09 May, 2025

इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने होणार

हिंगोली (जिमाका), दि. 09 : मागील काही वर्षापासून राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अमरावती या महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 11 वीचे प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने चालू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 25 फेब्रुवारी व दि. 6 मे, 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांतील शहरी व ग्रामीण भागातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11 वीचे प्रवेश शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने चालू करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यस्तरावरून ते जिल्हास्तरापर्यंत याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळांकडून विहित नमुन्यात माहिती घेण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक, विद्यार्थी व शाळांना माहिती होणे गरजेचे आहे. उच्च माध्यमिक विद्यालयांनी करावयाची कार्यवाही : केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पध्दतीनुसार सर्वप्रथम सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांना त्यांच्या संस्थेची ऑनलाईन नोंदणी शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार संकेतस्थळावर करावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांचे उच्च माध्यमिक विद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. नोंदणी करण्यापूर्वी सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांनी काही अभिलेख्यांची पूर्वतयारी शाळास्तरावर करुन ठेवणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या महाविद्यालयात इंटरनेटची सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना सुलभतेने प्रवेश घेता यावेत तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करण्यासाठी पूर्णवेळ यंत्रणा कार्यान्वित करावी. माहिती पुस्तिका प्रत्येक विद्यार्थ्यांना पाहता येईल यासाठी शाळास्तरावरच नियोजन करावे. यामध्ये माध्यमिक शाळांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. शक्यतोवर माध्यमिक शाळांमधूनच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश भरण्यासाठी सोय उपलब्ध करुन देण्यात यावी. उच्च माध्यमिक विद्यालयांनी शासन मान्यता आदेश, मान्यता प्राप्त विषयांचे मंडळ मान्यता आदेश, शाखा अतिरिक्त तुकडी आदेश, अल्पसंख्यांक प्रमाणपत्र, बँक डिटेल्स इत्यादी बाबींची पूर्वीच तयारी करुन ठेवावी. शैक्षणिक शुल्काबाबतची आवश्यक कागदपत्रे मान्य असणे आवश्यक आहे. प्राचार्यांनी त्यांच्या कॉलेजची माहिती वेबपोर्टलवर भरताना योग्य ती दक्षता घ्यावी. कोणतीही माहिती अंदाजित अथवा चूकीची भरू नये. यामुळे भविष्यात उदभवणाऱ्या परिणामास संबंधित प्राचार्य, व्यवस्थापन जबाबदार राहील. यावर्षी इयत्ता 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पध्दतीनेच होणार आहेत. त्यामुळे यावर्षी ऑनलाईन प्रक्रियेशिवाय इतर कोणत्याही मार्गाने दिलेले प्रवेश हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच ऑफलाईन झालेले प्रवेश हे इयत्ता 12 वी परीक्षेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे शिक्षणाधिकारी (मा.), जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******

No comments: