14 May, 2021

राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्याचे आवाहन

 


 

हिंगोली, (जिमाका) दि.14 : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय डेंग्यू दिन दि. 16 मे, 2021 रोजी राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येत आहे.  या विषयी  जनतेमध्ये जागृती निर्माण  होऊन  प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने  प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यंत  माहिती  पोहोचविण्याचा  प्रयत्न करणे हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. तसेच या वर्षीचे ‘प्रिवेन्शन ऑफ डेंग्यू  स्टार्टस् फॉर्म होम’ हे घोषवाक्य आहे.

डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस  एजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही  पाणी आठ दिवसांपेक्षा  जास्त  साठवून ठेवल्यास त्यामध्ये  डास अंडी घालून अंड्याचे  रुपांतर डासात होते.  त्याअनुषंगाने  कोणतेही साठवलेले पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नये ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सध्या उन्हाळा सुरु आहे, राज्यात दुष्काळग्रस्त  परिस्थितीमुळे बऱ्याच  जिल्ह्यांमध्ये  पाण्याचा तुटवडा  असल्याने पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात न झाल्याने लोकाची पाणी  साठवण्याची प्रवृत्ती आढळून येते. त्या अनुषंगाने अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डास उत्पत्ती होते. या डासाची उत्पत्ती कमी करणे , नियंत्रणात  ठेवणे यासाठी जनतेस आरोग्य  शिक्षण देणे आवश्यक आहे. लोक सहभागाशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही .

केंद्र शासनाने डेंग्यू विषयावर  मोबाईल ॲप्लीकेशन तयार केलेले आहे. त्याचप्रमाणे अँड्राईड मोबाइलवर  प्ले स्टोअर मध्ये जाऊन इंडिया फाईट्स डेंग्यू हे ॲप शोधावे व मोबाईलवर  ते डाऊनलोड करुन घ्यावे. यामध्ये डेंग्यू विषयी सर्व माहिती उपलब्ध  आहे. या ॲपचा  प्रचार आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या  माध्यमातून सर्व जनतेत होईल असे पाहावे.

यामध्ये कोविड-19 सोबत गृह भेटीद्वारे  जलद  ताप  रुग्ण सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटप, कंटेनर सर्वेक्षण, सर्व स्तरावर स्वच्छता मोहिमेचे  आयोजन, तसेच डेंग्यू, चिकुनगुनिया बाबतचे लक्षणे, उपचार उपाय योजना, शासकीय योजनांची माहिती, शासकीय योजना बरोबर जनतेच्या  सहकार्याची आवश्यकता, डासोत्पत्ती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, व्यक्तीगत सुरक्षेअंतर्गत मच्छरदाण्यांचा वापर, डासांच्या  चाव्यापासून  रक्षणासाठी विविध उपाय इत्यादी, कोरडा दिवस पाळून किटकजन्य आजार डेंग्यू,  चिकुनगुनिया आजारांवर नियंत्रण  ठेवण्यासाठी डासोत्पत्ती स्थानात  गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम व एक दिवस कोरडा पाळणे याविषयी  जनजागृती करण्यात येत आहे.

जिल्हाअंतर्गत राष्ट्रीय डेंग्यू दिन यशस्वी होण्यासाठी सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी व कर्मचारी , आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई यांनी रार्ष्टीय डेंग्यू दिन साजरा करावा. असे जाहीर आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.

00000

No comments: