31 May, 2025
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार आश्विनकुमार माने यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, सचिन जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
******
30 May, 2025
‘‘एल्डर लाईन 14567’’ ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार
हिंगोली (जिमाका), दि. 30 : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ‘‘एल्डर लाईन 14567’’ ही सेवा देशभरात वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे. जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्यामार्फत ही सेवा महाराष्ट्रात राबवली जाते. मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन जनसेवा फाऊंडेशन गेली 37 वर्षापासून सातत्याने विविध प्रकल्पाद्वारे गरीब, आजारी, वृध्द, अपंग, निराधार, गरीब मुले-मुली आणि महिला यांची सेवा करीत आहेत. जनसेवा फाऊंडेशनला संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जा प्राप्त आहे.
महाराष्ट्रात 14567 राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन सेवेची अंमलबजावणी ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली आहे. या 14567 राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईनवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक कॉल्स आले असून 30 हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे.
या हेल्पलाईनद्वारे आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृध्दाश्रम, डे केअर सेंटर याबाबतची माहिती देण्यात येते. तसेच कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. मानसिक आजार व चिंता, ताण, राग इत्यादी व्यवस्थापनाबाबत त्यांना भावनिक आधार दिला जातो. तसेच बेघर व अत्याचारग्रस्त वृध्दांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबियांशी संवाद, पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न, पोलीस प्रशासनाशी समन्वय व समुपदेशन आदी सेवा मोफत पुरविल्या जातात.
"घरात आम्ही दोघं एकटेच, मुलगा परदेशात आहे…", "नातेवाइकांनी आमचं घर बळकावलंय…", "कुटुंबात कुणाशी बोलणंच होत नाही…" अशा असंख्य व्यथा, वेदना, तक्रारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक "एल्डर लाईन" हेल्पलाइनवर मोकळेपणाने मांडत आहेत.
त्यामुळे एल्डर लाईन 14567 ही केवळ हेल्पलाईन नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वयोवृध्दांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता येईल, यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ज्येष्ठांसाठी ही सेवा अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरुक व्हावे आणि सर्व गरजू वयोवृध्दांनी या एल्डर लाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
शासनाच्या 1027 सेवा 15 ऑगस्टपासून एका पोर्टलवर - संजय काटकर
हिंगोली (जिमाका), दि. 30 : राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या 1027 अधिसूचित सेवा ऑनलाईन दिल्या जातात. या सर्व सेवा वेगवेगळ्या प्लॅटफार्मवरुन दिल्या जातात. सर्व सेवा 15 ऑगस्ट, 2025 पासून एकाच पोर्टलवरुन देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती महा आयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी हिंगोली येथे आयोजित बैठकीत दिली.
शासनाच्या सेवा नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आपले सेवा केंद्र चालकांच्या भेटी घेणे, स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेण्यासाठी श्री. काटकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. जिल्ह्यातील आपले सेवा केंद्र चालकांची बैठक जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री. काटकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक उमाकांत मोकरे, जिल्हा प्रकल्प समन्वयक सागर भुतडा उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. काटकर यांनी सेवा अधिनियमांतर्गत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचे प्रयत्न सुरु असून त्यात 138 सेवा 31 मेपर्यंत एकत्रित केल्या जाणार आहेत. त्यापैकी 92 सेवा एकत्रित केल्या आहेत. 306 सेवा ऑफलाईन दिल्या जातात. त्याही ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सर्व 1027 सेवा 15 ऑगस्ट, 2025 पर्यंत नागरिकांना देता येतील असे नियोजन असल्याचे सांगितले.
या सेवा पुरवितांना सेवा केंद्र चालकांच्या अडचणी जाणून घेणे, ज्या ठिकाणी अधिक काम असते, तेथे पाच लॉगिंग देणे, भूकेंद्रित सेवा देणे, याबाबत माहिती घेण्यात येत आहे. जिल्ह्यात 473 सेवा केंद्र असून या सेवा केंद्रावर सेवांचे दर प्रदर्शित करणे, क्युआर कोडवर तक्रार दाखल करता येणे, भूस्थिर सेवा इत्यादी सुधारणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या सेवांची माहिती लोकांना मिळावी म्हणून व्हॉटस्अपवरुन चॅटबाट सुविधा नजीकच्या काळात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
*****
अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर युएचक्यू भरती मेळावा
हिंगोली (जिमाका), दि. 30 : सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांसाठी अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर जवानांची भरती महार रेजिमेंट सेंटर सागर (म.प्र.) या ठिकाणी दि. 23 ते 28 जून, 2025 पर्यंत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या भरती मेळाव्यासाठी रजिस्ट्रेशन करुन घेणे अनिवार्य आहे. महार रेजिमेंट सागर कार्यालयीन भ्रमणध्वनी क्र. 8871180305, 9893837487 वर मेसेजद्वारे आपले नाव नोंदवावे आणि रजिस्ट्रेशन झाल्यावर पूर्ण माहितीसाठी सेंटर सागर यांचा कार्यालयीन भ्रमणध्वनी क्र. 9630141289 वर संपर्क साधावा. होतकरु सैनिकांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कार्यालयीन भ्रमणध्वनी क्र. 9021208822 वर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा सैनिक कक्ष, हिंगोली यांनी केले आहे.
*****
महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजनेद्वारे मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी
हिंगोली (जिमाका), दि. 30 : मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत पुरवणारी महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून प्रभावीपणे राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. ही योजना मराठा-कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरेल.
अर्ज प्रकिया आणि मदत :
इच्छूक विद्यार्थ्यांनी सारथीच्या www.fs.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विहित नमुन्यात दि. 16 जून, 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी स्प्रिंग-2025 (एप्रिल/मे 2025), फाल-2025 (जुलै/ऑगस्ट/सप्टेंबर 2025) आणि स्प्रिंग-2026 (जानेवारी ते मार्च 2026) या कालावधीत प्रवेश घेणारे विद्यार्थी अर्ज करुन शकतात.
योजनेचा उद्देश आणि व्याप्ती :
ही योजना मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएडी क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रँकींग मध्ये 200 च्या असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. यामध्ये 50 जागा पदव्युत्तर पदवी, पदविका आणि 25 जागा पीएचडीच्या विविध अभ्यासक्रमासाठी राखीव आहेत.
शिष्यवृत्तीचे स्वरुप :
योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता आणि वैयक्तीक आरोग्य विमा यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. प्रती वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल 30 लाख रुपये आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी कमाल 40 लाख रुपये या मर्यादेत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.
पात्रता निकष :
नागरिकत्व आणि रहिवास लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीतील महाराष्ट्राचा रहिवासी आणि भारतीय नागरिक असावा. शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावी. वयोमर्यादा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल वय 35 वर्षे आणि पीएचडीसाठी 40 वर्षे आहे. उत्पन्न मर्यादा-कुटुंबाचे मागील आर्थिक वर्षातील सर्व मार्गांनी प्राप्त एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. विद्यापीठ प्रवेश पात्रता क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रँकीग 200 च्या आत असलेल्या परदेशी विद्यापीठात पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी अनकंडिशनल ऑफर लेटर असणे आवश्यक आहे. यापूर्वी कोणतीही राज्य किंवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. अर्धवेळ किंवा एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थी पात्र ठरणार नाहीत.
आवश्यक कागदपत्रे :
विहित नमुन्यातील अर्ज, सक्षम प्राधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला आणि आयटीआर (एवाय-2025-26) फॉर्म क्र. 16, दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर पदवीच्या गुणपत्रिका, इतर आवश्यक दाखले, परदेशी विद्यापीठाचे अनकंडीशनल ऑफर लेटर, विद्यापीठाच्या प्रोस्पेक्ट्सची प्रत, अद्यावत क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रँकींगची माहिती आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रासाठी प्रगती अहवाल आणि खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाई आणि खर्चाची व्याजासह वसुली केली जाईल. अधिक माहितीसाठी सारथीच्या विभागीय कार्यालयाशी (संपर्क क्रमांक 020-25592507) संपर्क साधावा किंवा सारथीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी, विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
******
विकसित कृषी संकल्प अभियानाचा हिंगोलीत प्रारंभ
हिंगोली (जिमाका), दि. 30 : भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व कृषि विज्ञान केंद्र तोंडापुर, जि. हिंगोली अंतर्गत विकसित कृषि संकल्प अभियान कार्यक्रम कळमनुरी तालुक्यातील भोसी, तोंडापूर आणि वारंगा या गावांमध्ये तसेच सेनगाव तालुक्यातील ताकतोडा, साबलखेडा आणि कहाकर गावामध्ये संपन्न झाला.
या अभियानाचे उद्घाटन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या हस्ते जगन्नाथ पुरी येथे झाले. त्याचे थेट प्रक्षेपण वारंगा फाटा येथील कार्यक्रमात दाखवण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातही 'विकसित कृषी संकल्प अभियाना'चा उत्साहात प्रारंभ झाला.
या विकसित कृषि संकल्प अभियान भेटीचा मुख्य उद्देश खरीप हंगामाच्या पूर्व तयारीमध्ये मदत करणे, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे आणि शासनाच्या योजनांची माहिती देणे हा आहे.
या विकसित कृषि संकल्प अभियान कार्यक्रमामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषद,नवी दिल्ली केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. तिरुग्नानवेल यांनी प्रमुख मार्गदर्शन करतांना लिंबूवर्गीय पिकांचे लागवड तंत्रज्ञान, योग्य वेळेवर खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली व शेतकऱ्यांच्या शंकेचे निरसन केले.
प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुरजित मुंडल यांनी माती नमुना कसा घ्यावा, त्याचे महत्त्व, माती परिक्षण नुसार खत व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गजानन चिगुरे यांनी पावसाळ्यात जनावराची घ्यावयाची काळजी, एकात्मिक पद्धतीने किड व रोग व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता व स्वच्छ दुध उत्पादन विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूरचे शास्त्रज्ञ डॉ. किरणकुमार कोम्मू यांनी कीड व रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले व नवीन फळबाग लागवड याविषयी जमिनीची निवड व पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले, शास्त्रज्ञ डॉ. दर्शन कदम यांनी लिंबूवर्गीय फळ पिकामध्ये बहार नियोजन कशाप्रकारे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन करून फळ पिकांना तण आणि खत व्यवस्थापन याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या अभियाना अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र अंतर्गत किसान रथ अनेक गावामध्ये जाऊन विविध तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यात येत आहे. तसेच विविध विषयाच्या घडीपत्रिका सुद्धा शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आल्या आहेत.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सनियंत्रण कृषी विज्ञान केंद्र, हिंगोलीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके आणि नोडल अधिकारी तथा गृह विज्ञान विषय विशेषज्ञ रोहिणी शिंदे यांनी केले. या विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांचे नेतृत्व राजेश भालेराव विषय विशेषज्ञ (कृषी विद्या), अनिल ओळंबे विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) आणि डॉ. अतुल मो. मुराई, विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार) यांनी केले. त्यांना अजयकुमार सुगावे विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण, साईनाथ खरात विषय विशेषज्ञ मृदा शास्त्र, डॉ. कैलास गीते कार्यक्रम सहाय्यक पशु विज्ञान यांनी सहाय्य केले.
या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील शेतकरी, महिला शेतकरी आणि ग्रामीण युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. इफकोचे प्रतिनिधी श्री. गोराड आणि आय.पी.एल.चे प्रतिनिधी यांनी देखील कृषि फवारणीसाठी ड्रोन प्रात्यक्षिकासह सहभाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांकडून अभिप्राय नोंदवण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय ठाकरे, गुलाबराव सूर्यवंशी, मारुती कदम, ओमप्रकाश गुडेवार व संतोष हाणवते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*****
आदिवासी लाभार्थ्यांनी विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 30 : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मंजूर आराखड्यातील योजनानुसार परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व आदिवासी लाभार्थ्यांना वैयक्तीक, सामूहिक योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन येत आहे.
या योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्याकडून शासनाच्या https://www.nbtribal.in या संकेतस्थळावर दि. 1 ते १६ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.
या योजनांमध्ये अंशत:, पूर्णत: बदल करण्याचे तसेच वरीलपैकी कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि.हिंगोली यांनी राखून ठेवलेला आहे.
प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांनी https://www.nbtribal.in या संकेतस्थळावरील योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयात ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन सुनिल बारसे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली यांनी केले आहे.
*****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वीज पडून मृत्यू पावलेल्या मयतांच्या वारसांना सानुग्रह अनुदाचे धनादेश वाटप
हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्ह्यातील वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या मयतांच्या वारसाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेशाद्वारे प्रत्येकी 4 लाख रुपयाचे सानुग्रह अनुदानाचे वितरण करण्यात आले.
यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील दरेगव्हाण येथील यादवराव पिराजी दांडेगावकर (वय 55 वर्षे) यांचे वारस श्रीमती कुसूमबाई यादवराव दांडेगावकर, सेनगाव तालुक्यातील सुलदली बु. येथील रुस्तुमा यशवंत शिंदे (वय 47 वर्षे) यांचे वारस श्रीमती गोदावरी रुस्तुमा शिंदे यांना तसेच पार्डी पोहकर येथील श्रीमती मुक्ता रामगीर गिरी (वय 42 वर्षे) यांचे वारस रामगीर छडानंद गिरी यांना प्रत्येकी 4 लाख रुपये सानुग्रह अनुदानाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंगोली येथील आयोजित शेतकरी व महिला मेळाव्यात वितरीत करण्यात आले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, संजय केणेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
*******
29 May, 2025
हिंगोली जिल्ह्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
• मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 271 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमीपूजन
• हिंगोलीतील वैद्यकीय महाविद्यालयास भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव
• नानाजी देशमुख कृषी समृद्धधी योजना टप्पा दोन राबवणार, हिंगोलीचा समावेश
• हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष दूर करणार
• औंढा नागनाथ आणि नरसी नामदेव स्थळाच्या विकासासाठी निधी
• गोरेगाव तालुक्याचा निर्णय एकत्रित निर्णयाच्यावेळी
हिंगोली दि.29 (जिमाका): सामर्थ्यशील भारतासोबत सामर्थ्यशील महाराष्ट्र घडवतांना हिंगोली जिल्ह्याच्या सर्व आशा आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. ते हिंगोलीतील विविध विकास कामांच्या उद्घाटन तसेच भूमीपूजन प्रसंगी बोलत होते. हिंगोली येथील वैद्यकीय महाविद्यालयास हिंगोलीचे सुपुत्र भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव देतांना हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष निश्तिपणे दूर केला जाईल, जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी आपण व्यक्तिश: महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे प्रयत्न करू, अशी निसंदिग्ध ग्वाही ही त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिंगोलीतील 271 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, संजय केणेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव तसेच औंढा नागनाथ तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, वसमत येथील हरिद्रा संशोधन केंद्रास 100 कोटी रुपयांचा निधी दिला असून येथील तंत्रज्ञान विकासासाठी निधीसह सर्वप्रकारचे सहकार्य करू.
हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव तालुका निर्मितीचा निर्णय हा राज्यातील एकत्रित स्वरुपात होणाऱ्या तालुका निर्मितीच्यावेळी घेतला जाईल तोपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सर्व व्यवस्था गोरेगावमध्ये विकसित केल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतीमध्ये गुंतवणूक वाढवणार
शेती क्षेत्रात दरवर्षी 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून शेतीत मोठे परिवर्तन करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ देत आहोत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून मराठवाडा तसेच पश्चिम विदर्भातील 5000 गावांमध्ये जागतिक बँकेच्या सहाय्याने आपण कृषी क्षेत्रात गुंतवणूक करून शेतीची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याला मॅग्नेट प्रकल्पाची जोड दिली. आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना टप्पा 2 राज्यातील 7500 गावांमध्ये राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात हिंगोलीचा समावेश आहे. मुख्यमंत्री सौर योजनेचे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.
मराठवाडा दुष्काळमुक्त करणार
राज्यात 4 नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पामुळे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात येणार असल्याचे सांगतांना मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, या आपल्या संकल्पावर आपण काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूराच्या अतिरिक्त पाण्याचा प्रश्न कालव्याच्या माध्यमातून पाणी मराठवाड्यात आणून सोडण्यासाठी जागतिक बँकेचे सहाय्य घेण्यात आले असून पुढील महिन्यात या प्रकल्पावर काम सुरु होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महिला सक्षमीकरण योजना बलशाली करणार
महिला सक्षमीकरण योजना येणाऱ्या काळात अधिक बलशाली करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे सांगतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, यांच्या सहकारी संस्था स्थापन करून त्यांना कर्ज पुरवठा केला जाईल व त्या माध्यमातून त्यांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मदत केली जाईल. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखपती दीदी योजनेंतर्गत 1 कोटी महिलांना लखपती दीदी करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यात 25 लाख महिला लखपती दीदी झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
शासकीय कार्यालये लोकाभिमूख, नागरिकांना सुकर सेवा
राज्यात 100 दिवस कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यालये लोकाभिमूख करण्यावर भर देण्यात आल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी 150 दिवसाच्या टप्पा 2 अभियानात 1250 सेवा घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले. येत्या दोन वर्षात या सेवा व्हॉटसअपवरही उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
थेट विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र देशात पहिला
आज भारत जगामध्ये जपानला मागे टाकून 4 क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे. येत्या दोन वर्षात भारत तिसऱ्या क्रमांकावर असेल असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी आज रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या अहवालात देशात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्राचा हिस्सा सर्वाधिक 40 टक्के असल्याचे म्हटले. महाराष्ट्र आता विकासात थांबणार नाही तर पुढेच जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाच किमीमध्ये वैद्यकीय सेवा – राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर
राज्यात दर पाच किलोमीटरच्या आत वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आरोग्य सुविधा उभारणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून वित्तपुरवठा करणार असल्याचे त्या म्हणाल्या. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाने महिलांसाठी विविध योजना अंमलात आणल्या असून, या योजनांच्या माध्यमातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी हिंगोली जिल्ह्याचा सर्वांगिण विकास आराखडा तयार करावा, जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा सहकारी बँकेची निर्मिती व्हावी. औंढा नागनाथ आणि नरसी नामदेव तीर्थक्षेत्रांचा भरीव निधी देऊन विकास करावा, अशा विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या.
आज एकूण 271 कोटी रु खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
उद्घाटन आणि भूमिपूजन होणाऱ्या कामाचा तपशील असा :
• नगर परिषद हद्दीतील रस्ते प्रकल्प 114 कोटी रु
• पंचायत समिति हिंगोली नवीन इमारतीचे लोकार्पण, खर्च 11 कोटी
• नामदेव महाराज मंदिर नर्सीकडे जाणाऱ्या सायन रस्त्याचे उद्घाटन 10 कोटी रुपये
भूमि पूजन कामे
• नळ योजना – 84 कोटी रु
सुमारे ५२ कोटींचे रस्ते त्याचा तपशील खालील प्रमाणे
• देऊळगावरामा वरूड गवळी, बेलवाडी रस्ता- (6 किमी)
• देवठाणा ते कापूरखेडा (4.00 किमी)
• उमरा ते तालुक्यापर्यंत सीमा रस्ता- (3.10 किमी)
• कडाटी हनवतखेडा, देऊळगाव, जे. रोड- (5.90किमी)
• माहेरखेडा ते गुगुळपिंपरी ते जिल्हा सीमा रस्ता- (5.25 किमी)
• तकतोडा ते धनगरवाडी रस्ता- (5.12 किमी)
• जामठी ते गोंदणखेडा- (3.00 किमी)
• महालासपूर फुटला ते कावडदरी रस्ता- (3.15 किमी)
• अडोल ते हनकदरी रस्ता (4.10 किमी)
******
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा आज हिंगोली जिल्हा दौरा
हिंगोली, दि. २९ (जिमाका): सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर या आज हिंगोली जिल्हा दौ-यावर येत आहेत.
श्रीमती बोर्डीकर यांचे दुपारी २:१५ वाजता परभणी येथून हिंगोलीतील संत नामदेव पोलीस परेड मैदान येथे हेलिकॉप्टरने आगमन होईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील रामलीला मैदानावर आयोजित विविध विकासकामांच्या लोकार्पण, उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमास त्या उपस्थित राहतील. त्यानंतर राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर दुपारी ४ वाजता संत नामदेव पोलीस परेड मैदान येथून हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करतील.
**
महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 29 : महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार आश्विनकुमार माने यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, सी. आर. गोळेगावकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
******
28 May, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंगोली जिल्हा दौरा
हिंगोली, दि.२९ (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवार (दि.२९) रोजी हिंगोली जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परभणी येथून हेलिकॉप्टरने दुपारी २.१५ वाजता संत नामदेव पोलीस परेड मैदान हेलिपॅड, हिंगोली येथे आगमन होईल. त्यानंतर
दुपारी २.२०वा. मोटारीने रामलीला मैदानाकडे प्रयाण,
दुपारी २.३० वाजता शेतकरी व महिला मेळावा आणि हिंगोली विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे दुपारी ३.५० वा. मोटारीने संत नामदेव पोलीस परेड मैदान हेलिपॅड येथे आगमन व त्यानंतर ३.५५ वाजता हेलिकॉप्टरने नांदेडकडे प्रयाण करतील.
***
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा
• जिल्हा वार्षिक योजनेच्या 2024-25च्या खर्चास मान्यता
• जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2025-26 अंतर्गत मंजूर नियतव्यय 311 कोटी
• 30 जानेवारीच्या बैठकीतील इतिवृत्ताच्या अनुपालनास मान्यता
हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2024-25च्या खर्चास राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज मान्यता दिली. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2025-26 साठीच्या 311 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, 30 जानेवारी 2025 च्या बैठकीतील इतिवृताच्या अनुपालनासही मान्यता देण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीला खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार तानाजीराव मुटकुळे, आमदार राजुभैय्या उर्फ चंद्रकांत नवघरे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणेच्या प्रमुखांची उपस्थिती होती.
जिल्ह्याच्या विकासात सर्वसामान्य केंद्रीत योजनांना महत्त्वाचे स्थान देण्यात येणार असून, शिक्षण, आरोग्य, वीज, पर्यटन, कृषि, सिंचन यासह विविध क्षेत्रांचा विकास करण्यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यसुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येईल. जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे बांधकाम करताना प्राथमिकता ठरवून ते टप्प्याटप्प्याने सुरु करावे. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील विकास कामे करताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचीही अंमलबजावणी करावी. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अनुदानाची रक्कम ईकेवायसी न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने पार पाडण्याचे निर्देशही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. वळवाच्या पावसामुळे जिल्ह्यातील घरकुल आणि हळद, केळी आणि भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोबतच वीज पडून झालेली जीवित व वित्तहानी झाली आहे. कृषि व महसूल विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर बळसोंड, श्री जगदंबा देवी मंदिर देवस्थान दरेगाव तसेच इतर तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांचे श्रेणीवर्धन करण्यासाठीचे प्रस्ताव व कार्यवाही करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. जिल्ह्यातील अपघातप्रवण रस्त्यांची तपासणी करून त्यांना ब्लॅकस्पॉट घोषित करण्याची कार्यवाही आरटीओंनी पूर्ण करावी. जलसंधारण विभागाने जिल्ह्यातील सर्व तलावांची पाहणी व सर्वे करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा. चिरागशहा, नागेशवाडी, गवळेवाडी, सारंगवाडी तलावांच्या दुरुस्ती, डागडुजीची कामे तात्काळ सुरु करून पावसाळ्यात होणारी जीवित किंवा वित्तहानी होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच आवश्यक तिथे वनविभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमानुसार छोटे पाझर तलाव बांधणी करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी कामे हाती घ्यावीत,असेही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आदर्श शाळा विकसित करा. तेथील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शालेय, क्रीडा साहित्य, पाठ्यपुस्तके खरेदी करा. तसेच शाळा, वाड्या तपासून घ्या. या निधीतून चांगली क्रीडांगणे तयार करून भावी खेळाडू घडवण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. डोंगरी विकास योजनेतून डोंगरी भागातील अंगणवाड्यांचे बांधकाम करण्याचे निर्देश दिले.
शाळा आणि शहरातील विविध भागात सीसीटीव्ही बसवावेत. पावसाळ्यापूर्वी ग्रामीण रस्त्याची कामे पूर्ण करावीत. आरोग्य विभागामार्फत सामान्य नागरिकांला आरोग्य सेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने सर्व पायाभूत सोयीसुविधा निर्माण कराव्यात. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल,असे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, तीर्थस्थळ, पर्यटन स्थळ यासाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी वेळेत खर्च करावा. तसेच सन 2024-25 आराखड्यातील 277 कोटींची तरतूद प्राप्त झाली होती. त्याचे सर्व विभागांना वितरण करण्यात आले व विविध कामांवर सर्व 272 कोटी खर्च करण्यात आला. सर्व संबंधित विभागांनी सन 2025-26 अंतर्गत 311 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, अनुसूचित उपयोजनेत 54 कोटी तर आदिवासी उपयोजनेत 24 कोटी 74 लाख 89 हजार नियतव्यय मंजूर आहे. या सर्व निधीसाठीचे प्रस्ताव वेळेत तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी संबंधितांना दिले.
यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी विभागनिहाय आढावा घेताना मृदा व जलसंधारण, वन विभाग, कृषि, पर्यटन, क्रीडा विभाग, जिल्हा ग्रंथालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, कौशल्य विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, महावितरण, पोलीस प्रशासन, पाणीपुरवठा विभाग यासह सर्व विभागांचा आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी तसेच पशुसंवर्धन विभागासाठी औषध खरेदी करण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच नाविन्यपूर्ण योजनांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांचाही आढावा घेतला. तसेच यावेळी जिल्हा अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेच्या खर्चाचाही आढावा घेण्यात आला.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचना व मागण्यांच्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा विकास आराखड्यानुसार कृषि, सिंचन, फळबाग लागवड, हळद लागवड, उद्योग व स्वयंरोजगार, पर्यटन यासह विविध विषयावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.
चौकट
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पडत असलेल्या वळवाच्या पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये. बोगस खते व बियाण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी व जिल्हा प्रशासनाने नियंत्रण पथकामार्फत बारकाईने लक्ष ठेवावेत. दैनंदिन पर्जन्यमानाविषयीची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवावी. पावसाळ्यात आरोग्य यंत्रणेने मुख्यालयी राहून तात्काळ आरोग्य सेवा पुरवाव्यात. महसूल विभागाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे वेळेत उपलब्ध करुन द्यावेत. शेतकऱ्यांना बँकांनी वेळेत आणि सहज व सुलभ पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी बैठकीत दिल्या.
***
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, सचिन जोशी, सी. आर. गोळेगावकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
******
27 May, 2025
शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगारांचा सर्वे करावा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• जिल्हाधिकारी श्री.गुप्ता यांनी घेतला समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 27 : शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगारांचा सर्वे करण्यासाठी प्रश्नावली तयार करुन माहिती संकलीत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, जिल्हा ऊसतोड कामगार समिती, तृतीय पंथीयाचे हक्काचे संरक्षण व कल्याण योजना समिती आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीचे समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील ऊसतोड महिलांच्या आरोग्याची तपासणी करावी, असे सांगून साखर कारखाने, ऊसतोड कामगारांची माहिती, नोंदणी, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना, ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य समस्या, गर्भवती महिला ऊसतोड कामगारांना पुरवण्यात येणाऱ्या सोईसुविधा आदी विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा दक्षता व समितीच्या बैठकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्याचार पिडितांना अर्थसहाय्य देण्यासाठी प्राप्त प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. तृतीय पंथियाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी, त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनाचा लाभ जमीन खरेदीबाबत चर्चा करण्यात आली.
*****
26 May, 2025
प्रमाणित बियाणे वितरण या बाबीसाठी शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 26 : खरीप हंगामासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अणि पोषण अभियान कडधान्य व पौष्टिक तृणधान्य तसेच राष्ट्रीय खाद्यतेल-तेलबिया अभियान राबविण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2025-26 मध्ये कार्यक्रमाची अंमलबजाणी करावयाची आहे.
त्यानुषंगाने कृषी विभागाकडून चालू खरीप हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. या बियाणे वितरण कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत तूर, मूग, उडीद या पिकांसाठी 50 टक्के व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत सोयाबीन पिकांसाठी 100 टक्के अनुदान देय आहे. तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर पोर्टलवर निवड करुन आपणास संदेश येईल.
या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*******
पीक प्रात्यक्षिक बाबीसाठी नोंदणीकृत शेतकरी गटांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 26 : खरीप हंगामासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य व पौष्टिक तृणधान्य तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया राबविण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2025-26 मध्ये कार्यक्रमाची अंमलबजाणी करावयाची आहे.
त्यानुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्थासांठी कृषी विभागाकडून चालू खरीप हंगामासाठी पिक प्रात्यक्षिके ही बाब राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व इच्छुक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इत्यांदीनी महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. पीक प्रात्यक्षिके कार्यक्रमासाठी पात्रता, निकष खालीलप्रमाणे आहेत.
शेतकरी गट हा 31 मार्च, 2024 पूर्वी नोंदणी केलेला असावा. शेतकरी गट हा आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नोती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इत्यादी शासन यंत्रणेकडे नोंदणीकृत असावा. एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल. पीक प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या गटात 25 पेक्षा जास्त शेतकरी असल्यास संबंधित गटाने एकाच गावातील 25 शेतकऱ्यांची निवड करावी. पीक प्रात्यक्षिकासाठी महाडिबीटी पोर्टलव्दारे नोंदणीकृत शेतकरी गट, कंपनी संस्थाची निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येईल. गटातील शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे.
या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्थांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावे, असे आवाहन राजेंद्र कदम. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*******
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज निकाली काढा
हिंगोली (जिमाका), दि. 26 : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. सन 2023-24 व 2024-25 या शैक्षणिक सत्रातील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज मंजुरीसाठी दि. 31 मे, 2025 पर्यंत शासनाकडून मुदत देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या आवेदनावर महाविद्यालयांनी पुढील कार्यवाही करुन ते समाज कल्याण विभागाकडे पाठविणे अपेक्षित आहे. परंतु बहुतांश महाविद्यालयांनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या अर्जावर कार्यवाही केली नसल्याची बाब समोर आली आहे. भारत सरकार शिष्यवृत्तीचे अनुसूचित जाती प्रवर्गाचे शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील 100 अर्ज व 2024-25 मधील 800 अर्ज अद्यापही महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. सातत्याने पत्रव्यवहार, व्हॉट्सअप ग्रुपवरील संदेशाद्वारे सूचना देऊनही अर्ज मंजुरीबाबत कार्यवाही करण्यात नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
महाविद्यालय स्तरावर व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असलेले शिष्यवृत्ती सर्व पात्र अर्ज महाविद्यालयांनी दि. 31 मे, 2025 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली या कार्यालयास पाठवावेत. विहित मुदतीत पात्र अर्ज सादर न केल्यास संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना जबाबदार धरुन नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची सर्व महाविद्यालयांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
*****
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध
हिंगोली (जिमाका), दि. 26 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थानाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने 27 मे ते दिनांक 30 मे 2025 व 2 जून ते दिनांक 5 जून 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी ऑनलाईन आवेदनपत्र सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्राची वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्याचे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
23 May, 2025
जिल्ह्यात 'विकसित कृषि संकल्प अभियाना'चे आयोजन
• 90 गावांमध्ये 29 मे ते 12 जूनदरम्यान राबविणार अभियान
हिंगोली (जिमाका), दि. 23 : भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर यांच्यामार्फत वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 29 मे ते दि. 12 जून या कालावधीत जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली, औंढा नागनाथ आणि सेनगाव या चार तालुक्यांतील 90 गावांमध्ये "विकसित कृषि संकल्प अभियान" राबविण्यात येणार आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश खरीप हंगामाची पूर्वतयारी, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणे आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
या अभियानात भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर येथील शास्त्रज्ञांची टीम सहभागी होणार आहे. यामध्ये डॉ. ए. तिरुग्नानवेल, डॉ. सुरजित मुंडल, डॉ. किरणकुमार कोम्मू आणि डॉ. दर्शन कदम यांचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील डॉ. आर. डी. भालेराव व डॉ. एस. एच. सारंग (सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, गोळेगाव), कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आणि कृषि विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात किसान रथ गावांमध्ये फिरणार असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना विविध नवीन तंत्रज्ञान, विविध पिकांच्या सुधारित जाती, नवीन कृषि अवजारे, माती नमुना घेण्याची योग्य पद्धत, सुधारित पीक, भाजीपाला आणि फळ लागवड तंत्रज्ञान, कुक्कुटपालन, शेळीपालन, तसेच विविध पिकांचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी माहिती दिली जाणार आहे. तसेच विविध विषयांवरील माहिती पुस्तिका (घडीपत्रिका) देखील शेतकऱ्यांना वितरित केल्या जाणार आहेत.
या "विकसित कृषि संकल्प अभियान"च्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी खासदार ॲड. शिवाजीराव माने यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी निमंत्रित असतील.
या अभियानादरम्यान ग्रामपंचायत, गाव, शाळा मुख्य रस्त्यांची स्वच्छता आणि सजावट करावी. घरासमोर आणि सार्वजनिक ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढाव्यात. गावातील प्रवेशद्वारावर आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी फुलांचे तोरण आणि पताका लावाव्यात. गावातील लोकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून संस्कृतीचे दर्शन घडवावे. स्वागत कार्यक्रमात शाळेतील मुलांचे छोटे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
शेतकरी, महिला बचत गट आणि युवकांसाठी स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. बैठकीत खरीप हंगामातील पिकांची निवड व नियोजन, बी-बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांची उपलब्धता, पाणी व्यवस्थापन व सिंचन, पीक संरक्षण व रोग व्यवस्थापन, कृषी कर्ज व शासकीय योजना, शेतीमालाची विक्री व्यवस्था यावर चर्चा करण्यात येणार आहे.
गावातील शेती पद्धती, सध्याच्या समस्या आणि गरजांसंबंधीची माहिती देण्यात येणार आहे. माहितीमध्ये गावातील एकूण शेती क्षेत्र व पिकांची माहिती, सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती, खते व बियाण्यांचा वापर, पिकांवरील रोग व किडींची समस्या आणि शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या यांचा समावेश असेल. महिला बचत गटांच्या कार्याविषयी आणि गावातील युवकांची संख्या व कृषि क्षेत्रातील त्यांची भूमिका याबद्दल माहिती देण्यात येईल.
गावनिहाय वेळापत्रक :
हे अभियान दि. 29 मेपासून प्रत्येक दिवशी दोन तालुक्यांतील प्रत्येकी तीन गावांमध्ये घेण्यात येणार आहे. दि. 29 मे, 2025 रोजी कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, तोंडापूर व भोशी, सेनगाव तालुक्यातील साबलखेडा, हाताळा व ताकतोडा येथे, दि. 30 मे रोजी कळमनुरी तालुक्यातील आडा, म्हैसगव्हाण व रुपूर आणि सेनगाव तालुक्यातील कहाकर, जामठी व केंद्रा येथे, दि. 31 मे रोजी कळमनुरी तालुक्यातील हिवरा, वरुड व जामगव्हाण तर सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी व मोप, दि. 1 जून रोजी कळमनुरी तालुक्यातील कांडली, बऊर व पवनमारी तर सेनगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा, माळसेलू व जयपूर, दि. 2 जून रोजी कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, सोडेगाव व वारंगा मसाई तर सेनगाव तालुक्यातील पुसेगाव, खुडज व तळणी येथे, दि. 3 जून रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर, काटोडा व नागेशवाडी तर सेनगाव तालुक्यातील भानखेडा, हट्टा व गणेशपूर येथे, दि. 4 जून रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदुरसना, मार्डी व उमरा तर सेनगाव तालुक्यातील सुलदली, पानकन्हेरगाव व कोळसा येथे, दि. 5 जून रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला, कोंडसी व वडद तर हिंगोली तालुक्यातील सावरखेडा, करवडी व पिंपळखुटा येथे, दि. 6 जून रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा खुर्द, रांजाळा व तपोवन तर हिंगोली तालुक्यातील दातेगाव, राहोली खुर्द व राहोली बु. येथे, दि. 7 जून रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील गवळेवाडी, सारंगवाडी व टाकळगव्हाण तर हिंगोली तालुक्यातील देवळगाव रमा, सवड व घोटा येथे, दि. 8 जून रोजी कळमनुरी तालुक्यातील डोंगरगावपुल, कामठा व घोडा तर हिंगोली तालुक्यातील आजेगाव, खरबी व इडोळी येथे, दि. 9 जून रोजी कळमनुरी तालुक्यातील चुंचा, फुटाना व चिखली तर हिंगोली तालुक्यातील बलसोंड, बासंबा व भिरडा येथे, दि. 10 जून रोजी कळमनुरी तालुक्यातील रेडगाव, दिग्रस व दांडेगाव तर हिंगोली तालुक्यातील कलगाव, माळहिवरा व खंडाळा येथे, कळमनुरी तालुक्यातील कोंढूर, दिग्रस व चिंचोर्डी तर हिंगोली तालुक्यातील चिंचाळा, आडगाव व बोंडाळा येथे, दि. 12 जून रोजी कळमनुरी तालुक्यातील धानोरा, वाई व ढोलक्याची वाडी तर हिंगोली तालुक्यातील कन्हेरगाव, फाळेगाव व कानडखेडा बु. येथे घेण्यात येणार आहे.
या अभियानास ग्रामपंचायत सरपंच व सदस्य मंडळी, शेतकरी, महिला शेतकरी, ग्रामीण तरुण, कृषि सखी, महिला बचत गट आणि उद्योजक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. पी. पी. शेळके यांनी केले आहे.
*****
खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 23 : सर्व बँकानी योग्य नियोजन करुन सन 2025-26 च्या खरीप पीक कर्जाचे जास्तीत जास्त वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक पंकज बोरकर, आरबीआयचे अधिकारी अरुण बाबू, एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक हेमराज बनसोड, नाबार्डचे अविनाश लहाने, एसबीआय आरएसीसीचे व्यवस्थापक प्रमोद ढोले, विविध बँकेचे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, सन 2024-25 या वर्षात पीक कर्जाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात बँकनिहाय पीक कर्ज वितरणाचा तपशील, पीक कर्जाचा केलेला परतावा, पीक कर्ज नूतनीकरण प्रकरणे याची तपशीलवार माहिती उपलब्ध करुन द्यावी. तसेच चालू वर्षात खरीप पीक कर्जाचे 875 कोटी 90 लाखांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 90 कोटी 92 लाखांचे वितरण झाले आहे. त्याची टक्केवारी 10.38 टक्के इतकी आहे. यासाठी गावात शिबिराचे तसेच गावभेटीचे आयोजन करुन सर्व बँकांनी चालू वर्षात जास्तीत जास्त पीक कर्जाचे वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावेत. ज्या बँका उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश दिले.
तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पशुसवंर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना, किसान क्रेडिट कार्ड, बचतगट यासह विविध योजनेच्या प्रलंबित प्रकरणाचा तात्काळ निपटारा करावा. जिल्ह्यात मागणीप्रमाणे नवीन शाखा सुरु करण्याची कार्यवाही करावी किंवा बँक ग्राहक सेवा केंद्र सुरु करुन नागरिकांना सेवा उपलब्ध करुन द्यावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.
*****
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन
• उमेदवारांनी सूचनांचे काटेकोर पालन करावे
हिंगोली (जिमाका), दि. 23 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेचे आयोजन दि. 24 मे ते 5 जून, 2025 पर्यंत प्रविष्ठ उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल, असे दि. 25 एप्रिल, 2025 च्या अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले होते.
त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 परीक्षा घेण्याचे नियोजन दि. 27 ते 30 मे, 2025 आणि दि. 2 ते 5 जून, 2025 या कालावधीत करण्यात आलेले आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच उमेदवारांना देण्यात येतील. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत वेळोवेळी दिलेल्या, प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तसेच परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावरील माहिती पुस्तिकेतील सूचनांचे उमेदवारांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा
हिंगोली (जिमाका), दि. 23 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत इयत्ता दहावी व बारावी मध्ये जिल्ह्यातील शाळेमधून प्रथम आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मुलांमुलींसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेंतर्गत 5 हजार रुपये रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट ऑनलाईन आधार संलग्न खात्यात जमा करण्यात येते.
हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेचे निकाल पत्र, शाळेचे शिफारसपत्र, दहावी, बारावीचे गुणपत्रक, जातीचा दाखला, बँक पासबूक छायांकित प्रत, आधार कार्ड आदी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, हिंगोली यांनी केले आहे.
*****
21 May, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ
हिंगोली (जिमाका), दि. 21 : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या उपस्थितीत शपथ घेण्यात आली.
यावेळी तहसीलदार आश्विनकुमार माने, नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
***
मत्स्य व्यवसायाशी निगडीत व्यक्ती व संस्थांनी एनएफडीपी पोर्टलवर नोंदणी करावी
• पात्र मच्छिमारांनी साहित्य खरेदी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 21 : प्रधानमंत्री मत्स्य किसान समृध्दी सहयोजनेंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व मच्छीमार व मत्स्य व्यवसायाशी निगडीत व्यक्तींची व संस्थांची एनएफडीपी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या आपले सेवा केंद्राशी संपर्क साधून नोंदणी करावी. तसेच एनएफडीपी पोर्टलवर www.nfdp.dof.gov.in या संकेतस्थळाला वैयक्तीक भेट देऊन स्वत:हून मच्छीमार म्हणून नोंदणी करावी.
तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गंत मच्छिमारांसाठी मोफत अपघात गटविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, हिंगोली यांना कळविण्यात यावी.
पात्र मच्छिमारांनी साहित्य खरेदी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत.
जिल्ह्यातील मच्छिमारांना मासेमारीकरिता असणारी तयार मासेमारी जाळे, बिगर यांत्रिकी नौका इत्यादी साहित्य खरेदीसाठी अनुज्ञेय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र मच्छिमारांनी आपले प्रस्ताव सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, हिंगोली येथे तात्काळ सादर करावे.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, हिंगोली दूरध्वनी क्र. 02456-224447 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, हिंगोली यांनी केले आहे.
**
20 May, 2025
जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू
हिंगोली (जिमाका), दि. 20 : मे महिन्यात हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनिल माचेवाड यांनी दिले आहेत.
दि. 28 मे,2025 रोजी सावरकर जयंती, दि. 29 मे रोजी महाराणा प्रताप जयंती तिथीप्रमाणे तसेच विविध देवी देवतांच्या वार्षिक यात्रा, उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, शंकर पटाच्या शर्यती, कब्बडी, कुस्ती, संदल आयोजित करण्यात येतात. तसेच मराठा आरक्षण व इतर आरक्षण संबंधाने घडणाऱ्या राजकीय घडामोडी, नागरिक, विविध संघटना, पक्ष यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 14 मे, 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते दि. 29 मे, 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटकद्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील, या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
******
19 May, 2025
‘‘एल्डर लाईन 14567’’ ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार
हिंगोली (जिमाका), दि. 19 : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ‘‘एल्डर लाईन 14567’’ ही सेवा देशभरात वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे. जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्यामार्फत ही सेवा महाराष्ट्रात राबवली जाते. मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन जनसेवा फाऊंडेशन गेली 37 वर्षापासून सातत्याने विविध प्रकल्पाद्वारे गरीब, आजारी, वृध्द, अपंग, निराधार, गरीब मुले-मुली आणि महिला यांची सेवा करीत आहेत. जनसेवा फाऊंडेशनला संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जा प्राप्त आहे.
महाराष्ट्रात 14567 राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन सेवेची अंमलबजावणी ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली आहे. या 14567 राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईनवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक कॉल्स आले असून 30 हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे.
या हेल्पलाईनद्वारे आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृध्दाश्रम, डे केअर सेंटर याबाबतची माहिती देण्यात येते. तसेच कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. मानसिक आजार व चिंता, ताण, राग इत्यादी व्यवस्थापनाबाबत त्यांना भावनिक आधार दिला जातो. तसेच बेघर व अत्याचारग्रस्त वृध्दांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबियांशी संवाद, पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न, पोलीस प्रशासनाशी समन्वय व समुपदेशन आदी सेवा मोफत पुरविल्या जातात.
"घरात आम्ही दोघं एकटेच, मुलगा परदेशात आहे…", "नातेवाइकांनी आमचं घर बळकावलंय…", "कुटुंबात कुणाशी बोलणंच होत नाही…" अशा असंख्य व्यथा, वेदना, तक्रारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक "एल्डर लाईन" हेल्पलाइनवर मोकळेपणाने मांडत आहेत.
त्यामुळे एल्डर लाईन 14567 ही केवळ हेल्पलाईन नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वयोवृध्दांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता येईल, यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ज्येष्ठांसाठी ही सेवा अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरुक व्हावे आणि सर्व गरजू वयोवृध्दांनी या एल्डर लाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
***
16 May, 2025
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये
हिंगोली (जिमाका), दि. 16 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजित केली आहे. त्याची ऑनलाईन आवेदनपत्र दि. 14 मेपर्यंत सादर करण्याचे कळविले होते. त्याबाबत समाजमाध्यमांवर फिरणारा संदेश वा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-2025 पुढे ढकलण्याबाबत व इतर अडचणीबाबत युट्यूब चॅनल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे व अन्य माध्यमाद्वारे अनाधिकृत बाबी प्रसिध्द होत आहेत. त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन परीक्षा परिषदेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे मे व जून, 2025 मध्ये आयोजन करण्यात येत असल्याचे दि. 21 मार्च, 2025 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुसार पात्र उमेदवारांनी या परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्व तयार करावी, असे आवाहन करण्यात आले होते. या परीक्षा नियोजित केल्याप्रमाणे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी युट्यूब चॅनल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या, अफवावर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. या व्यतिरिक्त अन्य माध्यमातून प्रसिध्द होणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांचे, उमेदवारांचे नुकसान झाल्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे कार्यालय जबाबदार असणार नाही. विद्यार्थ्यांनी, उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार कार्यवाही करावी, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
इतर परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास 21 मेपर्यंत मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 16 : सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे. या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र दि. 14 मेपर्यंत सादर करण्याबाबत कळविले होते.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-2025 या परीक्षेचे आयोजन दि. 24 मे ते 5 जून, 2025 या कालावधीत प्रस्तावित आहे. बीएड व एमएड, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थी, उमेदवारांचा परीक्षा कालावधी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी, उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025Info.aspx या लिंकद्वारे दि. 14 मेपर्यंत भरण्याबाबत सूचित केले होते. या लिंकवरील माहिती भरण्याची मुदत वाढवून आता दि. 21 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 16 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.
माहे मे, 2025 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, (दि. 19 मे) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.
समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
******
जिल्हा हिवताप कार्यालयात राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा
हिंगोली(जिमाका), दि. 16 : जनतेमध्ये डेंग्यू आजाराची जनजागृती निर्माण व्हावी, प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरिकापर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येतो.
यावर्षी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप कार्यालयात व जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडूरंग फोपसे मार्गदर्शन करताना समाजातील नागरिकांचा, लोकप्रतिनिधीचा सहभाग घेऊन डेंग्यू आजाराविषयी जनजागृती करावी तर तालुका आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी यावर्षी असलेले राज्य शासनाचे घोषवाक्य "तपासा, स्वच्छ करा आणि झाकुन ठेवा: डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा" याविषयी सविस्तर माहिती दिली.
जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांनी राष्ट्रीय कीटकजन्य आजारांबाबत मार्गदर्शन करून डेंग्यू या आजाराची लक्षणे, उपचार व घ्यावयाची काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी सी. जी. रणवीर, सांख्यिकीय अधिकारी अजय कदम, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मारोतराव पोले, मनिषा वडकुते, एस.एस.खोकले, उमेश डाफने, संजय बोरबळे, आनंद माखणे, मारुती गायकवाड, मल्हारी चोफाडे, योगेश डेंग, प्रदीप आंधळे, सी. टी. गायकवाड, पांडुरंग देवकते, सुधाकर मुटकुळे, हकीम शहा आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सन 2024 मध्ये रक्तजल नमुने 255 घेण्यात आले, त्यापैकी 3 रूग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आले. सन 2024 या वर्षात जिल्ह्यातील 38 गावामध्ये धूर फवारणी करण्यात आली. डेंग्यू या आजाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष अबेट राऊंड मोहीम घेण्यात आली. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांच्यामार्फत गृह भेटी देऊन कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करून डास आळी आढळून आलेल्या कंटेनरमध्ये अबेट टाकण्यात आले तर काही कंटेनर रिकामी करण्यात आली. आरोग्य शिक्षण दिले गेले. यामुळे डासांच्या सायकलला आळा बसण्यास मदत झाली आहे. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले
डेंग्यू आजाराची लक्षणे :
एकदम जोराचा ताप चढणे, अंग दुखणे, स्नायू दुखणे, डोक्याचा पुढचा भाग जास्त प्रमाणात दुखणे, डोके दुखणे, डोळ्याच्या मागील भागात वेदना होणे, मळमळ होणे व उलट्या होणे, त्वचेवर व्रण येणे.
डेंग्यूचा प्रसार :
डेंग्यूची विषाणू संक्रमित एडीस प्रजातीच्या डासाच्या मातीच्या चाव्याद्वारे लोकांमध्ये पसरतात. जगातील जवळपास निम्मी लोकसंख्या सुमारे चार अब्ज लोक डेंग्यूचा धोका असलेल्या भागात राहतात. धोका असलेल्या भागात डेंग्यू हे आजाराचे प्रमुख कारण आहे. एडीस इजिप्ती संक्रमित मादी चावल्यास डेंग्यू हा आजार होतो.
प्रतिबंधात्मक उपाय योजना :
घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. घराच्या अवती-भवती अथवा टेरेसवर पडलेल्या रिकाम्या कुंड्या प्लास्टिकच्या वस्तू टायर यासारख्या वस्तूमध्ये पाणी साचून त्यात डासाची उत्पत्ती निर्माण होते. त्यामुळे अशी ठिकाणी नष्ट करावीत. खिडक्यांना जाळा बसवाव्यात. शौचालयाच्या वरच्या पाईपास जाळी बसवावी. अंगभर कपडे वापरावी, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. आठवड्यातून एक दिवस म्हणून कोरडा दिवस पाळावा. वापरण्यात येणारे संपूर्ण पाण्यासाठी कोरडी करावी, जेणकरून डासांनी घातलेली अंडी नष्ट होतील.
*******
14 May, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 14 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
********
कृषि निविष्ठा दुकानांची मे अखेरीपर्यंत तपासणी पूर्ण करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा बैठक
• रेशीम लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा
• मुबलक कृषि निविष्ठा उपलब्ध असल्याची खात्री करा
हिंगोली (जिमाका), दि. 14: यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतक-यांना बियाणे व खताची खरेदी करताना कंपन्यामार्फत कृषी केंद्र संचालकांकडून लिंकींग करण्यात येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व कृषी निविष्ठा दुकानदारांची मे अखेरपर्यंत तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आढावा बैठकीत संबंधित अधिका-यांना दिले.
बैठकीला आमदार तानाजी मुटकुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम 2025 ची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील खरीप हंगामातील तयारी, बियाणे व खतांची उपलब्धता, कृषी योजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मातीचा पोत सुधारणे आणि शेतीचे आरोग्य वाढविणे यासाठी मृदा परीक्षणासोबतच टप्प्याटप्प्याने रासायनिक खतांवरील शेतीचे अवलंबित्व कमी करताना सेंद्रीय खतांचा वापर वाढविण्यावर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज येथे जिल्हा यंत्रणा प्रमुखांना दिले.
पीक विमा व अतिवृष्टी अनुदानाच्या प्रलंबित लाभार्थ्यांची ई-केवायसी तात्काळ करुन त्यांना अनुदानाचे वितरण करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या विहिरींना मागेल त्याला सौर पंप योजनेतून तात्काळ वीज जोडणी द्यावी. यासाठी योग्य कंपनीची निवड करावी. गारपिटीमध्ये नुकसान झालेल्या सोलारचे सर्वेक्षण करुन ते तात्काळ दुरुस्त करावेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, एसआरएलएम आदी योजनेच्या प्रलंबित प्रस्तावाची बँकनिहाय माहिती तयार करुन द्यावी व ती प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, अशा सूचना केल्या.
रासायनिक खतांच्या वापरामुळे होणाऱ्या पर्यावरणीय व आरोग्यविषयक दुष्परिणामांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांचा अधिकाधिक वापर करावा यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. खतांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. या खतांचा वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देताना फळबाग लागवड योजना, हळद लागवड, रेशीम शेती क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष भर द्यावा. त्यासाठी कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. त्यासाठी विविध कार्यशाळा, प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यास त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात तुती लागवडीसही चालना मिळावी, शेतकऱ्यांनी त्यामध्ये रस दाखवावा, यासाठी एक हजार एकरावर रेशीमशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढविण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.
या वर्षी जिल्ह्यासाठी 73 हजार 293 क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज आहे. रासायनिक खतांचा पुरवठाही पुरेशा प्रमाणात राहणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. जिल्ह्यासाठी कापूस बियाण्यांच्या 1 लाख 52 हजार पाकीटांची आवश्यकता आहे.
बैठकीत हळद प्रशिक्षण व संशोधन केंद्र, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान, प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना, वैयक्तिक शेततळे, फळबाग योजना, डिजिटल शेती शाळा, माती परीक्षण, महाडीबीटीवरील अर्जवाढ, हिरवळीच्या खतांचा वापर, पिक स्पर्धा, बायोचार योजना, हुमनी कीड नियंत्रण, बीबीएफ पद्धत, शेतकऱ्यांचे व्हॉट्सअॅप गट तयार करून त्यांच्यामध्ये जनजागृती आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.
यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्ह्यात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. परंतु सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मका पिकाकडे वळला पाहिजे. यामुळे जनावरांना वैरण सुध्दा उपलब्ध होते. यासाठी शेतकऱ्यांना मका पिकांकडे वळविण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून हरभरा पिकाचा पिक विमा मिळण्यासाठी सर्व मंडळे समाविष्ट करुन प्रस्ताव पाठवावा. तसेच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बियाणे व खताची लिंकींग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच राखीव साठाही मागणीनुसार तयार ठेवावा, अशा सूचना केल्या.
यावेळी कृषि विज्ञान केंद्रामार्फत दि. 29 मे ते 12 जून, 2025 या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये कृषी सुवर्ध समृध्दी रथाद्वारे जिल्ह्यातील 90 गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेश भालेराव यांनी दिली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर खरीप हंगामपूर्व आढावा सादर केला. शेवटी उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
******
पावसाळ्यात आपत्तीचा सामना करताना योग्य समन्वय ठेवा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व तयारी आढावा
• तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करा
हिंगोली (जिमाका), दि. 14 : आगामी पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा प्रभावी सामना करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवावा,असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. कोणतीही परवानगी न घेता अधिकारी मुख्यालय सोडू नयेत,असेही त्यांनी स्पष्ट केले.
मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. यामध्ये जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी आपले कामकाज सुसूत्रपणे पार पाडावे, मदत व पुनर्वसन कार्य तत्काळ सुरू करावे आणि नागरिकांमध्ये जनजागृती वाढवावी, असे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेसिंग चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, नगर परिषद व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी जलद प्रतिसाद पथक, आपत्कालीन संपर्क यंत्रणा, वैद्यकीय सुविधा, पूरप्रवण क्षेत्रातील उपाययोजना आणि जनजागृती मोहिमांवर भर देण्याचे निर्देश दिले. संभाव्य पूरस्थिती, वीज गळती, आरोग्यविषयक आपत्ती आणि सेवा कार्यक्षमतेबाबतही चर्चा झाली. प्रत्येक विभागाला विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यातील पैनगंगा, पुर्णा, कयाधू आणि इतर नद्यांमुळे काही गावांना पूराचा धोका असल्याने संबंधित यंत्रणांनी दक्ष रहावे. 70 पूरप्रवण गावांमध्ये आवश्यक साहित्याची तपासणी करून ठेवावी. पूर परिस्थितीत पुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी बचाव पथके तयार करुन त्यांना प्रशिक्षण द्यावे. 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवून कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करावेत. आरोग्य पथकांची नियुक्ती, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार, मुबलक औषधे, रक्तसाठा, ब्लिचिंग पावडरची साठवणूक यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
शहरातील नाल्यांची स्वच्छता, धोकादायक इमारतींची तपासणी, स्थलांतराची पर्यायी व्यवस्था, सुरक्षित स्थळांची निवड याबाबतही निर्देश देण्यात आले. महावितरण, शिक्षण, पशुसंवर्धन व कृषी विभागांनीही आवश्यक उपाययोजना राबवाव्यात.
पाटबंधारे विभागाने धरणनिहाय समन्वय अधिकारी नेमण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी केल्या. तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी ठेवून पूर्वतयारी पूर्ण करावी. वाहन व्यवस्था सुरळीत ठेवावी. नागरिकांनी दामिनी ॲप डाऊनलोड करून विजेपासून बचाव करावा. नगरपालिका प्रशासनाने नाल्यांची सफाई युद्धपातळीवर करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
******
13 May, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला जिल्हा आरोग्य विभागाचा आढावा
• प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा, औषधसाठा व लसींच्या पुरवठ्याची घेतली माहिती
हिंगोली, (जिमाका) दि.१३: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा बैठकीत घेतला.
प्रामुख्याने संजीवनी अभियानांतर्गत कर्करोग संशयित महिलांची 30 मे पर्यंत पूर्ण तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र व पाच उपकेंद्र एनकॉस NQAS करणे,
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. दीपक मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड डॉ. काळे, डॉ. कल्पना सुनतकुरे, डॉ अनुराधा दहिफळे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी व सर्व तालुका आरोग्य अधिकारी या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा, औषधसाठा, लस पुरवठा आणि विविध उपचार सेवा यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.
बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच एनएचएमचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गुप्ता यांनी प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक यांची संख्या, त्यांची उपस्थिती आणि उपचार सेवा तपासण्याचे निर्देश दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात सुधारणा करण्याचे निर्देश
जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत अद्ययावत सुविधांचा अभाव आहे. यावर चर्चा करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले, “ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी 30 प्रसूती झाल्या पाहिजेत अशा सूचना देण्यात आल्या, प्राथमिक आरोग्यंद्राच्या ठिकाणी EDD ट्रेकिंग झाली पाहिजे बोर्ड लावण्यात यावा, खाजगी दवाखान्यात मध्ये आलेल्या गरोदर मातेच्या आरसीएच नंबर शासकीय संस्थेमधून रजिस्ट्रेशन करण्यात यावा, डिलिव्हरीचे रेफरल होता कामा नये रेफरल एडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या, आरसीएस पोर्टल सह सर्व पोर्टल अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या, चाचणी यंत्रणा आणि औषधांचा नियमित साठा असणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.
औषधसाठा आणि लसींच्या पुरवठ्याचा आढावा
बैठकीत TB क्षय रोग, कुष्ठरोग, एनसीडी, माता बाल संगोपन कार्यक्रम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, मलेरिया, डेंग्यू, आणि कुपोषणविरोधी औषधांचा साठा तसेच लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक लसी – जसे की बीसीजी, पोलिओ, DPT, MR – यांचा पुरवठा नियमित आहे का याची माहिती घेण्यात आली. काही तालुक्यांमध्ये औषधसाठ्याचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आले असून लवकरात लवकर तेथे पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले.
एनएचएमअंतर्गत योजनांची अंमलबजावणी तपासली
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मातृमृत्यू दर, बालमृत्यू दर कमी करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती घेण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी गर्भवती महिलांसाठी ‘जननी शिशु सुरक्षा योजना’ व ‘महिला आरोग्य शिबिरां’च्या माध्यमातून प्रभावी सेवा देण्याचा आग्रह धरला.
आरोग्य जनजागृतीसाठी सूचना
शहरी व ग्रामीण भागात रोगप्रसार रोखण्यासाठी जनजागृती मोहिमा, पथनाट्य, माहितीपत्रके व आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, असेही त्यांना सांगितले.
*****
जिल्हा प्रशासन राबविणार '5 स्टार हिंगोलीकर' उपक्रम
हिंगोली (जिमाका), दि. १३ : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासन '5 स्टार हिंगोलीकर' हा उपक्रम संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामधील सर्व नगर परिषद व नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत नगर परिषद, नगर पंचायत यांच्या हद्दीतील सर्व घरे, शासकीय कार्यालये, शैक्षणिक आस्थापना, खाजगी आस्थापना इत्यादी ठिकाणी पाच निकषांच्या आधारे स्टार रेटिंग केले जाणार आहे.
यामध्ये पावसाचे जलपुनर्भरण, घराभोवती किमान पाच झाडे, घरामध्येच कचऱ्याचे विलगीकरण, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील रूफ टॉप सोलर पॅनल, नगर परिषदेमार्फत आकारण्यात येणाऱ्या करांचा विहित वेळेमध्ये भरणा करणे या पाच निकषांच्या आधारे पुढील दोन महिन्यांमध्ये सर्व नगर परिषदा, नगरपंचायतीमार्फत घरांचे सर्वेक्षण करून त्यांना स्टार रेटिंग दिले जाणार आहे. तसेच यापुढे होणाऱ्या नवीन बांधकामांमध्ये पाचही निकषांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात संबंधित नागरिकांना प्रोत्साहित केले जाणार आहे.
वरील संकल्पना राबविण्यासाठी जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे.
***
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी आज शेवटचा दिवस
• नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पोहोच पावतीच्या आधारे आवेदनपत्र भरता येणार
हिंगोली (जिमाका), दि. 13 : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे. या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याचा उद्या, दि. 14 मे, 2025 हा शेवटचा दिवस आहे. तसेच ऑनलाईन आवेदन शुल्क भरण्याची मुदत दि. 14 मे, रोजी 23.59 मि. पर्यंत असणार आहे.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-2025 परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमीलिअर प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना पोहोच पावतीच्या आधारे आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. पोहोच पावतीवरील दिनांक हा आवेदनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच दि. 14 मेपर्यंत असेल तर सदर पोहोच पावती ग्राह्य धरण्यात येईल. याच पोहोच पावतीनुसार मिळालेले हे प्रमाणपत्र, या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
***
राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय डेंग्यू दिन 16 मे रोजी साजरा केला जातो. यानिमित्त डेंग्यूविषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना सक्रियपणे सहभागी करून घेण्यात येते. विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यत माहिती पोहचवणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. डेंग्यू दिवस जिल्हा अंतर्गत सर्वत्र साजरा करण्यात येतो.
सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळगस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त परिस्थतीमुळे पाण्याचा तुटवडा असल्याने लोकांची पाणी साठवण्याची वृत्ती आढळून येते. त्या अनुषंगाने अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पती होते. या डासाची उत्पती कमी करणे, नियंत्रणात ठेवणे यासाठी जनतेस आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. आजाराचे नियंत्रण करण्यासाठी या मोहिमेमध्ये जनतेचा सहभाग आवश्यक आहे. केंद्र शासनाने डेंग्यू या विषयावर 'इंडिया फाईट्स डेंग्यू' हे मोबाईल व अँड्रॉईड ॲप्लीकेशन तयार केले आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन ते डाऊनलोड करुन घ्यावे. यामध्ये डेंग्यूविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.
हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन यशस्वी होण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोकसहभाग घेऊन गावपातळीवरही राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, तालुकास्तर सभा, सर्व स्तरावर रॅलीचे आयोजन, ग्रामसभेचे आयोजन, बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन, हस्त पत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्वेक्षण, सर्व स्तरावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन, दिंडीचे आयोजन, डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम, सर्व स्तरावरील फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण, एक दिवस कोरडा दिवस पाळणे याविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
डेंग्यू,चिकुनगुनिया बाबतची लक्षणे : एडीस एजिप्टाय डासाच्या संक्रमणात्मक चाव्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर डेग्यूंची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक हा ताप अधिक तीव्र स्वरुपाचा असून त्यामुळे मृत्यू ओढावू शकतो. लहान मुलांमध्ये शक्यतो सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसामध्ये अधिक तीव्रपणे तापासोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो.
उपचार : सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपचार होतो.
उपाय योजना : डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी 8 दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालून अंड्याचे रुपांतर डासात होते. त्यानुषंगाने कोणतेही साठवलेले पाणी 8 दिवसापेक्षा जास्त ठेवू नये, ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
डासोत्पती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, व्यक्तीगत सुरक्षेअंतर्गत मच्छरदाण्यांचा वापर, डासांच्या चाव्यापासून रक्षणासाठी विविध उपाय करण्यासाठी कोरडा दिवस पाळून किटकजन्य आजार डेंग्यू, चिकुनगुनिया आजारावर नियंत्रण ठेवण्यास जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे.
***
11 May, 2025
राष्ट्रीय लोकन्यायालयात 4 कोटी 97 लाखांची 105 प्रकरणे निकाली
• लोकन्यायालयामुळे मिळाला तात्काळ न्याय, पक्षकारास दिला 57 लाखाचा मावेजा
हिंगोली (जिमाका), दि. 11 : येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयात दि.10 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 1155 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी व विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व 4 हजार 659 प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित प्रकरणे 96 व वाद दाखलपूर्व प्रकरणे 9 असे एकूण 105 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडी आधारे प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल 4 कोटी 97 लाख 44 हजार 450 रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ट असलेले चार पॅनल तयार करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी.एस.अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायाधीश-2 श्रीमती एस.ए.माने-गाडेकर, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. जी. महाळणकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आय. जे. ठाकरे, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी. आर. पमनानी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले.
ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे सदस्य, सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
लोकन्यायालयामुळे मिळाला तात्काळ न्याय
पक्षकारास दिला 57 लाखाचा मावेजा
या लोकअदालतीमध्ये पल्लवी निलेश कुकडे (29 वर्षे) हिचे पती निलेश कुकडे हे अपघातामध्ये 3 मे, 2021 रोजी मयत झाल्याने विद्यमान न्यायालय, हिंगोली येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी जून, 2021 मध्ये दावा दाखल केला होता.
हे प्रकरण लोकन्यायालयामध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणामध्ये दोन्ही पक्षकारामध्ये तडजोड होऊन अर्जदार मयताची पत्नी पल्लवी निलेश कुकडे (29 वर्षे), मुलगी कु. निधी निलेश कुकडे (5 वर्षे), मयताची आई वनमाला सुधाकर कुकडे यांना तडजोडीअंती 57 लाख रुपये रक्कम ठरविण्यात आली. या प्रकरणामध्ये लोकअदालतीच्या दिवशीच तात्काळ ओरिएंटल इंशुरन्स कंपनीतर्फे पक्षकारांना सदरील रकमेचा आदेश जिल्हा न्यायाधीश-02 एस. एन. माने-गाडकेर यांनी दिला.
पुढील लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी आपली प्रकरणे ठेवून जलद न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी केले आहे.
******
10 May, 2025
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका),दि. 10 : आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करुन अधिक सतर्क, समन्वय व तत्परतेने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, प्र.पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलाश शेळके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आदींची उपस्थिती होती.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ले सुरु केले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, जिल्ह्यात पोलीस विभाग, उपविभागीय अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व महावितरण विभागांनी समन्वयाने मॉकड्रिलची तयारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या.
तसेच आरोग्य विभागानेही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी पुरेसा औषधी साठा तयार ठेवावा. तसेच शासकीय रुग्णालयाबरोबरच जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयाची माहिती तयार ठेवावी. पुरेसा रक्त पुरवठा उपलब्ध करुन ठेवावा. तसेच सीपीरची, जनरेटरची व्यवस्था करावी. जिल्हा परिषदेने आपल्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याचेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.
प्रत्येक गावात नोडल अधिकारी नेमावेत. त्यांच्यासोबत योग्य समन्वय ठेवावा. सर्व कार्यान्वीन यंत्रणेचे संपर्क क्रमांक अद्यायावत करावेत. आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी शाळा, मंगल कार्यालयाची माहिती तयार ठेवावी. पुरेसा धान्य पुरवठा व इंधन पुरवठा तयार ठेवावा. जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करावी. जिल्ह्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द कराव्यात. जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करावी. चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करावी. नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचविण्यासाठी ग्रामस्तरावर नोडल अधिकाऱी नेमून त्यांच्यामार्फत जनजागृती करावी. केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्यावी.
तसेच मान्सूनमध्ये उद्भवणाऱ्या विविध आपत्तींचा आपणांस सामना करावा लागणार आहे. हे लक्षात ठेवूनच सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करावे आणि सतर्क राहावे. यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करुन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा. या आराखड्यात जिल्ह्यातील पूरप्रवण गावांचा सर्व नियोजनासह समावेश करावा. पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास विहित नमुन्यात सादर करावी. तसेच तालुकानिहाय तयार करण्यात आलेले शोध व बचाव पथक अद्ययावत करुन नेहमी सतर्क ठेवावे. तसेच पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील पूरप्रवण गावाला भेटी देऊन भविष्यात पूर येणार नाही, यासाठी उपाययोजनांची माहिती घेऊन तशा उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे, सर्व तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुढे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.
******
Subscribe to:
Posts (Atom)