17 September, 2017

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरीता सहकार्य आवश्यक
                                                                                                  -- पालकमंत्री दिलीप कांबळे
            हिंगोली, दि.17: मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या  संपुर्ण आयुष्याची आहुती देत मराठवाड्याला निजामांच्या जोखडातून मुक्त केले. त्याची जाणीव ठेऊनच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्हा पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
            मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शिवराणीताई नरवाडे, खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड  यांची उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होता. निजामांच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी हा मुक्तीसंग्राम लढा स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासह इतर थोर नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला. या संग्रामात हिंगोली जिल्ह्यातील बहिर्जी शिंदे वापटीकर, चंद्रकांत पाटील गोरेगावकर, दीपाजी पाटील दातीकर, बापुराव शिंदे वापटीकर, भीमराव ऊर्फ बाबासाहेब शेषराव नायक सवनेकर, वासुदेवराव बसोले, बाबुलाल माणिकचंद राठौर यांच्यासह अन्य स्वातंत्र सेनानी महत्वपूर्ण योगदान दिले असल्याचे ते म्हणाले.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे हे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिल्याने अखेर दि. 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखंडातून मराठवाडा मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्रामाकरीता अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल फार मोठे असल्याचे ही श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
            तसेच जिल्ह्यातील 10 हुतात्मा स्मारकांच्या दूरुस्ती व नुतणीकरणांसाठी राज्य शासनाने 108 लाख रुपये मंजूर केले असून लवकरच या स्मारकांच्या दूरुस्ती व नुतणीकरणांचे कामे पूर्ण होणार आहे.
            यापुर्वी श्री. कांबळे यांनी देवडा नगर येथील उद्यानातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना मानवंदना देवून शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहन केले. यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी यांची भेट घेऊन मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
            यावेळी प्र.निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी,     उपजिल्हाधिकारी निवडणूक गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार गजानन शिंदे, मुख्याधिकारी रामदास पाटील, कार्यकारी अभियंता सुरेश देशपांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, अधिकारी-कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.
*****



No comments: