12 July, 2021

 प्रशिक्षणातून कर्मचाऱ्यांना मिळणार समाज कल्याणचे धडे !

प्रशासकीय सुधारणांसाठी समाज कल्याण  विभागाचा प्रयत्न

 

हिंगोली, (जिमाका) दि. 11 : राज्याच्या समाज कल्याण विभागाने  कर्मचाऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेतले असून त्यातून कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येत आहेत . विभागांमध्ये प्रशासकीय गतिमानता व सुधारणा करण्यासाठी विविध संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी राज्य शासनाच्या यशदा व बार्टीच्या माध्यमातून प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पुढाकार घेतला असून कोविडच्या परिस्थितीमुळे हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने होणार असून लवकरच प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.

स्पर्धेच्या तंत्रज्ञानाच्या युगात कर्मचारी अधिकारी यांनीदेखील काळानुरुप आपल्या कामकाजामध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच त्याच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याची बाब डॉ. प्रशांत नारनवरे यांनी लक्षात घेत त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत नुकतेच  विविध संवर्गातील निलंबित असलेले कर्मचारी यांच्या सेवा प्रस्थापित केले आहेत. यापूर्वी देखील 11 कर्मचाऱ्यांच्या सेवा आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या निर्णयाने पुनर्स्थापित करण्यात आलेले आहेत. तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुला-मुलींच्या निवासी शाळेतील 21 कर्मचाऱ्यांचा देखील नियमित वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. आयुक्तालयाने कर्मचाऱ्यांच्या हिताच्या  घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचारी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.

समाज कल्याण विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी समाज कल्याण विभागाने कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य विकास, झिरो पेंडन्सी, विविध संवर्गाचे प्रशिक्षण, यासारखे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच गेल्या अनेक वर्षापासून निलंबित असलेल्या सर्व  सेवा पुनर्स्थापित केलेल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी  त्यांना समाज कल्याण विभागामार्फत  प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कळविले आहे.

 

*****

No comments: