09 January, 2018

गरोदर महिलांना प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ द्यावा

जिल्हाधिकारी अनिल भंडारी
        हिंगोली, दि.09: प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानातंर्गत शासकीय रुग्णालय, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय सर्व संस्था मध्ये गरोदर महिलांची मोफत तपासणी केली जाते. या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांर्तगत खासगी रुग्णालयांनी देखील सहभाग नोंदवून गरजूंना या अभियानाचा लाभ द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
            जिल्हा शासकीय रुग्णालय येथे आयोजित प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. सतिष रुणवाल, डॉ. कुटे, डॉ. बोले, डॉ. अग्रवाल, डॉ. गुंडेवार यांची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले की, बहुतेक महिलांना योग्य पोषण आणि स्वत:च्या आरोग्याची पूर्तता करणे त्यांच्यासाठी मुश्कील असते. तसेच अनेक महिला या घरातील कामात इतक्या व्यस्त असतात कि त्यांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. याकरीताच शासनाने गर्भवती महिलांकरीता ‘पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान’ (PMSMA) सुरु केली. या योजनेमुळे माता व शिशु मृत्यू दर कमी करता येऊ शकतो. गर्भवती महिला विशेषता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला कुपोषित असतात. त्यांना गर्भधारणे दम्यान पोषक घटक भेटत नाहीत. यामुळे बहुतेक वेळा जन्माला येणारी मुले कोणत्या ना कोणत्या आजाराची शिकार होऊनच जन्माला येतात आणि याबरोबरच कुपोषित असतात. जर गर्भवती महिलांना वेळच्यावेळी देखरेख केली तर नवजात बालकांना होणाऱ्या बऱ्याच आजारांची समस्या कमी होण्यास मदत होते. गरिबी आणि जागरूकता नसल्यामुळे बहुतेक महिला वेळेवर वैद्यकीय सल्ला आणि घेण्यात येत असलेल्या काळजीचा फायदा घेत नाही. पीएमएसएमए मुळे प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला गर्भवती महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी होत असल्याची खात्री होईल. गर्भवती महिला देशातील कोणत्याही शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेऊ शकतात. नियमित तपासणी व काळजी घेतल्यावर निश्चितपणे रोगजनक जन्म घेणाऱ्या मुलांची संख्या कमी होईल. वैद्यकीय तपासणीनंतर आरोग्याची योग्य पाळत ठेवल्यास पोषण पूरक आहार घटक उपलब्धता खात्री होऊन माता व शिशु यांना निरोगी जीवन मिळण्यास मदत होते.
            यावेळी डॉ. रुणवाल म्हणाले की, पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानातंर्गत गर्भवती महिलांसाठी हा कार्यक्रम अशा सर्व गर्भवती महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवतो ज्या गर्भावस्थेच्या 2 आणि 3 ट्राइमेस्टर मध्ये आहेत. पीएमएसएमए योजनेनुसार सर्व सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रावर प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला सर्व गर्भवती महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाते. सर्वसाधारणपणे जेंव्हा एखादी महिला गर्भवती राहते अशावेळेस वेगवेगळ्या आजारांनी जसे गरोदर महिलांचे वजन, उंची, हिमोग्लोबीन, रक्‍तगट, एचआयव्ही, कावीळ, शुगर आदी तपासणी करून गोळ्या-औषधे देण्यात येतात. या योजनेनुसार गर्भवती महिलांसाठी चांगले आरोग्य आणि स्वतंत्र तपासणी प्रदान करण्याबरोबरच निरोगी मुलांना जन्म देण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
            यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी गर्भवती महिंलाची करण्यात येणारी तपासणीची प्रत्यक्ष पाहणी केली.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैद्यकीय निवासी अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रशांत गिरी, प्रदिप आंधळे, शिवाजी शेळके, श्रीमती क्षीरसागर, श्रीमती गिरी यांनी सहकार्य केले.
*****


No comments: