29 November, 2023

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व बार्टीच्या संयुक्त विद्यमाने

मातंग व तत्सम जातीतील समाज बांधवांना योजनांची माहिती देण्यासाठी मेळावा उत्साहात संपन्न

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवासाठी विविध योजना राबविण्यात येतात. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी  नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील मातंग व तत्सम जातीतील समाज बांधवासाठी दि. 24 नोव्हेंबर, 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, ग्यानमाता शाळेसमोर, नांदेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला .

मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल रा. म्हस्के, प्रादेशिक व्यवस्थापक आर. जी. दरबस्तेवार उपस्थित होते.

प्रस्ताविकात नांदेड येथील महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रपती पुरष्कार प्राप्त शिक्षक डॉ. शिवा कांबळे, प्रा.अमरजित आईलवाड, सामाजिक कार्यकर्ते लालबाजी घाटे, प्रकाश मुराळकर, स्थायी समिती सदस्य नामदेव कांबळे, वसमत येथील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते रविकिरण वाघमारे तसेच अण्णाभाऊ साठे पुरष्कार प्राप्त हरीबाई कांबळे, रमेश गायकवाड यांनी मार्गदर्शनपर मनोगत करताना महामंडळातोल योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काही सुचना/विनती करण्यात आली.  तसेच मनोगतामध्ये प्रामुख्याने जामीनदारांची अट शिथिल करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. तसेच महामंडळाचे लाभार्थी यशस्वी उद्योजक रमेश गायकवाड यांची त्यांच्या यशाबद्दल व महामंडळाच्या योजनेबद्दल मनोगत व्यक्त केले.

महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल रा. म्हस्के यांनी आपल्या भाषणामध्ये महामंडळाच्या सुरु असलेल्या योजना, प्रस्तावित योजना, नव्याने सुरु करावयाच्या योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच या सर्व योजना मातंग समाज व तत्सम जातीतील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या प्रचार व प्रसिध्दी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून महामंडळमार्फत पूर्वी राबविण्यात येत असलेलया साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेमध्ये बदल करुन देण्यात येणान्या प्रोत्साहनपर रक्कमेत देखील मोठया प्रमाणात वाढ करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच एनएसएफडीसी योजना व त्यासाठी आवश्यक असलेली खंडहमी मिळण्यासाठी व सर्व सुरु असलेल्या योजना व प्रस्तावित योजना प्रभावीपणे सुरु राहण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असल्याबाबत माहिती दिली. तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे यांनी महामंडळाचा पदभार स्वीकारल्यापासून केलेल्या कामाजाचा आढावा सादर केला, तसेच लाभार्थीनी योजनांचा लाभ घेण्यासाठी व्यवसाय निवड करताना, नवीन व नाविन्यपूर्ण व्यवसाय निवडीबाबत मार्गदर्शन केले, तसेच महामंडळाच्या योजना व प्रस्तावित योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शासनाने धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर येथे महामंडळास उपलब्ध करुन दिलेल्या जागेवर सुरु करण्यात येणाऱ्या युपीएससी / एमपीएससी सेंटर व बहुउपयोगी प्रशिक्षण केंद्राबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी समतादूत बार्टी सुजाता पोहरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. विशाखा बंडेवार, विनोद पाचंगे यांनी केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या मेळाव्यासाठी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

********

No comments: