26 April, 2017

प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर करू नये
हिंगोली दि. 26 :  भारतीय ध्वज संहितेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसारच राष्ट्रध्वजाचा वापर करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील नागरिक, पालक व विद्यार्थी यांनी 01 मे महाराष्ट्र दिनासह इतर राष्ट्रीय व सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी कागदाच्या व प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी हिंगोली यांनी केले आहे.
प्रतीवर्षी 01 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, मराठवाड्यात 17 सप्टेंबर व इतर राष्ट्रीय कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर होत असतो. सदरचे कार्यक्रमाप्रसंगी खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात रस्त्यावर पडून पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मधील तरतुदींचे काटेकोपरणे पालन करावे. तसेच कोणीही कागदी व प्लास्टीकचा राष्ट्रध्वज वापरणार नाही, याची दक्षता घेण्याची सुचना प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात येत आहे.
ध्वजसंहितेच्या कलम 2.2 मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन झाली असून तालुका स्तरावरील समित्या स्थापन करण्याचे निर्देश संबंधित तहसीलदार यांना दिलेले आहेत, असे प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांनी ध्वजसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

***** 

No comments: