालवतांना चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे, असेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी यंदा १० कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या महामार्गानंतर आता राज्यातील अन्य प्रकल्पांनाही गती देण्यात येईल, असे सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी परिश्रम घेणारे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासह मान्यवरांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वाहनाचे सारथ्य केले. 00000