04 August, 2018

‘गोवर रुबेला लसीकरण अभियान-2018’ 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील एकही मुल वंचित राहु नये -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी



‘गोवर रुबेला लसीकरण अभियान-2018’ 
9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील एकही मुल वंचित राहु नये
                                    -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
      हिंगोली,दि.4 : जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात प्रसार माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची असून या अभियानाचा योग्य प्रचार व प्रसार करून सदर अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केली.
            येथील जिल्हा नियोजन सभागृहातील आयोजित जिल्हा दक्षता समिती बैठकीत जिल्हाधिकारी अनिल भंडारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. सय्यद मुजीब शिक्षणाधिकारी श्री. इंगोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म. व बा.) गणेश वाघ, समाज कल्याण अधिकारी श्रीमती गीता गुट्टे, यांच्यासह तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागाचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री. भंडारी पुढे म्हणाले की, गोवर रुबेला लसीकरण अभियान 2018 येत्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सुरू होत असल्यामुळे जिल्ह्यात 100 टक्के यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग व इतर विविध विभागांनी परस्पर समन्वय साधावा. तसेच येणाऱ्या विविध सण उत्सवाच्या उपक्रमात, जिल्ह्यात होणाऱ्या दसरा महोत्सवात या अभियानाची प्रचार व प्रसिध्दी करून जिल्ह्यातील 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील एकही बालक गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना यावेळी त्यांनी केली.
            हिंगोली जिल्हा मानव विकास निर्देशांकानुसार इतर जिल्ह्यांच्या तुलनेत फार पिछाडीवर असून सदर निर्देशांक वाढवण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी सर्व विभागाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. 
यावेळी आपल्या मार्गदर्शनात जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. सय्यद मुजीब यांनी गोवर रुबेला या रोगाची सखोल माहिती देतांना सांगितले की, गोवर हा रोग अत्यंत घातक असून हा रोग विषाणूपासून नाक, तोंडाव्दारे होतो. या रोगामुळे जगातील होणाऱ्या मृत्युपैकी 36 टक्के मृत्यु भारतात होतात. तर रुबेला हा रोग सुध्दा विषाणूजन्य असून तो स्त्रियांच्या गरोदरपणात उद्भवल्यास अत्यंत घातक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी गोवर रुबेला या रोगाची लस घेऊन सन 2020 पर्यंत पोलिओप्रमाणे या रोगाचे देशातून समुळ नष्ट करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
बैठकीच्या प्रास्ताविकेत जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांनी सदरील कार्यशाळेत पॉवर पॉईंट प्रेझेंटशनव्दारे सादरीकरण केले, तर सूत्रसंचालन जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी सतीश रुणवाल यांनी केले.
सदरील मोहिम यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म. व बा.) गणेश वाघ, शिक्षणाधिकारी श्री. इंगोले, धर्मगुरू सालासार मौलवी, आयएमएचे अध्यक्ष श्री. देशमुख, डॉ. नगरे, निमाचे श्री. मुलगीर, प्रसार माध्यमचे प्रतिनिधी श्री. पाटील यांनी गोवर रुबेला लसीकरण अभियान यशस्वी करण्यासाठी अभिवचन घेतले.
*****

No comments: