02 June, 2022

 

पावसाळ्यातील आजार आणि घ्यावयाची काळजी

 

जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस असतो, कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडतो. त्यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होऊन डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे किटकजन्य व जलजन्य आजार होतात त्यासाठी पावसाळ्यात नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

पाणी हेच जीवन असे संबोधले जाते. मानवी जीवनात स्‍वच्‍छ व शुध्‍द पाण्‍याचे महत्‍व अनन्‍य साधारण आहे. असुरक्षित पिण्‍याचे पाणी व अस्‍वच्‍छ परिसर यामुळे समाजात आरोग्‍याच्‍या प्रमुख समस्‍या उद्भवतात. पाण्‍याची गुणवत्‍ता हा सुरक्षित पाणी पुरवठ्यासाठी सर्वात महत्‍वाचा घटक आहे. गावातील परिसर व वैयक्तिक स्‍वच्‍छतेची स्थिती ही पाण्‍याच्‍या गुणवत्‍तेसाठी  प्रामुख्‍याने जबाबदार असते. काही वेळा स्‍त्रोतामधून मिळणारे पाणी योग्‍य गुणवत्‍तेचे नसते, प्रथमत: स्‍त्रोताच्‍या पाण्‍याची गुणवत्‍ता समजून घेणे आणि त्‍यानंतर स्‍त्रोतापासून ते प्रत्‍यक्ष घटकापर्यंत पाण्‍याचा प्रवास समजून घेऊन ज्‍या- ज्‍या ठिकाणी पाणी दुषित होण्‍याची शक्‍यता असते तेथे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करणे आवश्‍यक असते. (जसे- लिकेज, व्‍हाल्‍व्‍ह गळती, नळ कोडांळे नसणे, नळाचे खड्डे) पिण्‍याचे पाणी जीवाणू व रासायनिक प्रदुषणापासून मुक्‍त हवे. जीवाणु प्रदुषणामुळे अतिसार, आमांश, विषमज्‍वर, काविळ यासारखे आजार होतात. तर अमर्याद पाण्‍याचा उपसा, रासायनिक खतांचा वापर व औषधांची फवारणी, स्‍त्रोताभोवती उकिरडे इत्‍यादीमुळे नायट्रेटचे प्रमाण वाढून लहान बालकांत ब्‍लुबेबी सिंड्रोम (मिथॅहिमोग्लोबिनीया) यासारखा आजार होतो. यामध्‍ये लहान बालकांची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते. तर पाण्‍यात फ्लोराईड प्रमाण वाढल्‍यास दंतविकार उद्भवतात यात दात वेडे वाकडे होणे, दात ठिसूळ होणे हाडांमध्‍ये बाक येतो. पाण्‍यात  क्‍लोराईड व कॅलशियमचे प्रमाण वाढल्‍यास मुतखडा, किडनीचे आजार, कॅन्‍सर इत्‍यादी आजार होतात.

स्‍वच्‍छता असेल तेथे आरोग्‍य नांदेल. आरोग्‍य नांदेल तर भरभराट होईल असे म्‍हणतात आपल्‍याला मिळणारे सर्व पाणी पावसापासूनच मिळते ते आपल्‍यापर्यंत दोन प्रकाराच्‍या अवस्‍थांव्‍दारे पोहचते. एक भूपृष्ठावरील पाण्याचे स्त्रोताद्वारे म्हणजे नदी, नाले, तलाव, धरणे आदी माध्यमातून मिळते. तर दुसरा जमिनीखालील पाण्याचे स्त्रोत हातपंप, विद्युत पंप, विहिरी आदीच्या माध्यमातून मिळते.

निसर्गातून मिळणारे पावसाचे पाणी शुध्‍द स्‍वरूपात असते, हे पाणी आकाशातून जमिनीवर येताना त्‍यात हवेतील वायू व धुलीकण मिसळतात तसेच जमिनीवरुन प्रवास करताना त्‍यामध्‍ये विविध घटक, भूगर्भातील विविध क्षार  मिसळतात. नैसर्गिकरित्‍या पाणी काही प्रमाणात प्रदुषित होत असले तरी, मानवनिर्मित कारणांने पाण्‍याचे मोठया प्रमाणात प्रदुषण होते.

पाण्‍यात फ्लोराईड, क्‍लोराईड, कॅलशियम, अर्सेनिक, लोह, नायट्रेट, खते, इत्‍यादींचा अंश पाण्‍यात मिसळल्यामुळे रासायिनक प्रदूषण होते, अशी माहिती जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.कैलास शेळके यांनी दिली आहे.

पाण्‍यामध्‍ये जीवजंतू, जीवाणु, विषाणु, परोपजीवी पेशी (अमिबा), कृमी इत्‍यादीचे अस्तित्व असल्यामुळे जैविक प्रदूषण होते. शिवाय कारखान्यातील सांडपाण्याव्‍दारे किरणोत्‍सारी पदार्थ पाण्‍यामध्‍ये मिसळून  पाणी प्रदुषित होते.

मानवनिर्मित कारणामुळेही पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदुषित होत असते. नदी, नाले, ओढे, झरे, तळे, बांधाचे पाणी दुषित होण्‍याच्‍या कारणांमध्‍ये :

• पात्रात किंवा काठावर शौचास बसणे. अंघोळ करणे, पोहणे, कपडे धुणे, गुरे जनावरे, वाहने धुणे.

• कारखान्‍यातील टाकावू पदार्थ, रासायनिक द्रव्‍ये पाण्‍यात सोडणे. सांडपाणी, मलमुत्र, गटाराचे पाणी पात्रात सोडणे.

• मानव, पशुपक्षी यांचे मृतदेह पाण्‍यात सोडणे.

• धार्मिक विधी, मुर्तीविसर्जन, पूजेचे साहित्‍य (निर्माल्य) टाकणे, नदी काठावर जनावरांचे गोठे बांधणे.

• हातपंपाभोवती उकिरडे असणे, शौचालयाचे सांडपाणी सोडणे,  सिमेंटचा ओटा नसणे.

• पाईप लाईन गळती असणे, उघड्या विहिरीमध्‍ये पालापाचोळा पडणे. उघड्यावर शौचास बसणे.

अशा प्रकाराणे दुषित झालेले पाणी पिल्‍यामुळे होणाऱ्या आजारात अतिसार, आमांश (डिसेंट्री), विषमज्‍वर, काविळ, लेप्‍टोस्‍पायरोसिस इत्‍यादी आजारांचा समावेश होतो, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली आहे.

1) अतिसार : शौचाला पातळ होणे किंवा पाण्‍यासारखे पातळ जुलाब होणे याला अतिसार म्‍हणतात. पावसाळयात दुषित पाण्‍यामुळे साथीच्‍या स्‍वरूपात होणा-या आजारा पैकी एक पाण्‍यात विविध प्रकारचे ई-कोलाय सारखे जीवाणु व विषाणुमुळे पाणी दुषित होऊन असे दुषित झालेले पाणी पिल्‍यामुळे अतिसार होतो यात जलशुष्‍कता होऊन उपचार न मिळाल्‍यास मृत्‍युही संभवतो.

2) आमांश (डिसेंट्री) : अमिबा या एक पेशीय जीवामुळे पाणी दूषित होऊन हा आजार होतो. यात पोटात कळ घालून शौचास होते. शौचातून चिकट आव  (शेंम) पडते कधी-कधी रक्‍तही पडते, कधी-कधी फेस पडतो.

3) कॉलरा : व्हिब्रीओ कॉलरा या सुक्ष्‍म जीवाणुमूळे होणारा आजार यात जुलाब हे अत्‍यंत पातळ म्‍हणजे भाताच्‍या पेजेसारखी होतात. तीव्र जलशुष्‍कता होते. त्‍यामुळे जीभ कोरडी पडते, डोळे खोल जातात, पोटावरील त्‍वचा ओढल्‍यास पुर्ववत होण्‍यास वेळ लागतो. वेळीच उपचार न मिळाल्‍यास तीव्र जलशुष्‍कता होऊन मृत्‍यु संभवतो. जलसंजिवनी अथवा  शिरेव्‍दारे सलाईन देऊन जलशुष्‍कता कमी केली जाते.

4) काविळ (यकृतदाह) : काविळ हा विषाणूजन्‍य आजार असून हा दूषित पाण्‍याव्‍दारे पसरणारा आजार आहे. यात भुक मंदावते, अंगदुखी, पोटात दुखणे, अशक्‍तपणा जाणवतो, शरिराची त्‍वचा व डोळे पिवळे दिसतात. काविळात योग्‍य आहार, विश्रांतीला महत्‍व आहे.

5) विषमज्‍वर : दुषित पाण्‍याव्‍दारे पसरणारा आजार आहे. हा रोग सालमोनेला टायपी या सुक्ष्‍म जीवाणुमुळे होतो. विषमज्‍वरात सतत जास्‍त ताप असणे, डोकेदुखी, अंगदुखी, खूप थकवा, पोटदुखी इत्‍यादी लक्षणे असतात. उपचारात हलका पातळ आहार, पूर्ण विश्रांतीला महत्‍व आहे. यावर प्रतिजैविकाचा वापर करावा लागतो.

पावसाळयात साठलेल्‍या पाण्‍यावर जसे- डबकी, नाले, खड्डे इत्‍यादीच्‍या पाण्‍यात डासोत्‍पती होऊन डेंग्‍यु, हिवताप, फायलेरिया, चिकनगोनिया या सारखे किटकजन्‍य आजार होतात.

डेंगू आजाराचा प्रसार हा एडीस या डासामुळे  होतो तर हिवताप हा ॲनाफिलीस या डासाच्या मादी मुळे होतो डेंगू डासाचे आयुष्य 21 दिवसाचे असते डेंग्यू तापाची डास हा घरातील स्वच्छ परिसरातील असलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो डेंगू तापामध्ये  तीव्र ताप येतो, डोकेदुखी स्नायू दुखी, सांधेदुखी, उलट्या होणे मळमळ होणे, अशक्तपणा,भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, व तोंडाला कोरड पडणे तापामध्ये कमी-जास्त अंगावर पुरळ येणे रक्तमिश्रित किंवा काळसर संडास होणे पोट दुखणे इतर लक्षणे दिसतात असे आढळून आल्यास लगेच आपल्या नजीकच्या आरोग्य संस्थेमध्ये जाऊन रक्ताची तपासणी करून घेणे आवश्यक आहे असते तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावी औषधीही उपाशीपोटी घेऊ नये तसेच मांत्रिक वैद्याचा सल्ला टाळावा रक्ताच्या तपासणी करता शासकीय संस्थेत संपर्क साधावा डासाची उगमस्थाने नष्ट करावी निरुपयोगी विहिरीमध्ये गप्पी मासे सोडल्यास नियंत्रण ठेवण्यास प्रभावी साधन आहे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा (शनिवार ), गावालगत साचलेले पाणी, डबके, नाल्या यामध्ये जळके ऑइल, रॉकेल, इत्यादी टाकावे, टायर, नारळाच्या करवंट्या, फुलदाण्या, कुलर, यामध्ये पाणी साचू देऊ नये. शेवटी किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आपल्या घरी येणारे आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड यांनी केले आहे.  

                                                                                                संकलन : चंद्रकांत कारभारी, माहिती सहायक

                                                                                                             जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

*****

No comments: