24 August, 2021

 

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करु

                                       - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर



 

        हिंगोली, दि. 24 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासात शासनाची प्रतिमा तयार करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने समन्वयाने व सहकार्य करत आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी  केले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डि.पी.सी. सभागृहात आयोजित स्वागत व निरोप कार्यक्रमात श्री. पापळकर बोलत होते. यावेळी मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सौ. जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांची उपस्थिती होती.    

            हिंगोली जिल्ह्याची विकासाकडे यशस्वी  वाटचाल सुरु आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यात स्त्रोत कमी आणि आव्हाने अधिक आहेत. यासाठी सर्व विभागानी एकमेकांशी समन्वय ठेवत व सहकार्य करत जिल्ह्याच्या विकास कामासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी राबविलेले उपक्रम पुढे चालू ठेवून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा असाच नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगून मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यात काही नवीन उपक्रम सुरु करुन जिल्ह्याची परंपरा अशीच आपणही पुढे चालू ठेवू, असेही श्री. पापळकर यांनी यावेळी म्हणाले.

            हिंगोलीतील सुमारे पावनेतीन वर्षाच्या कार्यकाळात कोविड, नैसर्गिक आपत्ती यासारखे अनेक आव्हाने  सामोरे होती. परंतु आपल्या सहकार्याने व समन्वयाने चर्चा करत प्रत्येक आव्हान स्वीकारुन यशस्वीपणे कामे केली. जिल्ह्यातील रुग्णालये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हेंटीलेटर्ससह इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देणे, रामलीला मैदानाचे सुशोभिकरण, अपंग पुनर्वसन केंद्र स्थापन करणे, जिल्हा वार्षिक योजनेचा शंभर टक्के निधी खर्च करणे, कोरोनाच्या परिस्थितीतही महसूलचे 110 टक्के उद्दिष्ट गाठणे, तसेच कोरोना महामारीचा सामना ही सर्व कामे येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच सहजपणे करता आली. हिंगोलीची यंत्रणा सक्षम असल्यामुळे येथे काम करण्याची संधी आहे, असे सांगून हिंगोली जिल्ह्यातील कार्यकाळ माझ्या जीवनातीत अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यावेळी केले .

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर पालिका प्रशासन अधिकारी रामदास पाटील यांनी केले. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

            यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी, पत्रकार, स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख, विविध संघटनाचे प्रमुख यांनी पुष्प गुच्छ देत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे स्वागत आणि मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी  यांना निरोप दिला. सुरुवातीला शंतनू पोले यांच्या चमूने गीत सादर करुन गीताच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

****

No comments: