29 July, 2019

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू



जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू

        हिंगोली,दि.29: जिल्ह्यात दिनांक 1 ऑगस्ट  रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती साजरी होणार आहे. तसेच दिनांक 5 ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरु होत असून दर श्रावण सोमवार निमित्त औंढा नागनाथ मंदिरामध्ये  तसेच जिल्ह्यात इतरही मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. तसेच दिनांक 5 ऑगस्ट रोजी नागपंचमी हा सण आहे.
            तसेच देशात झारखंड राज्यात मॉबलिचींग प्रकरणामध्ये तरबेज अन्सारी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्याभरात  आता पावेतो 1 शांतता रॅली, मोर्चा व बाजारपेठा बंद ठेवून शासनास निवेदने सादर करण्यात आले आहे. तसेच चांदणी चौक दिल्ली येथे मंदिरावर झालेल्या  हल्याच्या निषेधार्थ  जिल्ह्यात  विविध प्रकारचे निषेध आंदोलने  करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 तसेच  विविध पक्ष व  संघटनेतर्फे त्यांच्या मागणी संदर्भाने मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्तारोको, उपोषणे सुरु असून अशा विविध  घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 26 जुलै  2019 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 9 ऑगस्ट 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****


No comments: