05 November, 2016

भारत सरकार शिष्यवृत्तीचे
 शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात येणार
        हिंगोली, दि. 4 :- सन 2015-16 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील एकूण 148 महाविद्यालयातील 10 हजार 756 विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क या योजनेसाठी अर्ज भरले होते त्यापैकी 90 टक्केपेक्षा जास्त अर्ज निकाली काढून संबंधीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उपरोक्त योजनांचा लाभ देण्यात आलेला आहे. तरी पण आज स्थितीत एकूण 892 अर्ज वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या स्तरावर प्रलंबित आहिेत. त्यामुळे सदर अर्ज निकाली काढणे शक्य नाही. महाविद्यालयनिहाय प्रलंबित अर्जाबाबत समाज कल्याण विभागामार्फत महाविद्यालयांच्या ई-मेल आयडी वर पत्र पाठवून कळविण्यात आले आहे. तरी संबंधित महाविद्यालयाने आपल्या स्तरावर असलेले प्रलंबित अर्ज समाज कल्याण विभागास आवश्यक असलेल्या कागदपत्रासह सादर करून व ऑनलाईन व्दारे समाज कल्याण विभागाकडे सर्व प्रलंबित अर्ज दि. 15 नोव्हेंबर, 2016 पर्यंत सादर करावेत जेणेकरून समाज कल्याण विभागास सदर अर्जाची तपासणी करून पात्र अर्ज निकाली काढणे सोईचे होईल.

                दि. 15 नोव्हेंबर, 2016 पर्यंत महाविद्यालयाकडून समाज कल्याण विभागास आवश्यक कागदपत्रासह प्रलंबित अर्जांच्या मूळ प्रति व बी-स्टेंटमेंट सादर न केल्यास किंवा ऑनलाईन प्रक्रियेव्दारे सुध्दा समाज कल्याण विभागास अर्ज सादर न केल्यास महाविद्यालयस्तरावर राहीलेले प्रलंबित अर्ज रद्द करण्याची शिफारस वरिष्ठ कार्यालयास करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहील्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्यांची राहील. याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.                                                     *****                                      

No comments: