23 October, 2023

 

इसापूर धरणातून पाणी मागणीचे अर्ज 31 ऑक्टोबर पूर्वी सादर करावेत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 :  प्रतिवर्षी उर्ध्व पेनगंगा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झाली नसल्याने आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून दि. 15 ऑक्टोबर, 2023 रोजीच्या इसापूर धरणातील 809.38 दलघमी (83.85) इतक्या जिवंत पाणीसाठ्यावर आधारित उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेवून रब्बी हंगामात चार पाणी पाळी देण्याचे नियोजन आहे.

प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील धारकांना व इसापूर धरण जलाशय, अधिसूचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवासी व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांनी रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी तसेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/कालव्यावरील उपसा, नदी नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास मागणी अर्ज नमुना नं. 7, 7 अ मध्ये भरुन दि. 31 ऑक्टोबर, 2023 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत.

सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहित नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात‍ घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणी पाळी दि. 5 नोव्हेंबर, 2023 रोजी सुरु करण्याचे अपेक्षित नियोजन आहे.

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणी पाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. रब्बी हंगाम सन 2023-24 मध्ये चार आवर्तनामध्ये पाणी पाळी देण्यात येणार आहे. या पाणी पाळीचा प्रस्तावित कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

पहिल्या आवर्तनामध्ये दि. 5 नाव्हेंबर ते दि. 25 नोव्हेंबर, 2023 या 20 दिवसाच्या कालावधीसाठी पाणी पाळी देण्यात येणार आहे. दुसऱ्या आवर्तनामध्ये दि. 5 डिसेंबर ते दि. 25 डिसेंबर, 2023 या 20 दिवसाच्या कालावधीसाठी पाणी पाळी देण्यात येणार आहे. तिसऱ्या अवर्तनामध्ये दि. 5 जानेवारी ते दि. 25 जानेवारी, 2024 या 20 दिवसाच्या कालावधीसाठी पाणी पाळी देण्यात येणार आहे. चौथ्या अवर्तनामध्ये दि. 5 फेब्रुवारी ते दि. 25 फेब्रुवारी, 2024 या 20 दिवसाच्या कालावधीसाठी पाणी पाळी देण्यात येणार आहे.

पाऊस व आकस्मिक कारणामुळे पाणी पाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होऊ शकतो. प्रकल्प क्षेत्रातील सर्व जनता, लाभधारकांनी पाणी अर्ज विहित कालावधीत करुन जलसंपदा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1, नांदेड यांनी केले आहे.

 

*******

No comments: