हिंगोली,
दि. 21(जिमाका): भारतीय टपाल विभागातर्फे
तरुणाईसाठी युनिव्हर्सल पोस्टल युनियन यांच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये 9 ते 15 वर्षे वयोगटातील
विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन डाक अधीक्षक संजय लिये यांनी केले आहे.
या वर्षीच्या पत्रलेखन स्पर्धेचा विषय “सध्याच्या
डिजिटल जगात मानवी संबंध का महत्त्वाचे आहेत, याबाबत मित्राला लिहिलेले पत्र” असा आहे.
स्पर्धेसाठी पत्र इंग्रजी भाषेत किंवा आठव्या परिशिष्टामध्ये नमूद भाषांपैकी कोणत्याही
एका भाषेत लिहिता येणार आहे.
ही स्पर्धा इच्छुक शाळांमध्ये शनिवार, दि. 7 मार्च
रोजी घेण्यात येणार असून, अधीक्षक डाकघर कार्यालय, शनिवार बाजार, परभणी येथे रविवार,
दि. 8 मार्च रोजीही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी
इच्छुक विद्यार्थी अथवा शाळांनी दि. 20 फेब्रुवारीपर्यंत डाक अधीक्षक कार्यालय, परभणी
येथे संपर्क साधून दोन प्रतींमध्ये अर्ज सादर करावा. अर्जासोबत तीन पासपोर्ट साईज छायाचित्रे
तसेच वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) किंवा तत्सम कागदपत्रांच्या
छायांकित प्रती सोबत जोडाव्यात.
राज्य पातळीवर
निवड झालेल्या उत्कृष्ट पत्रांसाठी प्रथम पारितोषिक 25 हजार, द्वितीय 10 व तृतीय पारितोषिक
पाच हजार रुपये तसेच प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर निवड
झालेल्या पत्रांसाठी अनुक्रमे 50, 25 आणि 10 हजार रुपये रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे
देण्यात येतील.
राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट ठरलेले पत्र भारताचे अधिकृत नामांकन
म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. युनिव्हर्सल पोस्टल युनियनकडून
निवड झालेल्या पत्रांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके तसेच प्रमाणपत्रे प्रदान करण्यात
येणार आहेत. सुवर्णपदक विजेत्यास युनिव्हर्सल पोस्टल युनियनचे मुख्यालय असलेल्या बर्न
(स्वित्झर्लंड) येथे भेट देण्याची संधी किंवा युपीयूने ठरविल्याप्रमाणे समतुल्य बक्षीस
देण्यात येणार आहे. तरी युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय पत्रलेखन
स्पर्धेमध्ये परभणी डाक विभागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व शाळांनी सहभाग नोंदवावा,
असे आवाहन संजय लिये यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment