24 February, 2021

संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोव्ह‍िड-१९ बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या (ग्रामीण/शहरी) हद्दीतील सर्व प्रकारच्या हालचालीस (व्यक्ती/वाहन) व सर्व आस्थापना, दुकाने, खानावळ इत्यादीसाठी दि. 24 फेब्रुवारी, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत रात्री 7.00 ते सकाळी 7.00 या कालावधीत संचारबंदी लागू केली असून खालीलप्रमाणे आदेश देण्यात आलेले आहेत.

1. या कालावधीत दूध विक्री केंद्र, दूध विक्रेते यांनारात्री ७.०० ते रात्री ९.०० पर्यंत चालू ठेवण्यास मुभा राहील.

2. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, बँका या कामकाजासाठी चालू राहतील. यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना ये-जा करण्यासाठी मुभा राहील. परंतु सोबत ओळखपत्र ठेवणे बंधनकारक राहील.

3. या कालावधीत फक्त खाजगी रुग्णालयास संलग्न असलेली औषधी दुकाने रुग्णालयाच्या वेळेनुसार तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यकतेनुसार अशा औषधी दुकानांना चालू ठेवण्यास मुभा राहील.

4. या कालावधीत पत्रकार व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी यांना सदर कालावधीत वार्तांकन व कार्यालयीन कामकाजासाठी ये-जा करण्यास मुभा राहील.परंतु सोबत ओळखपत्र ठेवणे बंधनकारक राहील.

5. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाची कामे व दुरुस्ती करण्यास, आरोग्य/शासकीय विभागाशी संबंधित बांधकामे, महावितरण, महापारेषणआणि इतर विद्युत विषयक विभागाकडील देखभाल व दुरुस्तीची कामे, दूरसंचारशी संलग्न सेवा, पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि स्वच्छता विषयक कामे करण्यास मुभा राहील. यासाठी संबंधित विभागाकडील आदेश, ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील.

6. या कालावधीत जिल्ह्यातील पेट्रोल पंप केवळ शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व कृषी सेवा संबंधित वाहने यांना इंधन पुरवठा करण्यासाठी चालू राहतील.

या कालावधीत यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या कोणत्याही खाजगी आस्थापना, दुकाने, खानावळ, हॉटेल यांना परवानगी राहणार नाही.

वरीलप्रमाणे संचाराची मुभा दिलेल्या व्यक्तींना सामाजिक अंतर राखून तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. यानुसार संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा, परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजारामध्ये, गल्ली मध्ये, गावामध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्याच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

वरीलप्रमाणे आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी,सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी नगर परिषद-नगर पंचायत, ग्रामसेवक, तलाठी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल, असेही आदेशात नमूद केले आहे.

*****

 

 

No comments: