21 November, 2023

 

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ विशेष अभियानाच्या माध्यमातून

शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावेत

-  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली, (जिमाका) दि. 21  :  केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ समाजातील वंचित घटकापर्यंत पोहचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ही विशेष मोहीम  15 नोव्हेंबर,2023 ते 26 जानेवारी, 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. ही संकल्प यात्रा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर जाणार आहे. या संकल्प यात्रेचा जिल्ह्यात लवकरच शुभारंभ करण्यात येणार असून याचे नियोजन करण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत शासनाच्या योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना सर्व संबंधित विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले.

या विशेष मोहिमेच्या पूर्वतयारीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, आत्माराम बोंद्रे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. देशवासीयांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आरोग्याच्या सोयीसुविधा, उच्च शिक्षण, रोजगार आदी मिळावेत आणि त्यातून त्यांचा आर्थिक स्तर उंचावला जावा, यासाठी शासन योजनांच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील आहे. ग्रामीण जनतेमध्ये योजनांची प्रचार-प्रसिद्धी करावी. तसेच त्याबाबत जनजागृती करुन त्यात लोकांना सहभागी करुन घेत त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याला प्राधान्य देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, असल्याचे श्री. पापळकर यांनी सांगितले.

ही विशेष मोहीम शहरी आणि गावपातळीवर राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणेतील सर्व विभागांनी सक्रियपणे सहभागी होऊन आपापल्या विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. ग्रामपंचायतस्तरावर या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. यासाठी तालुका व ग्रामस्तरावर समिती तयार करावी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री.पापळकर यांनी दिले.

सध्या देशभरात केंद्र शासन विविध योजना राबवित आहे. त्याची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी जिल्हा ते गावपातळीवर चित्ररथाद्वारे जिंगल्स, पोस्टर्स, छायाचित्रे, ध्वनी-चित्रफिती, पथनाट्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतस्तरावर मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून यासाठी ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, आशाताई, अंगणवाडी सेविकांची मदत घेऊन मोहिम यशस्वी करावी, अशा सूचना दिल्या. 

विकसित भारत संकल्प यात्रा ही विशेष मोहीम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या विशेष कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून पीएम स्वनिधी, पीएम आवास योजना (शहरी), स्वच्छ भारत अभियान (शहरी), अमृत योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, पीएम आवास योजना (ग्रामीण), आयुष्यमान भारत योजना, पीएम भारतीय जन औषधी परियोजना, सिकलसेल, ॲनिमिया निर्मूलन मिशन, पीएम उज्वला योजना, पीएम पोषण अभियान, पीएम विश्वकर्मा, पीएम मुद्रा कर्ज, पीएम गरीब कल्याण योजना, उजाला योजना, सौभाग्य योजना, पीएम किसान सन्मान, किसान क्रेडिट कार्ड, जनधन योजना, सुरक्षा बिमा योजना, अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती बिमा योजना, हरघर जल- जल जीवन मिशन यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले.

******

No comments: