23 September, 2016

शेतकऱ्यांना विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

          हिंगोली, दि. 23 :- कृषि व संलग्न उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती / संस्था/गट यांना दरवर्षी राज्य शासनामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभुषण, वसंतराव नाईक शेतीमित्र आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण व आदिवासी गट) पुरस्कार देऊन गौरविण्यात येते . तसेच राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्‍टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यास राज्य शासनाद्वारे प्रतीवर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कृषि पुरस्कार सन 2016 साठीच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून कृषि विभागाच्या संकेतस्थळावर (www.mahaagri.gov.in) वर उपलब्ध आहेत. पुरस्काराचे तपशिल पुढीलप्रमाणे असणार आहे. 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (एकूण द्यावयाची पुरस्कार संख्या -01), उद्देश:- कृषि क्षेत्रातील कृषि विस्तार, कृषि प्रक्रिया, निर्यात, कृषि उत्पादन, पीक फेरबदल, कृषि उत्पदनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीमध्ये अति उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकरी अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो.  पुरस्काराचे स्वरुप:- रोख रुपये 75 हजार स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार.
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (एकूण द्यावयाची पुरस्कार संख्या:-10) उद्देश:- कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विकास , फलोत्पादन व ग्रामिण विकास, ज्यामध्ये बायोगॅसचा वापर, शेतकऱ्यांचा विकास इत्यादी संलग्न क्षेत्रात अद्वितीय कार्य करणाऱ्या शेतकरी / संस्था/गटांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. स्वरुप:- रोख रुपये 50 हजार स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार
जिजामाता कृषिभुषण पुरस्कार (एकूण द्यावयाची पुरस्कार संख्या:- 5) उद्देश:- शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेवून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याकरिता या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप:- रोख रुपये 50 हजार स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, पतीसह सत्कार .
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार (एकूण द्यावयाची पुरस्कार संख्या:-3) उद्देश:- ज्या व्यक्ती/ संस्था, पत्रकारितेद्वारे किंवा इतर अन्य मार्गाने कृषि क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणाऱ्या शेतक-यांना/व्यक्तींना/संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप:- रोख रुपये 30 हजार स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्‍कार (एकूण द्यावयाची पुरस्कार संख्या 25) :- उद्देश:- शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर, शेती पुरक व्यवसाय, स्वत:च्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवड व इतर शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या सर्वसाधारण (19) व आदिवासी गटांतील (06) शेतकऱ्यांना / संस्थांना शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप:- रोख रुपये 11 हजार स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषि सेवारत्न पुरस्कार  (एकूण द्यावयाची पुरस्कार संख्या:-25) :- उद्देश:- राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या कृषि विभागातील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यास हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप:- स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार.
महाराष्ट्र शासन, कृषि विभागाच्या मंडळ/ तालुका/उपविभागीय/जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधून पुरस्कारांकरिता पात्र शेतक-यांनी नियोजित वेळेत आपले परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका स्तरावर सादर करावेत, असे कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य , पुणे कृषि उपसंचालक (माहिती) यांनी कळविले आहे.
****


No comments: