04 March, 2025

हिंगोली जिल्ह्यात 9 मार्चपासून वॉटरशेड यात्रा

• मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रसार • यात्रेदरम्यान ग्रामस्थांना देणार 'पाणलोट'ची शपथ हिंगोली (जिमाका),दि. 04 : प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत पाणलोटविषयक कामाचे महत्त्व विशद करून या कामी लोकसहभाग वाढावा यासाठी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात 9 मार्चपासून वॉटरशेड यात्रा येणार आहे. ही यात्रा कळमनुरी व सेनगाव तालुक्यातील 6 गावात जाणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात दोन व सेनगाव तालुक्यात एक क्लस्टरमध्ये पाणलोट कामे सुरू आहेत. या कामाविषयी जनजागृती करून कामाची माहिती ग्रामीण भागातील जनतेला व्हावी यासाठी केंद्र शासनाने वॉटरशेड यात्रा सुरू केलेली आहे. ही यात्रा एका दिवसात दोन गावे करणार असून या गावात विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. या रथयात्रेची सुरुवात कळमनुरी तालुक्यातील बोथी या गावापासून 9 मार्च रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. तसेच दुपारी 3 वाजता ही यात्रा कुंभारवाडी या गावात दाखल होईल. 10 रोजी ही यात्रा कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पुल व कामठा तर 11 रोजी सेनगाव तालुक्यातील बोरखडी व डोंगरगाव या गावामध्ये ही यात्रा जाणार आहे. या यात्रेनिमित्त प्रत्येक गावात प्रभात फेरी, महिला बचत गट बैठका आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. वॉटरशेड यात्रेमध्ये उत्साहपूर्ण वातावरण तयार होण्यासाठी सहा गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जलयोध्दा व धारिणीताई यांनाही सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. या यात्रेत ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रफुल खिराडे, कळमनुरी तालुका कृषि अधिकारी महादेव कुंभार व सेनगावचे तालुका कृषि अधिकारी संदीप वळकुंडे यांनी केले आहे. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रसार वॉटरशेड यात्रेमध्ये शासनाकडून मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये प्रकल्पाशी संबंधित माहिती देण्यात येणार आहे. तसेच पाणलोटविषयी कामे चित्रफितीच्या माध्यमातून ग्रामस्थांना दाखविले जातील. हा रथ गावात दाखल झाल्यानंतर सुरुवातीला प्रकल्पाचा प्रसार व प्रचार केला जाईल. ग्रामस्थांना दिली जाणार पाणलोटविषयी शपथ : वॉटरशेड यात्रा गावात दाखल झाल्यानंतर प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन होईल. यानंतर शालेय मुलांना बक्षीस वितरण केले जाईल. गावातील युवक, महिला बचत गटाच्या सदस्य व स्वयंसेवक एकत्र येऊन श्रमदान करतील व परिसरात वृक्षारोपण करण्यात येईल. यानंतर ग्रामस्थांना पाणलोटविषयी शपथ दिली जाणार आहे. वॉटरशेड यात्रेमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, बचत गटातील महिला, युवक, स्वयंसेवी संस्था व शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे जलसंधारण व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. *****

No comments: