01 May, 2020

हिंगोलीत 26 नवीन कोरोना बाधीत रुग्ण


·   जिल्ह्यात एकुण 44 कोरोना बाधीत रुग्ण
-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास

हिंगोली दि.01: येथील राज्य राखीव बलातील बंदोबस्ताहून आलेल्या नवीन 25 जवान आणि नांदेड येथील अडकलेल्या भाविकांना पंजाब येथे सोडण्यासाठी गेलेला एक व्यक्ती अशा एकूण 26 जणांना कोवीड-19 ची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
हिंगोली येथे राज्य राखीव बलातील एकुण 41 जवानांना कोवीड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील 33 जवान हे मालेगाव तर 8 जवान हे मुंबई येथे बंदोबस्तासाठी कार्यरत होते. यामध्ये कोविड-19 ची लागण झालेले हिंगोली येथील राज्य राखीव बलातील एकूण 40 जवान हे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात भरती आहेत. तर जालना राज्य राखीव बल येथील जवानास औरंगाबाद येथील रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे. तसेच या जवानाच्या संपर्कात आलेले 02 व्यक्ती, सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमधील एक बालक, आणि बार्शी येथून वसमत येथे आलेला 1 व्यक्ती असे एकुण 44 रुग्णांना हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे.
तर हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील एक व्यक्ती खाजगी ट्रॅव्हल्सवर कार्यरत असून, तो भाविकांना सोडण्यासाठी पंजाब येथे गेला होता. तो परतल्यानंतर शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, नांदेड येथे त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतू आज सकाळी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यास नांदेड येथील शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे. तसेच एका रुग्णास औरंगाबाद येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
 या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत असुन, सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी आता सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.  कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
****

No comments: