24 May, 2021

जिल्ह्यात सर्वत्र कलम 37 (1) (3) लागू

 

             हिंगोली (जिमाका), दि. 24 :  जिल्ह्यात दि. 26 मे, 2021 रोजी बौध्दपोर्णिमा आहे. कोरोना (कोविड-19) या विषाणूचा सध्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, संसर्ग होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त चालू आहे.

तसेच नागरिकांच्या वतीने, विविध संधटना, पक्ष यांच्यातर्फे त्यांच्या मागणी संदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच विविध प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) लागू करण्यात आला आहे. हा आदेश 20 मे ते 3 जून, 2021 रोजी 24.00 वाजेपर्यंत लागू असेल, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कळवले आहे.

या आदेशानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्याव्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुक बाळगता येणार नाही. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगता येणार नाही. दगड, क्षेपणिक उपकरणे किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवता येणार नाही किंवा जवळ बाळगता येणार नाही. आवेषी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नीतीमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे, निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगण्यास मनाई असेल. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना दुखावतील असे असभ्य वर्तन करता येणार नाही. पाच किंवा अधिक व्यक्तींना रस्त्यावर जमता येणार नाही. मात्र शासकीय कामावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी , विवाह अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, परवानगी दिलेले मिरवणूक कार्यक्रमास हे आदेश लागू होणार नाहीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. कार्यक्रम मिरवणुकीस परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधिक्षक अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना राहतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*****

No comments: