14 May, 2021

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 मे ते 01 जून या कालावधीसाठी ब्रेक दि चेन अंतर्गत सुधारित आदेश जारी

 

हिंगोली (जिमाका) , दि. 14 :  जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने          जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दि. 15 मे, 2021 रोजी सकाळी 7.00 पासून ते दि. 01 जून, 2021 रोजी सकाळी 7.00 पर्यंत फक्त खालील सेवेच्या बाबतीत ब्रेक दि चेन अंतर्गत सुधारित आदेश जारी केले आहेत.

1. अत्यावश्यक सेवा बाबी : हिंगोली जिल्ह्यातील किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई विक्रेते, सर्व प्रकारचे अन्न विक्रेते (चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी आणि मासे), पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगाम पूर्व साहित्य (वैयक्तिक / संस्थेसाठी) विक्रेते, यांची दुकाने, आस्थापना दि. 16 मे, 2021 रोजी पासून एक दिवस आड म्हणजे दि. 16 मे, 18 मे, 20 मे, 22 मे, 24 मे, 26 मे, 28 मे, 30 मे, 2021 या दिवशी सकाळी 7.00 ते 11.00 या वेळेत चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तसेच फक्त दुध विक्री केंद्र, विक्रेते यांना या कालावधीत दैनंदिन सकाळी  7.00 ते 10.00 वाजता व सायंकाळी 6.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल. ई-कॉमर्स, कुरीअर सेवा या दैनंदिन चालू राहतील.

जिल्ह्यातील APMC बाजार, कृषी संबंधित सर्व दुकाने (जसे की खते, बी, बियाणे,कृषी साहित्य, अवजारे, गॅरेज, टायर विक्री, दुरुस्ती दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा इत्यादी दुकाने, आस्थापना दैनंदिन सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत चालू राहतील.

तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त जिल्ह्यातील उर्वरित दुकाने, आस्थापना यांना दि. 16 मे, 18 मे, 20 मे, 22 मे, 24 मे, 26 मे, 28 मे आणि 30 मे, 2021 या कालावधीत सकाळी 7.00 ते 11.00 या कालावधीत केवळ घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील. यासाठी संबंधित व्यापारी, दुकानदार यांनी घरपोच सेवा पुरवण्यासाठी तहसीलदार यांच्यामार्फत पास उपलब्ध करुन घ्यावेत.

जिल्ह्यातील खानावळ, रेस्टॉरंट यांना केवळ घरपोच सुविधा देण्यासाठी दि. 15 मे, 2021 ते दि. 01 जून, 2021 या कालावधीत सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत परवानगी राहील.

2. कार्यालयीन उपस्थिती :

अ) सर्व शासकीय कार्यालयातील (केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था) उपस्थिती 15 टक्के राहील. परंतु फक्त कोव्हिड-19 च्या संबंधित अत्यावश्यक सेवेची कार्यालये वगळून राहील.

आ) ज्या शासकीय कार्यालयांना 15 टक्क्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवणे आवश्यक आहे. त्या कार्यालय प्रमुखांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

इ) शासन आदेश दि. 13 एप्रिल, 2021 मधील मुद्दा क्र. 5 मध्ये नमूद कार्यालयातील उपस्थिती एकूण कर्मचाऱ्याच्या 15 टक्के किंवा 5 कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तेवढे कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतील.

ई) शासन आदेश दि. 13 एप्रिल, 2021 मधील मुद्दा क्र. 2 मध्ये नमूद अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालयीन कामासाठी उपस्थिती कमीत कमी 15 टक्के असावी. परंतु कोणत्याही परीस्थितीत 50 टक्क्याच्या वर नसावी. तसेच अत्यावश्यक सेवे संबंधित प्रत्यक्षात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमीत कमी ठेवावी परंतु शंभर टक्केपर्यंत आवश्यकतेनुसार ठेवता येईल.

3. लग्न समारंभ :

या कालावधीत आयोजित करण्यात आलेले लग्न सोहळे केवळ नोंदणी पद्धतीने (Court Marriage) पार पडता येईल. इतर अन्य कोणत्याही ठिकाणी लग्न सोहळा पार पाडता येणार नाही.  

4. खाजगी प्रवासी वाहतूक :

अ) खाजगी प्रवासी वाहतूक फक्त निकडीचे किंवा अत्यावश्यक सेवेसाठी किंवा वैध कारणासाठी वाहन चालक व वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या टक्याच्या मर्यादेपर्यंत E-Pass द्वारे प्रवास करता येईल. अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारणासाठी किंवा न टाळण्यासारख्या कार्यक्रमासाठी जसे अंत्यविधी किंवा कुटुंबातील गंभीर आजारी व्यक्तीसाठी E-Pass द्वारे परवानगी घेऊन प्रवास करता येईल. जर यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास दहा हजार रुपये दंड लावण्यात येईल.   

आ) खाजगी प्रवासी बसेसना (Travels) वाहतूक करण्यास या कालावधीत पूर्णतः बंदी राहील.

5. सार्वजनिक प्रवासी वाहतूक :

अ) राज्य शासकीय MSRTC किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीची वाहने यांची कार्यालये केवळ शासन नियमाप्रमाणे कार्यरत राहतील.

आ) हिंगोली जिल्ह्यातील आगारातून सुटणाऱ्या सर्व बसेस या कालावधीमध्ये बंद राहतील. तसेच  बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसच्या व्यवस्थापनासाठी बस स्थानक कार्यरत राहतील. परंतु बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस शासकीय बस स्थानकाशिवाय इतर कुठेही थांबणार नाहीत.

6. माल वाहतूक :

या कालावधीत माल वाहतूक करणाऱ्या वाहनात केवळ दोन व्यक्तींना (चालक, क्लिनर, हेल्पर) परवानगी असेल. माल वाहतूक करणारे अशी वाहने बाहेरच्या राज्यातून येत असतील तर त्या वाहनातील चालक व हेल्पर यांच्या कडे 48 तास अदोगर RTPCR तपासणी करण्यात आलेले Negative प्रमाणपत्र असणे बंधनकारक असेल. हे प्रमाणपत्र सात दिवसासाठी वैध असेल.

7. बँका :

जिल्ह्यातील सर्व बँका या कालावधीत त्यांच्या नियमित वेळा पत्रकानुसार कार्यालयीन कामकाजासाठी सुरु राहतील. तसेच या कालावधीत बँका दैनंदिन शासकीय कामकाजासाठी व व्यापाऱ्यांच्या व्यवहारासाठी सुरु ठेवता येतील.

नागरिकांसाठी बँका दि. 16 मे, 18 मे, 20 मे, 22 मे, 24 मे, 26 मे, 28 मे आणि 30 मे, 2021 या कालावधीत सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत चालू राहतील.

तसेच दि. 17 मे, 19 मे, 21 मे, 23 मे, 25 मे, 27 मे, 29 मे आणि 31 मे, 2021 या कालावधीत सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून शेतकऱ्यांच्या पिक कर्जाच्या अनुषंगाने असणाऱ्या कामांसाठी बँका सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 या कालावधीत चालू राहतील. तसेच बँकेतील BC/CSPs ला पूर्ण वेळ काम करण्याची परवानगी असेल.

8. उद्योग :

जिल्ह्यातील जे नोंदणीकृत उद्योग आहेत त्यांना त्यांचे उद्योग सुरु ठेवण्यासाठी त्यांच्या कर्मचारी, कामगारांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांचे कडून ओळखपत्र घेणे बंधनकारक राहील.

महाराष्ट्र शासनामार्फत दि. 18 एप्रिल,2021  व दि. 01 मे, 2021 रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार मूळ संवेदनशील असलेल्या राज्य व संबंधित ठिकाणावरुन येणाऱ्या नागरिकांसाठी निश्चित करण्यात आलेले निर्बंध हे सद्य परिस्थितीत भारतातील कोणत्याही राज्यातून हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना लागू राहतील.

इतर राज्यातून हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करु इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 48 तास अगोदर RTPCR चाचणी Negative असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल. तसेच ज्यांच्याकडे RTPCR Negative प्रमाण पत्र नसेल अशांना संस्थात्मक विलगीकारणात ठेवण्यात येईल आणि त्यांची RTPCR तपासणी करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल.

9. दुय्यम निबंधक कार्यालये :

या कालावधीत जिह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 हिंगोली व सर्व दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये हे दस्तनोंदणी व इतर अनुषंगिक व्यवहार करण्यासाठी नागरिकांसाठी दि. 16 मे, 18 मे, 20 मे, 22 मे, 24 मे, 26 मे, 28 मे आणि 30 मे, 2021 या कालावधीत सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत चालू राहतील. इतर वेळेत सदर कार्यालये त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी चालू राहतील.

हे आदेश हिंगोली जिल्ह्यात दिनांक 15 मे, 2021 रोजी सकाळी  7.00 ते दिनांक 01 जून, 2021 चे सकाळी 7.00 वाजेपर्यत लागू राहील. या आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी तसेच संबंधितांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल. तसेच मुभा देण्यात आलेले आस्थापना व दुकाने हे कोरोना नियमांचे पालन करत आहेत किंवा कसे याबाबत संबंधित अधिकारी यांनी वेळोवेळी भेट देऊन तपासणी करावी.

या आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असे आदेश दिले आहेत.

**** 

No comments: