07 April, 2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता
सप्ताहनिमित्त्‍ विविध कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली दि. 7 :  राज्यात भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त शनिवार 8 एप्रिल 2017 ते शुक्रवार 14 एप्रिल 2017 या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येणार असून या सप्ताहात विविध कार्यक्रम, उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य घटनेच्या कलम 46 मध्ये घटनेने समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणाने व गांभीर्याने नमूद केली आहे.
त्या अनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावा. याकरीता राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
शनिवार 8 एप्रिल 2017 रोजी राज्यभर या समता सप्ताहाचे एकाचवेळी उद्घाटन होणार असून त्यानुसार सामाजिक न्याय भवन समाज कल्याण सांस्कृतीक सभागृह येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या समता सप्ताहाचे उद्घाटन होणार आहे. तसेच रविवार 9 एप्रिल ते शुक्रवार 14 एप्रिल 2017 यादरम्यान विविध कार्यक्रमाचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यामध्ये सामाजिक न्याय विभागातंर्गत सर्व महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची व त्याअंतर्गत कर्जाचे वाटप लाभार्थ्यांना कशा पद्धतीने करण्यात येते याबाबतची माहिती व्हावी यासाठी विविध  उपक्रम राबविणे. तसेच  शाळा, महाविद्यालय, निवासी शाळा, आश्रमशाळा तसेच शासकीय व अनुदानीत वसतीगृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघूनाट्य, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धांचे आयोजन, रक्तदान शिबीर, जिल्ह्याच्या महत्वाच्या ठिकाणी तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी बाबतचे कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
तसेच सामाजिक क्षेत्रातील विचारवंत, पत्रकार आदींचे समाज प्रबोधनवर विविध विषयांवर व्याख्यान, नामवंत लोक कलावंताचे प्रबोधनपर कार्यक्रम अशा उपक्रमांचे आयोजन या समता सप्ताहात करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी शुक्रवार 14 एप्रिल 2017 रोजी जिल्हास्तरावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करुन या समता सप्ताहाची सांगता करण्यात येणार असल्याची माहिती  समाज कल्याण सहाय्यक आयुक्त छाया कुलाल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

No comments: