05 October, 2023

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या लाभासाठी

अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 05  :  बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बालविकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, एक पालक, निराधार, बेघर, आर्थिकदृष्टया दुर्बल, दुर्धर आजाराने ग्रस्त पाल्यांची बालके, दुर्धर आजार असलेली बालके, कैद्यांची बालके, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची बालके, तीव्र मतीमंद बालके, एचआयव्ही ग्रस्त किंवा कॅन्सरग्रस्त बालके, 40 टक्के पेक्षा अधिक अपंगत्व असलेली बालके, अंध दिव्यांग बालके, भिक्षा मागणारी बालके, पोक्सो अधिनियमांतर्गत बळी पडलेली बालके, तीव्र कुपोषित बालके, सॅमबालके व इतर आपत्ती अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविण्यात येत आहे.

एका कुटुंबातील दोन बालकांना या योजनेचा लाभ घेता येतो. अर्ज केल्यानंतर मा.बाल कल्याण समितीच्या आदेशाने जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत या बालकाची सामाजिक तपासणी अहवाल तयार करुन तो अहवाल मा. बाल कल्याण समितीला सादर करण्यात येतो. सर्वांगीण परिस्थितीचा विचार करुन लाभार्थ्यास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही महिला व बाल विकास विभागामार्फत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी विनाशुल्क राबविली जाते. या योजनेसाठी महिला व बाल विकास विभागाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन संबंधित गावातील अंगणवाडी सेविका किंवा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय येथे संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) यांच्याकडे दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: