29 March, 2022

 

उष्माघातात नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी व स्वत:चा बचाव करण्यासाठी  खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

काय करावे :-

·         उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.

·         तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.

·         हलकी, पातळ व सचिद्र सूती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, हॅट, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा.

·         प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.

·         जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.

·         शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा.

·         अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

·         गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.

·         घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात  यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.

·         कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.

·         पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.

 

काय करु नये  :-

·         लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

·         बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. तसेच दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे.

·         उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. (तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.)

·         शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय इ. यांचा वापर टाळावा.

·         शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने (Proteins)असलेले अन्न टाळावे.

*****

No comments: