21 January, 2022

 



जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत

हिंगोली जिल्ह्यासाठी 49.12 कोटी रुपयाच्या वाढीव निधीस मान्यता

 

हिंगोली, (जिमाका) दि. 21 : हिंगोली जिल्ह्यातील विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना 2022-23 या अर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत प्रत्यक्ष 120 कोटी 87 लाख 10 हजार रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली आहे. औरंगाबाद येथे आज आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी 154 कोटी 23 लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. त्यापैकी सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत 49 कोटी 12 लाख 90 हजार रुपयाचा अतिरिक्त निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) आराखडा 170 कोटी रुपयांचा  झाला असून त्यास वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मंजूरी दिली आहे.

वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, आमदार राजू नवघरे, आमदार डॉ. प्रज्ञा सातव, हिंगोली जिल्ह्याचे पालक सचिव एन.आर. गद्रे,  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यस्तरीय आयोजित ऑनलाईन बैठकीत वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी यावर्षीचा राहिलेला निधी वेळेत खर्च करावा. कोणताही निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या विनंतीनुसार मा. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन आराखडा अंतिम करण्यापूर्वी जास्तीचा वाढीव निधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले.

तसेच जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करण्यात जो जिल्हा मराठवाड्यात पहिला येईल त्या जिल्ह्याला बक्षीस म्हणून 50 कोटीचा विशेष निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी योग्य नियोजन करुन शंभर टक्के निधी खर्च करावा, अशा सूचना दिल्या. तसेच हिंगोली जिल्ह्यासाठी 49 कोटी 12 लाख 90 हजार रुपयांचा अतिरिक्त निधी वाढवून देत असल्याचे सांगून सदर निधी हा जिल्ह्यातील विविध विकास कामांवर योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करण्याच्या सूचना श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

यावेळी पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी हिंगोली हा ना उद्योग जिल्हा असून विशेष बाब म्हणून  शिक्षण व आरोग्य याविषयीची कामे करण्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्याची मागणी केली. यावेळी पालक सचिव नितीन गद्रे यांनीही शिक्षण व आरोग्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली. जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीचे बांधकाम, वर्गखोल्यांची दुरुस्ती, नवीन वर्ग खोल्याचे बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम, ॲम्ब्यूलन्स उपलब्ध करुन देणे, उपकेंद्र इमारत बांधकाम, आयुर्वेदिक, युनानी, ॲलोपॅथीक, नागरी दवाखान्याचे बांधकाम, शासकीय कार्यालयासाठी इमारतीचे बांधकाम, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम, रस्ते विकास तसेच नाविण्यपूर्ण योजनेतून वळूमाता प्रक्षेत्र, हिंगोली येथे 2.5 टीडीपी शेणावर आधारित बायोगॅसद्वारे 10 कि. वॅट विकेंद्रीत पारेषण विरहीत विद्यूत निर्मिती प्रकल्प उभारणे, अंगणवाडी केंद्रासाठी सोलार पॅक बसविणे, हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर ग्रंथालय व पोलीस चौकी उभारणे, वसमत तालुक्यातील खाजमापूरवाडी येथे 5 लाख लिटर क्षमतेच्या झिंक ॲल्युमिनियम पाण्याच्या टाकीसह पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी आवश्यक अतिरिक्त निधीबाबतचे सादरीकरण केले.

यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. 

****

No comments: