14 August, 2019

परिवहन कायदा करणारे आपले पहिले राज्य -परिवहन मंत्री दिवाकर रावते







परिवहन कायदा करणारे आपले पहिले राज्य
-परिवहन मंत्री दिवाकर रावते

हिंगोली, दि. 14: वाहतूकीचे नियम पालन न केल्याने दररोज अनेक अपघात होतात. यामुळे अनेक कुंटूंब उध्वस्त होतात. त्याकरीता या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन कायदा करणारे आपले पहिले राज्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.
येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नुतन इमारत उद्घाटनाप्रसंगी श्री. रावते बोलत होते. यावेळी पालकमंत्री अतुल सावे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, विप्लव बाजोरिया, राहूल पाटील,  जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे श्री. रावते म्हणाले की, आजची पिढी ही भौतिक व वैचारीक दृष्टीने गतीमान आहे. राज्यात सुमारे 3 कोटी 27 लाख वाहने असून, त्यात पावणे दोन कोटी वाहने ही दूचाकी आहेत. आणि त्यांचे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. आज जे रस्ते अपघात होतात, त्यात 19 ते 35 वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येते. आणि हे त्या मृत झालेला व्यक्तीच्या कुंटूंबासाठी आणि देशासाठी हानी आहे. याकरीता हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. कारण आपला देश हा तरुणांचा देश म्हणुन ओळखला जातो. अपघात हे कधी ही सांगुन होत नसतात. त्याकरीता आपणच आपली काळजी घेणे आवश्क आहे. एस. टी. महामंडळाच्या बसच्या अपघातात मृत्यू झाल्यास संबंधीताच्या कुंटूंबास 10 लाख रुपयांची मदत दिली जाते. याकरीता अल्यूमिनियमद्वारे एस. टी. महामंडळाच्या बसची होणारी बांधणी ही आता लोखंडाद्वारे होत आहे. तसेच एस.टी. महामंडळात कामावर असतांना मद्य प्राशन करुन सेवा करणाऱ्यावर दोन तासात निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे श्री. रावते यांनी सांगितले.
आजचे युग हे मुलींना क्रांती घडविण्याचे युग आहे. त्याकरीता एक वर्ष छोटे वाहन चालविण्याचा अनुभव असणाऱ्या मुलींना एक वर्षाचे प्रशिक्षण देवून वाहनचालक पदाची नियूक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलींनी एस.टी. बस चालविण्याचा हा प्रयोग देशातील पहिला प्रयोग असल्याचे ही श्री.रावते यावेळी म्हणाले.  
पालकमंत्री श्री. सावे यावेळी म्हणाले की, जिल्ह्याची निर्मिती होवून 20 वर्ष झाल्यानंतर आज प्रादेशिक परिवहन कार्यालयास ही अत्यंत अत्याधुनिक अशी इमारत मिळाली आहे. तसेच हे कार्यालय संपूर्णरित्या संगणकीकृत असल्याने ऑनलाईन पध्दतीने नागरिकांना सर्व सेवा प्राप्त मिळण्यास मदत होणार आहे.
खासदार श्री. पाटील म्हणाले की, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नुतन इमारत ही अत्याधूनिक आहे. यामुळे नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी मदत होणार आहे. परंतू या ठिकाणी अधिकारी-कर्मचारी पदांचा असलेला अनुशेष भरुन दिल्यास अधिक चांगली सेवा नागरिकांस मिळण्यास मदत होईल.  तसेच अपघातग्रस्तांना तातडीच्या उपचारासाठी आर्थिक मदत आणि रस्ते अपघातातील मृत्यूच्या प्रमाणात घट करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरु केली. तसेच सर्वसामान्य प्रवशांना सुखकर प्रवासाकरीता शिवशाही बस सुरु केली असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
प्रारंभी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नुतन इमारतीचे फित कापून  उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी ‘रस्ता सुरक्षा अभियान’ पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. तर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
*****  


No comments: