06 March, 2025
शिधापत्रिका धारकांनी 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी
हिंगोली (जिमाका), दि. 06 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी रास्तभाव दुकान स्तरावर ई-केवायसी प्रमाणिकरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी 31 मार्चपर्यंत ई केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच त्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी देशात 100 टक्के ई-केवायसी प्रमाणिकरण होणे आवश्यक आहे. सर्व शिधापत्रिका धारकांनी आधार कार्ड, शिधापत्रिका ही कागदपत्रे सोबत घेऊन दि. 31 मार्च, 2025 पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.
सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबियांसमवेत शिधापत्रिकेतील व्यक्तींची आधार कार्ड घेऊन त्यांचे सत्यापन (व्हेरिफिकेशन) करून घेणे सक्तीचे आहे. सत्यापन (व्हेरिफिकेशन) न झालेल्यांची नावे शिधापत्रिकेमधून वगळल्यास किंवा त्यांचे शिधा जिन्नस बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शिधा पत्रिका धारकाची राहील, याची नोंद घ्यावी.
ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्र, नवी दिल्ली यांनी मेरा के-वायसी मोबाईल अप्लिकेशन विकसित केले आहे. त्यामुळे लाभार्थी स्वतःच्या मोबाईल मधून केवायसी पूर्ण करू शकणार आहेत. ही मोबाईल प्रणाली राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानांमध्ये जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी मेरा-केवायसी मोबाईल प्रणालीद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment