30 June, 2021

 आस्थापना, दुकाने उघडण्याच्या वेळेबाबत सुधारित आदेश जारी

 

खानावळ, रेस्टॉरंट शनिवार, रविवार बंद परंतु पार्सल, घरपोच सुविधा देण्यास परवानगी 

 

हिंगोली (जिमाका) , दि. 30 :  शासन निर्देशानुसार हिंगोली जिल्हा लेवल तीनमध्ये येत असल्याने व जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दि. 30 जून, 2021 रोजी पासून पुढील आदेश लागू होईपर्यंत आस्थापना व दुकाने उघडण्यासाठीच्या वेळेबाबतचे सुधारित आदेश जारी केले आहेत.

1. हिंगोली जिल्हा लेवल तीनमध्ये येत असल्याने जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. यामुळे संचारबंदी व जमावबंदी काळात वैध कारणाशिवाय आणि ज्या बाबींना , सेवा आणि क्रियांना परवानगी देण्यात आली आहे, अशांना केवळ वेळेचे पालन करुन या काळात सूट देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत जिल्ह्यात जमावबंदी असेल आणि सायंकाळी 5.00 ते सकाळी 5.00 पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी असेल.

2. अत्यावश्यक सेवा बाबी : जिल्ह्यातील किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई विक्रेते, सर्व प्रकारचे अन्न विक्रेते (चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी आणि मासे), पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगाम पूर्व साहित्य (वैयक्तिक / संस्थेसाठी) विक्रेते यांची दुकाने, आस्थापना दि. 30 जून, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत दैनंदिन सकाळी 9.00 ते दुपारी 4.00  या वेळेप्रमाणे चालू करण्याची परवानगी राहील. या कालावधीत फक्त दुध विक्री केंद्र, विक्रेते यांना दैनंदिन सकाळी  6.00 ते  9.00 आणि सायंकाळी 6.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल. ई-कॉमर्स, कुरीअर सेवा या दैनंदिन चालू राहतील.

जिल्ह्यातील APMC बाजार, कृषी संबंधित सर्व दुकाने (जसे की खते, बी, बियाणे,कृषी साहित्य, अवजारे, गॅरेज, टायर विक्री, दुरुस्ती दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा इत्यादी दुकाने, आस्थापना दैनंदिन सकाळी 9.00 ते दुपारी 4.00 पर्यंत चालू राहतील.

3. जिल्ह्यातील इतर आस्थापना, दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळून) : जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने, आस्थापना यांना दि. 30 जून, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत दैनंदिन सकाळी 9.00 ते दुपारी 4.00 या वेळेत चालू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. परंतु ही दुकाने, आस्थापना ह्या शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद असतील. जिल्ह्यातील खानावळ, रेस्टॉरंट कोरोनाचे पालन करुन ग्राहकांच्या 50 टक्के उपस्थितीच्या मर्यादेत पुढील आदेशापर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी  9.00 ते दुपारी 4.00 या वेळेत उघडण्यास आणि ग्राहकांना खानावळ , रेस्टॉरंटमध्ये सेवा देण्यास परवानगी राहील. जिल्ह्यातील खानावळ, रेस्टॉरंट हे शनिवार आणि रविवार बंद असतील. परंतु पार्सल, घरपोच सुविधा देण्यास परवानगी असेल.

4. कार्यालयीन उपस्थिती : जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालये दुपारी 4.00 पर्यंत चालू राहतील. अपवादात्मक जसे की, खाजगी बँका, विमा कंपनी, औषधी संबंधित कंपनी, सूक्ष्म वित्त संस्था यांची कार्यालये नियमित सुरु राहतील. जिल्ह्यातील शासकीय कार्यालये क्षमतेच्या 50 टक्क्यानुसार सुरु राहतील. परंतु अत्यावश्यक सेवा, कोरोना कामकाज, मान्सून संबंधित यंत्रणा, दुय्यम निबंधक, एमएसआरटीसी हे कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.

5. लग्न समारंभ : या कालावधीत आयोजित करण्यात आलेले लग्न सोहळे केवळ नोंदणी पद्धतीने (Court Marriage) पार पाडावेत. जर पारंपारिक पध्दतीने लग्न आयोजित करावयाचे असल्यास वर-वधू मिळून केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात यावे. यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही . परंतु लग्न समारंभ आयोजित करत असल्याची पूर्वकल्पना संबंधित तहसील कार्यालयास देणे बंधनकारक आहे.

6. अत्यंविधी / अत्यंसंस्कारासाठी  केवळ 20 नागरिकांना परवानगी असेल.

7. खाजगी प्रवासी वाहतूक : जिल्ह्याबाहेर खाजगी वाहनाद्वारे, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करण्यासाठी  परवानगी असेल. परंतु राज्यातील लेवल-5 या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यात थांबण्यासाठी किंवा त्या जिल्ह्यातून प्रवास करण्यासाठी ई-पास घेवून प्रवास करने बंधनकारक असेल.

8. सार्वजनिक प्रवासी वाहतूक : MSRTC मालकीची वाहने शासन निर्देशाप्रमाणे पूर्णक्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी असेल. परंतु प्रवासी उभे राहून प्रवास करण्यास परवानगी असणार नाही. तसेच सर्व प्रवाशांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.

9. माल वाहतूक : माल वाहतूक करणाऱ्या वाहनासोबत केवळ 03  व्यक्तींना (चालक, क्लिनर, हेल्पर) परवानगी असेल.

10. बँका : जिल्ह्यातील सर्व बँका शासकीय कामकाजासाठी, व्यापाऱ्यांच्या व्यवहारासाठी, शेतकऱ्यांची पिक कर्जाची कामे, सर्व सामान्य नागरिकांसाठी इत्यादी कामकाजसाठी बँकेच्या नियमित वेळापत्रकानुसार सुरु ठेवण्यास परवानगी असेल.

11. उद्योग : जिल्ह्यातील सर्व प्रकारचे उद्योग सुरु ठेवण्यास शासन निर्देशानुसार कोरोना नियमांचे पालन करुन परवानगी असेल.

12. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने येथे फिरणे, सायकलींग, सर्व क्रीडा प्रकारास (outdoor) परवानगी असेल. या क्रीडा प्रकारास सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 आणि सायंकाळी 06.00 ते रात्री 09.00 या वेळेत परवानगी असेल .

13. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या बांधकामास परवानगी असेल. शक्यतो बांधकाम मजुरांना साईटवर राहण्याची व्यवस्था असावी.

14. जिल्ह्यातील जिम, व्यायामशाळा, स्पा, केशकर्तनालय आणि ब्युटी पार्लर यांना केवळ 50 टक्के ग्राहकांच्या क्षमतेने दुकाने उघडण्यास परवानगी असेल. परंतु दुकानात एसी (AC)  उपकरण लावण्यास परवानगी नसेल.

15. जिल्ह्यातील लॉन्स, मंगल कार्यालये यांना केवळ 50 नागरिकांच्या क्षमतेने लग्न आयोजित करण्यासाठी परवानगी असेल.

16. जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सभा, बैठका इत्यादी कार्यक्रमांना हॉलच्या 50 टक्के क्षमतेच्या नगरिकांच्या उपस्थितीत दुपारी 4.00 पर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी असेल.

17. जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे प्रशिक्षण, बैठका, एसबीआय आरईएसटीआय प्रशिक्षण इत्यादींना त्यांचे कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करुन आयोजित करण्यास परवानगी असेल.

18. जिल्ह्यातील सिनेमा हॉल, मल्टीप्लेक्स हे पुढील आदेशापर्यंत बंद असतील.

19. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. (धार्मिक स्थळाशी संबंधित 02 व्यक्तींसाठी दैनंदिन विधीसाठी परवानगी असेल) तसेच धार्मिक जत्रा, यात्रा, उरुस, मिरवणूक इत्यादींना पुढील आदेशापर्यंत बंदी असेल.

20. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस (खाजगी शिकवणी वर्ग) बंद असतील. केवळ ऑनलाईन शिकवणी वर्गासाठी परवानगी असेल.

21. जिल्ह्यात आंदोलने, धरणे, उपोषणे, मोर्चा यांना पूर्णपणे बंदी असेल.

22. या आदेशानुसार ज्या आस्थापना, दुकाने, कार्यक्रम यांना परवानगी देण्यात आली आहे केवळ अशांनाच सद्यस्थितीत परवानगी राहील. तसेच या आदेशात ज्या आस्थापना, दुकाने, कार्यक्रम यांचा उल्लेख करण्यात आला नाही अशांना पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात बंदी असेल.

हे आदेश हिंगोली जिल्ह्यात दि. 30 जून, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत  लागू राहील. या आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी तसेच संबंधितांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल.

या आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असे आदेश दिले आहेत.

****

No comments: