15 May, 2020

आपत्तीच्या कालावधीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे - अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार



हिंगोली,दि.15: आगामी मान्सुन ऋतूत आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करुन अधिक सतर्क, समन्वय व तत्परतेने काम करण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित मान्सून-2020 पुर्वतयारी आढावा बैठकीत श्री. मिणियार हे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. मिणियार म्हणाले की, सद्यपरिस्थितीत आज आपण कोरोना सारख्या आपत्तीचा सामाना करत आहे. परंतू येणाऱ्या मान्सुनमध्ये उद्भवणाऱ्या विविध आपत्तींचा देखील आपणांस सामना करावा लागणार आहे. हे लक्षात ठेवूनच सर्व यंत्रणांना पूर्वनियोजन करावे लागणार आहे. याकरीता उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करुन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा. तसेच याठिकाणी अन्सरींग मशीन ठेवून येणाऱ्या सर्व कॉलची नोंद ठेवावी. या आराखड्यात जिल्ह्यातील 72 पुरप्रवण गावांचा समावेश करावा. तसेच प्रत्येक गावातील तीन जबाबदार नागरिकांचे नेहमी सुरु असणारे संपर्क क्रमांकांची यादी तयारी ठेवावी. जिल्ह्यात सर्व मंडळातील पर्जन्यमापक यंत्र कार्यरत असून ते सुस्थितीत असेल याची खात्री करुन आवश्यक असल्यास पर्जन्यमापक यंत्र त्वरीत खरेदी करावेत. नागरी व ग्रामीण भागातील सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून घ्यावेत. पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास विहीत नमुन्यात सादर करावी. तसेच तालुकानिहाय तयार करण्यात आलेले शोध व बचाव पथक अद्ययावत करावेत.
यावेळी उपजिल्हाधिकारी चंदक्रांत सूर्यवंशी म्हणाले की, वसमत आणि कळमनुरी तालूक्यात काही दिवसापासून भूकंपाचे धक्के जाणवत आहे. सदर भूकंपाचे धक्के हे सौम्य असले तरी वारंवार जाणवत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. याकरीता पूर्वनियोजन करणे आवश्यक असून, संबंधीत यंत्रणांनी या परिसरातील घरांची तपासणी करुन देखभाल दूरुस्तीची गरज असल्यास संबंधीतास ते करण्यास सांगावे. अथवा घर कमकुवत असल्यास त्यास घर बदलण्याच्या सूचना देण्यात याव्या. तसेच ज्या घरांच्या पत्रावर दगड ठेवले असतील तर ते संबंधीतास तात्काळ काढून घेण्यास सांगून पत्रे बांधून घेण्यास सांगणे. तसेच या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सूचित करावे.
तसेच पाठबंधारे विभागाने जिल्ह्यातील ' नद्या आणि पाणी साठे, मध्यम आणि लघु प्रकल्प तसेच सर्व जल संस्थाचे सर्वेक्षण करुन आवश्यक ती देखभाल दूरुस्ती करुन घ्यावी. तसेच जिल्ह्यातील ज्या जल संस्था आहेत त्या कोणत्या यंत्रणेच्या अधिपत्याखाली आहेत, तसेच त्याचे नियंत्रण अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची सविस्तर माहिती आठ दिवसात सादर करावी. तसेच गावांना नदी पाणी पातळीचा धोका होवू नये याबाबत उपाययोजना करत इशारा पातळीबाबतची माहिती दैनंदिनरित्या सादर करण्याच्या सूचना श्री. सूयवंशी यांनी दिल्या.
महावितरणने जिल्ह्यातील सर्व रोहित्रांची व लोंगकळणाऱ्या तारांची तपासणी करुन त्याची देखभाल दूरुस्ती करुन घ्यावी. तसेच यामुळे अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. वीज पुरवठ्याचे नियोजन कसे करणार याची माहिती सादर करावी.
            आरोग्य विभागानेही नियंत्रण कक्ष स्थापन करुन आपत्ती व्यवस्थापन करिता समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन अहवाल सादर करावा. पावसाळयात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना वेळीच थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी आणि ब्लिचिंग पावडरची साठवणूक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करावा. जिल्हा परिषदेने आपल्या अंतर्गत येणाऱ्या  आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याच्या सूचनाही श्री. सूर्यवंशी यांनी यावेळी दिल्या.
            नगरपालीका प्रशासनास सूचना देतांना श्री. सुर्यवंशी म्हणाले की, नगरपालिका प्रशासनानेही नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करुन, अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवून आपत्ती व्यवस्थापनकरीता समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच शहरातील नालेसफाई तसेच अतिक्रमण दूर करावेत. शहरातील वस्तीमध्ये पाणी शिरणार नाही याकरीता योग्य ते नियोजन करुन शहरातील नाल्याची दुरुस्ती करावी जेणेकरुन शहरामध्ये पाणी तुंबणार नाही व पाण्याचा विसर्ग होण्यास मदत होईल.
            सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या काढून रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच वृक्ष उन्मळून पडल्यास ते तात्काळ हटविण्याची व्यवस्था करावी. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व शाळांचे सर्वेक्षण करुन त्यांची देखभाल दूरुस्ती वेळेतच करुन घ्यावी. तसेच  रेल्वे प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, पाटबंधारे विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, भारत संचार निगम लिमिटेड, राज्य राखीव पोलीस दल क्र. 12, गृहरक्षक दल, पंचायत समिती या बरोबरच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत असणाऱ्या सर्व विभागांनाही आप-आपल्या यंत्रणांची पूर्वतयारी करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुर्यवंशी यांनी दिल्या. तसेच आपत्ती व्यवस्थापाना संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून दुरध्वनी क्रमांक 02456-222 560 वर संपर्क साधण्याचे ही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी यावेळी आवाहन केले.
यावेळी बैठकीस उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रवीण फुलारी तहसीलदार गजानन शिंदे, जीवककुमार कांबळे, पांडुरंग माचेवाड, उप विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, उप मुख्याधिकारी नितीन दाताळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, हिंगोली नपचे मुख्याधिकारी रामदास पाटील, सेनगाव नपचे शैलेश फडसे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांची उपस्थिती होती.
****



No comments: