23 May, 2025
जिल्ह्यात 'विकसित कृषि संकल्प अभियाना'चे आयोजन
• 90 गावांमध्ये 29 मे ते 12 जूनदरम्यान राबविणार अभियान
हिंगोली (जिमाका), दि. 23 : भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर यांच्यामार्फत वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 29 मे ते दि. 12 जून या कालावधीत जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली, औंढा नागनाथ आणि सेनगाव या चार तालुक्यांतील 90 गावांमध्ये "विकसित कृषि संकल्प अभियान" राबविण्यात येणार आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश खरीप हंगामाची पूर्वतयारी, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणे आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
या अभियानात भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर येथील शास्त्रज्ञांची टीम सहभागी होणार आहे. यामध्ये डॉ. ए. तिरुग्नानवेल, डॉ. सुरजित मुंडल, डॉ. किरणकुमार कोम्मू आणि डॉ. दर्शन कदम यांचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील डॉ. आर. डी. भालेराव व डॉ. एस. एच. सारंग (सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, गोळेगाव), कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आणि कृषि विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात किसान रथ गावांमध्ये फिरणार असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना विविध नवीन तंत्रज्ञान, विविध पिकांच्या सुधारित जाती, नवीन कृषि अवजारे, माती नमुना घेण्याची योग्य पद्धत, सुधारित पीक, भाजीपाला आणि फळ लागवड तंत्रज्ञान, कुक्कुटपालन, शेळीपालन, तसेच विविध पिकांचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी माहिती दिली जाणार आहे. तसेच विविध विषयांवरील माहिती पुस्तिका (घडीपत्रिका) देखील शेतकऱ्यांना वितरित केल्या जाणार आहेत.
या "विकसित कृषि संकल्प अभियान"च्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी खासदार ॲड. शिवाजीराव माने यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी निमंत्रित असतील.
या अभियानादरम्यान ग्रामपंचायत, गाव, शाळा मुख्य रस्त्यांची स्वच्छता आणि सजावट करावी. घरासमोर आणि सार्वजनिक ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढाव्यात. गावातील प्रवेशद्वारावर आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी फुलांचे तोरण आणि पताका लावाव्यात. गावातील लोकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून संस्कृतीचे दर्शन घडवावे. स्वागत कार्यक्रमात शाळेतील मुलांचे छोटे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
शेतकरी, महिला बचत गट आणि युवकांसाठी स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. बैठकीत खरीप हंगामातील पिकांची निवड व नियोजन, बी-बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांची उपलब्धता, पाणी व्यवस्थापन व सिंचन, पीक संरक्षण व रोग व्यवस्थापन, कृषी कर्ज व शासकीय योजना, शेतीमालाची विक्री व्यवस्था यावर चर्चा करण्यात येणार आहे.
गावातील शेती पद्धती, सध्याच्या समस्या आणि गरजांसंबंधीची माहिती देण्यात येणार आहे. माहितीमध्ये गावातील एकूण शेती क्षेत्र व पिकांची माहिती, सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती, खते व बियाण्यांचा वापर, पिकांवरील रोग व किडींची समस्या आणि शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या यांचा समावेश असेल. महिला बचत गटांच्या कार्याविषयी आणि गावातील युवकांची संख्या व कृषि क्षेत्रातील त्यांची भूमिका याबद्दल माहिती देण्यात येईल.
गावनिहाय वेळापत्रक :
हे अभियान दि. 29 मेपासून प्रत्येक दिवशी दोन तालुक्यांतील प्रत्येकी तीन गावांमध्ये घेण्यात येणार आहे. दि. 29 मे, 2025 रोजी कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, तोंडापूर व भोशी, सेनगाव तालुक्यातील साबलखेडा, हाताळा व ताकतोडा येथे, दि. 30 मे रोजी कळमनुरी तालुक्यातील आडा, म्हैसगव्हाण व रुपूर आणि सेनगाव तालुक्यातील कहाकर, जामठी व केंद्रा येथे, दि. 31 मे रोजी कळमनुरी तालुक्यातील हिवरा, वरुड व जामगव्हाण तर सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी व मोप, दि. 1 जून रोजी कळमनुरी तालुक्यातील कांडली, बऊर व पवनमारी तर सेनगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा, माळसेलू व जयपूर, दि. 2 जून रोजी कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, सोडेगाव व वारंगा मसाई तर सेनगाव तालुक्यातील पुसेगाव, खुडज व तळणी येथे, दि. 3 जून रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर, काटोडा व नागेशवाडी तर सेनगाव तालुक्यातील भानखेडा, हट्टा व गणेशपूर येथे, दि. 4 जून रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदुरसना, मार्डी व उमरा तर सेनगाव तालुक्यातील सुलदली, पानकन्हेरगाव व कोळसा येथे, दि. 5 जून रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला, कोंडसी व वडद तर हिंगोली तालुक्यातील सावरखेडा, करवडी व पिंपळखुटा येथे, दि. 6 जून रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा खुर्द, रांजाळा व तपोवन तर हिंगोली तालुक्यातील दातेगाव, राहोली खुर्द व राहोली बु. येथे, दि. 7 जून रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील गवळेवाडी, सारंगवाडी व टाकळगव्हाण तर हिंगोली तालुक्यातील देवळगाव रमा, सवड व घोटा येथे, दि. 8 जून रोजी कळमनुरी तालुक्यातील डोंगरगावपुल, कामठा व घोडा तर हिंगोली तालुक्यातील आजेगाव, खरबी व इडोळी येथे, दि. 9 जून रोजी कळमनुरी तालुक्यातील चुंचा, फुटाना व चिखली तर हिंगोली तालुक्यातील बलसोंड, बासंबा व भिरडा येथे, दि. 10 जून रोजी कळमनुरी तालुक्यातील रेडगाव, दिग्रस व दांडेगाव तर हिंगोली तालुक्यातील कलगाव, माळहिवरा व खंडाळा येथे, कळमनुरी तालुक्यातील कोंढूर, दिग्रस व चिंचोर्डी तर हिंगोली तालुक्यातील चिंचाळा, आडगाव व बोंडाळा येथे, दि. 12 जून रोजी कळमनुरी तालुक्यातील धानोरा, वाई व ढोलक्याची वाडी तर हिंगोली तालुक्यातील कन्हेरगाव, फाळेगाव व कानडखेडा बु. येथे घेण्यात येणार आहे.
या अभियानास ग्रामपंचायत सरपंच व सदस्य मंडळी, शेतकरी, महिला शेतकरी, ग्रामीण तरुण, कृषि सखी, महिला बचत गट आणि उद्योजक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. पी. पी. शेळके यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment